Friday 12 December 2014

शीरनाना... (लघुकथा )

‘शीरनाना’ या फक्त चार अक्षरी नावाचा एकट्या गावानेच नाही तर पूर्ण पंचक्रोशीने धसका घेतला होता. शीरनाना माहित नाही असा माणूस या पृथ्वीतलावरला नाहीच इतका तो कू’प्रसिद्ध होता. प्रसिद्धीसाठी माणसं काहीतरी करीत राहतात पण शीरनानाला स्वतःची प्रसिद्धी कधी करावीच लागली नाही. गावातील एक ना एक माणूस शीरनानाच्या पोथ्या एकसारख्या वाचत असायचा. शीरनानानी आज हा प्रताप केला, शीरनानानी आज त्या लग्नाची धूळधाण उडवली, त्यातल्या किती खऱ्या आणि किती खोट्या ते सांगणाऱ्यालाच माहित, पण ते ऐकत असताना शीरनानाला पाहिलेल्या व्यक्तीला डोळे झाकून ऐकीव गोष्टींवर विश्वास बसेल असा तो आडवा तिडवा वाढलेला देह. या प्रचंड देहाची तुलना २ हत्तींना मिळून एक माणूस अशीच केली जायची.

तशी शीरनानाची गप्पांचा फड मारण्यासाठी ठरलेली जागा म्हणजे देवळाजवळचा पार. पण उन्हाळ्यात जसा आंब्याचा हंगाम चालू व्हायचा तसा शीरनानाचा मुक्काम वस्तीपासून थोड्या अंतरावर टेकडाखालील उतारावर असलेल्या त्याच्या मालकीच्या आंब्याच्या झाडाखाली यायचा. ते आंब्याचे झाड म्हणजे दोन झाडांनी एकमेकांना बांधल्यासारखे चिटकून उभे होते अगदी शीरनानसारखं अवाढव्य. अन त्या आंब्याच्या झाडाची मालकी शीरनानाचीच होती. तशी आंब्याची काही कमी नव्हती वस्तीवर, अमाप आंब्याची झाडं होती, पण वेळ न जाणाऱ्या माणसाला काहीतरी काम हवेच आणि ते गरज नसताना त्याची रखवालदारी देखील. थोडक्यात, अथांग पसरलेल्या समुद्रातील पाणी कोणी चोरू नये म्हणून लक्ष ठेवायला एखादया रखवालदाराची नेमणूक करावी तशी शीरनानाची अवस्था वाटायची. बरं, तसंही टारगट पोरांनी ठरवून हल्लाबोल जरी केला तरी शीरनाना जाग्यावरून बूड न हलवीता दगड मारण्याखेरीज काहीही करू शकत नव्हता. ताड्कन उठावं अशी शरीरयष्टी शीरनानाला लाभलेली नव्हती. पण त्याच्या आवाजाची जरब भल्याभल्याला जागेवर खिळवून ठेवणारी होती. तसा शीरनानाचा स्वभाव खूपच मस्करी होता, एखाद्या वेळेस हसायला लागला तर त्याच्या गडगडाटी हसण्याने समोरचाच्या पोटात भीतीने गोळा यायचा, हसता हसता शीरनानाचा जीव जातोय कि काय असं समोरच्याला वाटायचं एवढा तो गदगदून हसायचा. ज्याने शीरनानाची जीभ आपल्या लहानपणी पाहिलेली होती ती त्याच्या तरुण वयात येईपर्यंत अगदी तशीच्या तशीच होती, स्ट्रॉबेरी सारखी लालेलाल. कारण शीरनानाच्या तोंडातलं आणि चंचीमधलं पान कधीच संपायचं नाही. गप्पांचा फड जमल्यावर बोलताना त्याच्या तोंडातून तो साठलेला पाचकरस, समोर बसलेल्याच्या तोंडावर आणि स्वच्छ धुतलेला पांढऱ्या सदऱ्यावर एम एफ हुसेन सारखं आडवा-तिडवा चित्रकारी करीत असायचा. एखादी गोष्ट जरी पटली तरीही समोरचा टाळी दयायला हात पुढं करायला घाबरायचा कारण ओठांमधून गळणाऱ्या सुपारीयुक्त पाचकरसाला शीरनाना कधी पुसून त्याच हाताने समोरच्याला टाळी देईल याचा नेम नसायचा. शीरनानाच्या गप्पांमध्ये एक प्रकारची जादू होती एकदा का त्यांची बारामती पेसेंजर सुरु झाली कि ती अगदी छोटे छोटे स्टेशन घेत थेट दौड स्टेशन गाठायची आणि बराच वेळ थांबायची. अगदी तसच शीरनाना अदमास घेत घेत मध्येच थांबत आणि लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून पुढील किस्सा सांगत. लोकांची हसून हसून पुरे वाट लागायची, एखादा किस्सा चुकू नये म्हणून परसाकडे जायची नितांत गरज जरी एखाद्याला झाली तरी तो जाग्यावरून उठायचा देखील नाही इतकी जादू होती शीरनानाच्या गप्पांमध्ये. आणि त्यातुनही एखाद्याने शीरनानाला त्याची खविसासोबत झालेली कुस्तीची आठवण करून दिली कि मग भीतीने दोन चार जण एकमेकानसोबत लघवीला जायला देखील घाबरायचे, काय घ्या डेरिंग करून गेलोच आणि अचानक खवीस समोर आलाच तर, झाली का मग ओली.

