Thursday, 15 December 2016

शहिदांची नेमकी व्याख्या कोणती ?

सीमेवर शत्रूसोबत दोन हात करीत लढताना वीरमरण आल्यावर सैनिक शहीद होतो. त्याला सरकारदरबाराकडून शहीदाचा दर्जा प्रदान केला जातो. हे अगदी योग्यच आहे, त्यांचे बलिदान नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. कारण तो देशातील अंतर्गत नागरिकांचे रक्षण करण्याच्या महान उद्देश्याने सीमेवर लढतो. सैनिक म्हणून हे त्याचे सर्वप्रथम कर्तव्य, आणि तो त्या कर्तव्याला पुर्णपणे जागतो आणि मरतो देखील.

पण जेव्हा देशाच्या अंतर्गत भागामध्ये काही आणीबाणीचे प्रसंग उद्भवतात जे नैसर्गिक नसतात. ज्याची पूर्णतः जबाबदारी लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या सरकारवर असते. अश्यावेळी ती जबाबदारी सरकारने स्वीकारून, त्यावर ताबोडतोब प्रभावी उपाययोजना राबवल्या पाहिजेत. देशाचा नागरिक म्हणून, देशहितासाठी  त्रास सहन करण्याची नागरिकांची तयारी असावी, अशी सर्वसाधारण धारणा असते. काही प्रमाणात ती योग्यदेखील आहे. देशहितासाठी घेतला जाणारा, एखादा निर्णय दूरगामी परिणाम करणारा असतो आणि त्याचा येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी फारच उपयोगाचा असतो. पण देशामध्ये प्रत्येक वर्ग वेगवेगळा असतो आणि तो वेगवेगळा स्तरावर मोजला जातो, कनिष्ठवर्ग,मध्यमवर्ग,उच्चवर्ग. प्रत्येकाच्या दैनंदिन आणि मुलभूत गरजा देखील वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कनिष्ठवर्ग पूर्णतः आणि मध्यमवर्गातील काही सुरुवातीचे घटक, हाती येणाऱ्या रोजच्या मिळकतीवर त्यांच्या दैनंदिन गरजा भागवत असतात. परंतु अश्यावेळी त्यांच्या दैनंदिन गरजांवर घाला घालणे, मानवनिर्मित उदभवलेल्या परिस्थितीवर वेळीच ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे न करणे. ससेहोलपट होत असताना, दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी, हाती निराशा लागणाऱ्या रांगांमध्ये उभे राहावे लागले, तरीही जनता हा त्रास सहन करीत कितीही काळ उभी राहते. अश्यावेळी त्यापैकी एखाद्याने जरी  बंडखोरीची भाषा वापरली तर त्याला शांत करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची उदाहरणे दिली जातात. निस्पृह सेवेसाठी कटीबद्ध असणारे, देशासाठी आपले प्राण न्योछावर करणारे आपले वीर सैनिक, ज्यांना गोळीच्या बदल्यात गोळी मिळते, पण तुम्हाला तर इथे पैसे मिळणार आहेत. मग कांगावा कशाला ??? प्रत्येक देशाचा  नागरिक, प्रचंड मातृप्रेमी असतो आणि तितकाच मातृभूमी प्रेमी देखील. जितकी श्रद्धा त्याची जन्मदात्या आईवर असते तितकीच आईचा दर्जा असलेल्या आपल्या मातृभूमीवर देखील असते. मग तो देश क्षेत्रफळाने प्रचंड प्रमाणात विस्तारलेला असेल किंवा अगदी बेटांच्या स्वरुपात तुकड्यांमध्ये विखुरलेला असेल. रांगांमध्ये उभे राहणाऱ्या नागरिकांना, सीमेवर लढणाऱ्या वीर सैनिकांचे उदाहरण देवून, एकाच पट्टीमध्ये मोजले जाते. पण मग जेव्हा रांगामध्ये उभे राहणारे सामान्य नागरिक जीवानिशी मरतात, तेव्हा त्यांच्या मरणाची अहवेलना का ??? त्यांचे मरण मोजताना ती पट्टी अचानक कुठे गायब होवून जाते ???

जिथे नक्षलवाद्यांसोबत दोन हात करीत असताना, वीरमरण आलेल्या पोलिसांना शहीदाचा दर्जा प्राप्त होत नाही, तिथे सर्वसामान्यांची काय टाप.

- सुरेश तु. सायकर   

No comments:

Post a Comment