तर शीरनानाचा खविसासोबतच्या कुस्तीचा किस्सा आत्तापर्यंत अनेकदा ऐकून झाला होता तरीही एखादा नवीन पाव्हणा गावात आला आणि रात्रीभर रंगत जाणाऱ्या गप्पांच्या फडामध्ये सामील  झाला तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा त्या किश्याची उजळणी व्हायची. गप्पांमध्ये एखादा मध्येच शीरनानाला बोलायचा ‘नाना...आमच्या या पाव्हण्याला तुमची खविसासोबत झालेल्या कुस्तीबद्दल सांगितलं तर या गड्याला खरंच वाटनासं  झालंय’ आणि मग शीरनाना दीर्घ उसासा टाकायचा, पाव्हण्याकडं एकवार बघायचा अन मग शांतपणे आपली चंची उघडायचा त्याच्या या चालणाऱ्या शांत प्रक्रियेवरून इतरांच्या लक्षात यायचं कि नानाची किस्सा सांगायची सुरुवात होणार. मग हळुवारपणे उघडलेल्या चंचीमधून एक एक जिनसा बाहेर यायच्या, पान, चुना, कात या सगळ्याचं मिश्रण होवून तोंडात जाईपर्यंत पाव्ह्ण्याव्यतिरिक्त बाकीचे आपापली नैसर्गिक कार्य उरकून येई कारण त्यांना माहित होतं कि समजा मध्येच जोरात आली तर उठायची आणि अंधारात जायची कोणाचीच हिम्मत होणार नाही. मग शीरनाना अडकित्त्याने सुपारी कातरत पुन्हा एकवार पाव्हण्याकड बघायचा, सुपारी कातरून पाव्हण्यापुढं हात करायचा. पाव्ह्ण्याने घेतली तर ठीक नाही तर सगळी सुपारी तोंडात जायची. इतर सगळे जण ऐकलेला किस्सा असून देखील नव्याने ऐकतो अश्या अवस्थेमध्ये शीरनानाकडे बघत कधी एकदाचं सुरु होतंय अश्या नजरेने पहायचे. एखादया भुताच्या चित्रपटामध्ये जशी भूत येण्याआधी वातावरण निर्मिती केली जाते अगदी तशीच  वातावरणनिर्मिती शीरनाना करायचा. मग जसा पहिल्या पिचकारीचा अर्धा अधिक पाचक रस घशातून पोटात आणि अर्धा बाहेर टाकला जायचा तेव्हा सगळ्यांना खात्री पटायची कि आता सुरुवात होणार. पुन्हा एकवार पाव्हण्याकड बघून अंधारात एकटक बघत शीरनाना सुरु व्हायचा  “तर पाव्हणं, लई दिस झालं त्या गोष्टीला. नव्यानं लग्न झालेलं अन सासऱ्याकडची पयलीच यात्रा. सासऱ्यान सोता येवून म्हातारीला यायला इनंती केली पन म्हातारीनं नाय म्हणून सांगितलं. तिचा जीव निगाना घरातून मग मला जा म्हणाली. मला नाय पन बोलता यायना, सासरा गरीब हुता स्वभावानं, म्हंटला येतू तुम्ही जावा लेकीला घेऊन. मंग मी गेलू दोन दिसांनी तर सासू अन सासरा लय खुश झालं, सासऱ्यान आदीच बोकाड कापलेलं हुतं. मंग म्या आपला सुरु झालो नेमिपरमान, लेका, वाडपी चक्कर येऊन पडतोय का काय असं वाटत हुतं. बाजूला बसलेली लोकं येक नाय तर दोन भाकरी खावून उठाय लागलं पन म्या कसला हलतोय जाग्यावरन. माज्याकडं बगून लोकं कायबाय बोलायला लागली तवा सासरा लागला वाढायला. येकसारखा त्याला असा वाकाया लागतंय बगून म्या मनात म्हटलं बास्स झालं, आपल्यामुळ त्या बिचारयाचं कशाला हाल. उशीर झालेला अन अंधार पडाय सुरवात झाली तसा माजा जीव लागला वर खाली व्हायला, एक तर म्हातारी एकलीच घरी, तसं गडीबी हुतं पण शेवटाला नोकर मानसंच   ती बी. बायकुला सांगितलं कि मला काय चैन नाय पडायची हितं. तवा म्या निगतो हे आयकून सासऱ्याला वाटलं कि त्याच्याकडून काय कमी ज्यास्त झालंय का काय म्हणून ते लागलं हात जोडाय. म्या सांगितलं मामा आवो तसं काय न्हाय, येकतर म्हातारी यकलीच घरी तवा तिला सोडून म्या नाय राहू शकत. आता निगालो तर पोचल लवकर. कशीबशी समजूत काडून निगालो. पायाखालचा रस्ता, निगालो ताडताड करत. अंधार पडलेला पन चांदण्याच्या उजेडात आपला नेमिपरमान चलत होतू पन जशी आपल्या गावाची वेस ओलांडून आत यायला लागलो तसं कोनी तरी पाटीमागून येतंय असं वाटाय लागलं. वळून पायलं तर कोनीच दिसना. मग म्याच ओराड्लू, मायला तुज्या, दम असंल तर भायीर ये. पन कोनीच दिसना म्हणून समूर पायलं तर एक गडी उबा, हयो ताडमाड उच, माज्याउन चांगला तब्यतीन पयल्वान गडी. मला बगून म्हनतोय कसा ‘लेका, तू यकलाच प्वाट भरून मटान खावून आलास व्हय. मला बी मटान पायजे.’ म्या म्हटलं ‘आरं, मटान म्या काय खिशात भरून फिरतोय का काय? जा तिकडं माज्या सासुरवाडीला तिकडं बोकाड काप्लाय’ म्या सांगुस्तोवर गडयानं टाकला कि माज्यावर पैलवानी डाव. म्या मानगूट सोडवलं आणि दिला त्याला बी हिसका, तसं ते लागलं येड्यावानी वरडायला. उबा राह्यलं अन कसनुसं त्वांड करून हसायला लागलं. म्या म्हनल ‘आई निजव्या, हो बजूला. मला उशीर होतोय घरला जायला’ तसं ते म्हणालं ‘मटान तरी दे नाय तर मला कुस्तीत तरी हरव’ मग माजं बी डोस्कं सरकलं. म्या जवा त्याचं मानगूट पकडायला हात टाकला तसं ते समूरनं पशार. मागनं हसायचा आवाज आला तर मागं वळून पायलं तर हे बेणं माग उब होतं. पुन्यांदा डाव टाकायला गेलो तर गायब. परत मागून हसायचा आवाज आला, तर ह्यो मागं उबा. मंग माजं डोस्कंच सरकलं, त्याला म्हनलं ‘खऱ्या आय बापाचा असंल तर समूर ये. ह्यो कसला रडीचा डाव खेळतूयास ’ तसं त्यानं मागनं येऊन माजं मानगूट पकडलं आणि मला उचलून आपटला कि ढेकळात. मंग म्हनल कि आता याची काय खैर नाय गड्या आज. ढेकळातून उठलू, उचलला त्याला अन आपटला खाली. तसं ते पुन्यांदा लागलं येड्यागत वरडायला अन उठलं कि कसनुसं हसायचं. मग पुन्यांदा त्यानं मला उचललं अन दिलं कि लांब फेकून मुरमाच्या रानात, कम्बरड मोडलं काय असं वाटाय लागलं. कसबसा उठलू अन पळत जावून पलटवर दिला अन दिलं फेकून त्याला मुरमाच्या रानात. ते पुन्यांदा हसायला लागलं अन  म्हनाला ’ लय वरसांनी  खरा गडी भेटला आज मजा येणार’ असं म्हणून दिला कि मला टोला. भेलकांडत म्या पडलो खाली तसा माज्या उरावर बसला माजा इस्वास लागला कि कोंडायला. म्या बी त्याला धोबीपछाड टाकला त्याच्या मांड्यात हात घालून पलटवर केला अन बसलू त्याच्या उरावर. तसं ते बेणं पुन्यांदा हसायला लागलं कसनुसं. असं किती येळ चाललं हुतं कुनास ठाव. पन जसं तांबडं फुटाया लागलं तसं त्या बेण्यानं माज्या तावडीतून सुटका करून घेतली आणि दिलं मला ढकलून, खाली पडल्यावर माज्या डोळ्यात फुफाटा गेल्यामुळ काईच समजलं नाय. डोळे चोळत उबा राह्यलो अन समूर बगितलं तर ह्यो गडी गायब. कुटं गेलं म्हणून इकडं तिकडं बगाय लागलो तर कुटंच दिसना. अन तेवड्यात माज्या डोळ्यासमोर अंधारायला लागलं, कसं तरी समूर पायलं तर चार पाच लोकं पळत येत हुती. ती जवळ येत्यात न येत्यात तवर म्या पडलो खाली. कुनी तरी वरडत हुतं आरं शीरनाना घावला इथं. मग नंतरचं मला काईच आठवाना अन जवा डोळा उगडला तवा म्हातारी डोक्याजवळ बसलेली दिसली, उटाय लागलू तर अंगात अजिबात ताकत नव्हती. डोक्यावर पाण्याची पट्टी लावलेली, सगळं अंग सुजलेलं हुतं. वस्तीवरची लोकं वसरीवरच बसून हुती. मग म्हातारीनं सांगितलं कि म्या दोन रोजापास्न बेसूद पडून होतो. कुन्यातरी करणी केली माज्यावर म्हणून म्हातारी ऊर बडवून घेत हुती. जसा सुद्दीवर आलो तसा तीच्या जीवात जीव आला. माज्या कपाळाला कसला तरी बुक्का लावत चिमुटभर बुक्का पाण्यात टाकून मला पाजलं अन म्हणाली माजा शीरनाना सुद्दीवर येवूदे मग म्या तुला कोंबडं कापन. अन  म्हातारीनं म्या सुद्दीवर आल्याचं बगितल्यावर खरंच कोंबडं कापलं अन वेशीपाशी नेवून टाकलं. अन मला त्यानंतर वाईच फरक पडाय लागला. जवा म्या सगळ्यांना काय अन कसं घडलं हे सांगितलं तशी सम्द्यांची खात्री पटली कि म्या खाविसाबरुबर कुस्ती खेळलो. अन त्यातला त्यात माज्यात रग हुती म्हणून म्या रात्रभर लढलो अन तांबडं जसं फुटलं तसं खवीस उजेडाला घाबरून पळालं.’ हे सगळं सांगतल्यावर शीरनाना पावण्याचा अदमास घ्यायला थोडा थांबायचा. पाव्हणा आपलं मानगूट खाविसानं मागून पकडाय नको म्हणून अंग चोरत गर्दीत बसलेला ही कहाणी ऐकून कसाबसा भानावर यायचा आणि दोन्ही हात जोडून शीरनानाला साष्टांग दंडवत घालायचा. मग शीरनाना उशीर होतोय म्हणून सगळ्यांना आपापल्या घरी निघायला सांगायचा. पारावरून लोकं मग भीतीनं गटागटाने घरी जायची आणि जी शीरनानाच्या घराजवळपास राहायची ती खाविसाच्या भीतीनं शीरनानाला खेटून खेटून चालायची. शीरनाना त्यांची उडणारी तारांबळ बघून गालातल्या गालात हसायचा चालता चालता मध्येच थांबायचा अन अंधारात उगाच एकटक बघत ‘कोन हाय रं तिकडं’ असं म्हणायचा मग खेटून चालणारी हे ऐकून खवीस दिसल्यासारखी शीरनानाच्या कडेवर टुणकरून उडी मारून बसायची बाकी रहायची. एवढी कहाणी ऐकल्यावर प्रत्येकाला आपलं मानगूट कोणीतरी पकडतंय असा भास वाटायचं. भीती इतकी असायची कि वस्तीवरच्या लोकांन सोबत पाव्हणा देखील अंधारात परसाकडे जायला टाळाटाळ करायचा.

लग्न समारंभ आणि शीरनाना याचं अतूट नातं होतं. लग्नातल्या जेवणावळीत सगळ्यात आधी बसलेला आणि सगळ्यात शेवटच्या पंक्तीला उठलेला अनेकांनी शीरनानाला पाहिलेलं आहे. एखादा वाढणारा वाढपी नवीन असेल तर तो घाम गाळून कमरेत लकवा भरेल इतक्या वेळेस वाकून बेजार व्हायचा आणि शेवटी भरलेलं भांडं समोर ठेवून ‘काका, तुम्हाला हवं तसं घ्या’ असं प्रेमळवजा आग्रह करायचा. त्यातल्या त्यात एखाद्याने वाढताना थोडा आडता हात घेतला तर शीरनाना त्याला तत्वज्ञान सांगायचा  ‘बाबारे...अन्न हे संपूर्ण ब्रम्ह आहे, तवा नंतरची चार माणसं उपाशी राहिली तरी चालल पण समूर बसलेल्या माणसाचं ताट कवापन मोकळं राह्यालं नाय पायजे..आरं असा गीते मंदी लिवलंय” असं बोलल्यावर वाढपी अर्ध निम्मं शीरनानाच्या  ताटात ओतायचा. शीरनाना गालातल्या गालात हसत ‘ आरं.. आरं...बास झालं..बाकीच्यांना पन वाईच असू दे’ असं म्हणायचं. बरं शीरनानाच्या अजब तत्वज्ञानानुसार गीतेच्या कोणत्या अध्यायात असं लिहिलेलं आहे हे गीता लिहिणाऱ्याला देखील शोधून सापडायचं नाही. पण शीरनानाची अवाढव्य पसरलेली ढेर पाहिल्यावर ब्रम्हांडाची निर्मिती करताना आणि त्यातल्या त्यात पृथ्वीची निर्मिती करताना ब्रम्हाला जेवढे प्रचंड कष्ट पडले असतील त्याहून कित्येक पटीने जास्त शीरनानाला कष्ट पडलेले असतील यामध्ये काहीच वाद किमान गावकऱ्यानमध्ये तरी नसावा. पण या सगळ्यामुळे पंक्तीतल्या इतर लोकांची भरपेट करमणूक मात्र व्हायची, आजूबाजूची लोकं उठून जायची पण शीरनानाच्या न गप्पा संपायच्या ना पत्रावळीमधले अन्न, श्रीकृष्णाने दिलेल्या भांड्यातून जसे वाढताना अन्न संपत नव्हते तसे शीरनानाच्या ताटातील अन्न संपायचे नाही. अन्न वाया जावू नये, उकिरड्यावर टाकायला लागू नये यासाठी लग्नघरातील सगळे अन्न संपले तरी चालेल पण वाया जावूनच द्यायचे नाही या एकाच ध्येयाने शीरनाना खातच राहायचा. सरतेशेवटी एकदाची समाधानयुक्त ढेकर यायची, ढेकाराचा आवाज जणू काय कडकडून वीज पडावी असाच यायचा तो ऐकून लग्नघरातील लोकांचा जीव मग भांड्यात पडायचा. न जेवता देखील ५ ते ६ आडदांड लोकं जिथं शीरनानाला उठवायला लागायची तिथे त्याने जेवण केल्यावर किती लागावीत याचा अंदाज केलेलाच बरा. जेवण झाल्यावर शीरनानाचा मोर्चा मग पाराकडे वळायचा जिथे आधीच बैठकीत बसलेल्यांमध्ये शीरनानाचीच चर्चा चाललेली असायची पण शीरनाना येताच विषय बदलला जायचा, हे शीरनानाला देखील माहित होतं. पण तो कधीच असल्या गोष्टींवर चर्चा करीत बसला नाही. तो पारावर बसायला आलेला पाहून आपण चेंगरून जावू नये म्हणून काही लोकं आधीच जागा मोकळी करून द्यायची, अश्यावेळेस भीतीयुक्त आदर म्हणजे काय याची पुरेपूर प्रचीती यायची. मग पानासोबत गप्पांना देखील रंग चढायचा. शीरनानानी आत्तापर्यंत कुठेकुठे जेवणावळीचा धुव्वा उडविला याच्या सुरस कथा ऐकायला म्हाताऱ्यानसोबत तरणी पोरं आणि शाळेतील लहानसहान पोरं सुद्धा जमा व्हायची. तिकडं नवऱ्यामुलीची सासरी पाठवणी होत असताना होणाऱ्या रडारडीच्या आवाजापेक्षा इकड पारावर शीरनानाच्या गडगडाटी हास्याचा आवाज प्रचंड व्हायचा. अश्या रडारडीत कोण हसतंय म्हणून नवऱ्या मुलांच्या नातेवाईकांमध्ये चर्चा व्हयाची पण गावकऱ्याना या सगळ्या गोष्टींचा अनुभव असल्याने त्यांना याचे काहीच वाटायचे नाही. मग त्या गडगडाटी हास्यातच नवरीची पाठवणी केली जायची. जसजसा अंधार पडायला लागायचा तशी मग शीरनानाची घरी जाण्यासाठी चुळबूळ वाढायला लागायची. एका दोघांच्या खांद्यावर हात रेलून उठाच्या त्याच्या तयारीने लोकं बुड न झटकता टुन्नदिशी उडी मारून पाराखाली येत. एवढ्यात कोणी थांबवायला लागल्यावर, शीरनाना त्याला ‘आरं मर्दा, भाकर तुकड्याची येळ झाली. जर असाच बसून राहिलो अन चक्कर आली तर तू उचलून नेणार आहेस का घरी?” असं बोलल्यावर समोरचा माणूस गपगार व्हायचा, शीरनानाला उचलून नेण्याच्या कल्पनेनं नाही तर त्याच्या लगेच झालेल्या जेवणाच्या तयारीने.

परमेश्वराच्या कृपेने शीरनानाच्या घरी कोणत्याच गोष्टीला कमी नव्हतं, चांगली वीस एकर बागायती अन ती कसायला सालानी ठेवलेली गडी माणसं, लिंबोणीची बाग, आंब्याची बाग, दुभत्या गाया, घरात भरून वाहणाऱ्या धान्यांच्या कणग्या आणि बायकोसोबत त्याची ८ पोरांची छोटीशी टीम, आणि शीरनानाची म्हातारी आई. म्हातारी फक्त नावाला होती पण चाळीशीच्या बाईला लाजवेल अशी कामात तरबेज होती. आणि त्याची साक्ष म्हणजे म्हातारीचा एकही दात पडलेला नव्हता. म्हातारीचा शीरनानावर भारी जीव, एकुलता एक म्हणून त्याचे म्हणतील तितके लाड पुरवले होते. शीरनानाला कष्ट असे तिने कधीच पडून दिले नव्हते. त्यामुळे शीरनानाच्या लग्नात तीने नवरीच्या आई बापाला आधीच ठणकावून सांगितला होतं कि आम्हाला हुंडा एक छदाम मिळाला नाही तरी एक वेळेस चालेल पण मुलगी धडधाकट पाहिजे. आणि शीरनानाच्या नशिबाने त्याला एकदाची त्याच्या बरोबरीची मुलगी मिळालीच. लग्न ठरविताना म्हातारीने आधीच सांगतले होते कि, माझा सोन्या एकुलता एक, पण घरात बाळ गोपाळांची रांग लागली पाहिजे. शीरनानाच्या ८ पोरांना बघून त्याची खात्री पटावी. म्हातारी असे पर्यंत शीरनानाला घरात कधीच लक्ष दयावे लागले नाही. तो आपला कधी पारावर, कोणाच्या लग्नात, गावच्या बैठकीत नाही तर रानात त्याच्या जुळ्या आंब्याच्या झाडाखाली बसलेला असायचा. पण जशी म्हातारी एकदा अंथरूणाला खिळली तसा शीरनाना निम्मा अर्धा झाला, म्हातारीला देखील तीचा शेवट दिसतच होता पण जीव काही सुटत नव्हता. शीरनाना तिच्या डोक्याजवळच बसून होता. शेवटी शीरनानाची बायको पुढे झाली आणि म्हातारीला वचन दिलं कि तुमच्या मागं अगदी तुमच्या सारखीच शीरनानाची काळजी घेईल. या वाक्यासरशी म्हातारीच्या जीवात जीव आला इतके दिवस पडून राहिलेली म्हातारी उठून बसायचं म्हणाली. लोकांमध्ये चुळबूळ सुरु झाली कोणाला काहीच समजेना. शीरनानाचा हात हातात घेवून म्हातारीने लहानमुलाच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवावा तसा शीरनानाच्या तोंडावरून हात फिरवला. म्हातारीच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर एक समाधान पसरलं, तिनं सुनेचा हात हातात घेवून प्रेमाने तिच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच, माझ्या पोराचा सांभाळ कर असं तिला सांगितलं. सुनेने पण म्हातारीचा हात दाबत हमी भरली. त्यासरशी म्हातारीने बसल्या जागीच समाधानाने शीरनानाकडे बघत डोळे मिटले. शीरनाना कीतीतर वेळ एकटक म्हातारीच्या तोंडाकडे बघतच राहिला त्याच्या मनात म्हातारीचा डोळा लागलेला असेल पण म्हातारीचा जीव समाधानाने शरीरातून कधीच निघून गेला होता. म्हातारीने शेवटी आपला शब्द खरा करून दाखवला होता, या जन्मात कधीच आडवं पडून मरणार नाही तर बसल्या जागी शेवटचे डोळे झाकल. शीरनानाला रडूच फुटत नव्हतं कारण म्हातारी गेली यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. शेवटी त्याच्या बायकोने शीरनानाचा हात हातात घेवून म्हातारी आता आपल्यात राहिली नाही म्हणून मानेने खुणावलं तसं शीरनानाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलत गेला. आज पर्यंत शीरनानाला रडणे म्हणजे काय हे माहीतच नव्हतं, लहानमूल जसं आई समोर दिसत नसल्यावर धायमोकलून रडायला लागतं तसा शीरनाना रडायला लागला. सगळ्या गावाला त्याच्या रडण्याला कशाची उपमा दयावी सुचत नव्हतं. आजपर्यंत गडगडाटी हास्य अनुभवलेल्या गावकऱ्यांच्या डोळ्यात शीरनानाच्या या रडणाऱ्या रुपाकडे पाहून रडू कोसळ होतं. फक्त बायामाणसंच नाही तर गाडीमाणसं सुद्धा रडायला लागली होती. बायकोच्या गळ्यात पडून आईचा हात हातात घेतलेल्या शीरनानाकडे पाहताना, एका आईकडून दुसऱ्या आईकडे लहान पोरगं सोपवतीये असं चित्र दिसत होतं. अख्ख्या गावात स्मशान शांतता पसरलेली होती सगळा गाव शीरनानाच्या घरापाशी त्याचे सांत्वन करायला लोटलेला होता. जो तो शीरनानाची समजूत काढत होता कायम हसताना पाहणाऱ्या शीरनानाला रडताना पाहून समोरच्या माणसाच्या डोळ्यात आपोआप पाणी येत होतं. ते पूर्ण १३ दिवस सगळा गाव शीरनानाच्या भोवतालीच असायचा, सगळे असून सुद्धा शीरनाना आपला शून्यात एकटक बघत बसायचा. लोकांना त्याच्या या अवस्थेचं खूप जास्त वाईट वाटत होते. त्यानंतरचे बरेच दिवस शीरनाना ना पाराकडे वळला ना कोणाच्या कार्यक्रमाकडे. आणि त्याच्या अनुपस्थितीने कोणत्याच कार्यक्रमाला रंगत चढत नव्हती इथेही शीरनानाचीच चर्चा व्हयाची पण यावेळेस त्याच्या खाण्याबद्दलची नाही तर त्याच्या दुःखाची.

जसे दिवस सरत गेले तसं शीरनानाने स्वतःला सावरलं आणि एके दिवशी त्याची पावले पुन्हा पाराकडे वळली. त्याच्या येण्याने सगळेच सुखावले. परंतु शीरनाना आता पहिल्यासारखा राहिला नव्हता, त्याच्या वागण्याबोलण्यात एक प्रकारची गंभीरता आली होती जी कोणालाच हवीशी नव्हती. अशातच सगळ्यांनी ठरवल्याप्रमाणे नाटक सुरु केले. तुक्या म्हणाला ‘पोराचं लग्न झालंय  तवापास्न लयीच वंगाळ घडाय लागलंय. काय मेळ लागाना असं झालंय’ तेवढ्यात सदा बोलला ‘आरं तू अडाणी तर अडाणीच राहणार लेका. लग्न झालं खरं पण तू अजून जागरण गोंधळ कुठं घातलंय लग्नाचं, भैरुबा मग असाच तुज्यावर नाराज हुनार. तवा पयल्यांदा जागरण होवू दे अन ते पण तिखटाचं. मग बघ सगळं कसं काय सुरळीत होतंय ते. काय वो शीरनाना....’ सगळ्यांचा होरा होता कि, जेवणावळ होणार आणि ती पण तिखटाची म्हंटल्यावर शीरनाना उभी मांड ठोकून तयार होणार. पण घडलं भलतंच, शीरनाना खाली मान घालून बसल्या जागेवरून कसाबसा स्वतःला सावरत उठायला लागला तसा एका दोघांनी आधाराला आपला खांदा पुढं केला पण शीरनानाने दुर्लक्ष करत सगळा भार आपल्या तळहातावर पेलून उभा राहिला आणि पारावरून उतरून घराकडं निघाला. सगळी एकदम चिडीचूप झाली, कोणाचाच आवाज बाहेर पडणं असं झालं. एवढ्यात सदानं आवाज दिला ‘ शीरनाना...काय झालं? अन तुकाच्या जागरणाचं काय करायचं?” चालता चालता शीरनाना थोडा थबकला आणि मागं वळून घोगऱ्या आवाजात बोलला “गड्यानू, आता पयल्यासारखी जागराणं सहन नाही होत....” असं बोलून पुन्हा घराकडं जायला वळला. तसा पारावरच्या लोकांच्या श्वासासोबत झोंबणारा वारा देखील काही काळासाठी स्तब्ध झाला.   

क्रमश....  

-सुरेश सायकर

Wednesday 10 December 2014

माझं एक गाव आहे….



माझं एक गाव आहे, म्हणजे स्वतःच आहे असंच म्हणावं लागल ?
कारण मी अगदीच वर्षातून एखाद-दुसऱ्यांदा जातो,
कारणं अनेक असू शकतील परंतू महत्वाचे म्हणजे पोट आहे,
तसं गावात राहणाऱ्यांना पण असतं,
पण आमची भूक काही वेगळीच आहे, आमचे पोट कधीच भरत नाही,
नेहमी त्यात काहीतरी टाकावंच लागतं....

गाडीतून जाताना स्वतःच्या रानात उगवलेली बाभळीची झाडं पहिली,
शहरातल्या माणसाला ती पेरणी करून अन निगा राखून जगवलेली वाटावी,
इतकी दाट आणि पूर्ण रानात पसरलेली होती,
वाटलं गाडीतून उतरावं आणि सरळ कुऱ्हाडीचे घाव घालून तोडून टाकावीत,
कुऱ्हाडीला धार होती पण घाव घालण्याचे बळ कोठून आणणार,
ते बळ तर शहरात राहून बीळबिळीत झालं होतं.....

वडील म्हणायचे शेवटचे दिवस सुखात घालवणार स्वतःच्या रानात राबत-राबत,
पण शहरातून त्यांची सुटका झाली पण ती जीव गेल्यावरच,
स्वतःच्या रानात फक्त सरणावर देह जळत होता ज्याला स्वतःच असं काहीच माहित नव्हतं,
स्वतःच्या रानात जळण्याचे सुख देखील....  

माझी पण इच्छा आहे, शेवटचे दिवस सुखात स्वतःच्या रानात कष्ट करून व्यतीत करायची,
दंडात फक्त दिसणाऱ्या  बेट्कुल्यांची  परीक्षा घ्यायची,
बहुतेक ती देखील पूर्ण होईल, पण शहरातून सुटका झाल्यावरच....वडिलांसारखी

-सुरेश सायकर                      

Friday 28 November 2014

विवाहित विधवा.... (लघुकथा)



आज रविवार, सुट्टीचा दिवस आठवड्यातील हा एकच दिवस असा कि ज्याची मी खऱ्या अर्थाने आतुरतेने वाट पाहत असते. आज मोबाईलचा गजर होणार नव्हता कारण आदल्या रात्रीच मी तो ऑफ केला होता. तसं दर शनिवारी करतेच यांत्रिकपणे, मोबाईलचे बरे असते म्हणजे आपल्याला जसं हवं तसं त्याला आपल्यासाठी वापरता येतो. पण माणसाचे तसे नसते त्यांना भावना असतात, रविला मात्र हेच कळले नाही. रविचे नाव मनात आल्याबरोबर आळसासोबत झटकून अंथरुणावरून उठले. त्याचे नाव देखील मनात येणे माझ्यासाठी सकाळी सकाळी मूड खराब करण्यासाठी पुरेसे होते. देवेन अजून झोपला होता अगदी लहान बाळासारखा निरागसपणे. आज जरी तो अकरावीच्या वर्गात शिकणारा, कॉलेजमध्ये जाणारा तरुण असला तरी आजही तो माझ्यासाठी १० वर्षाचा देवू होता रवी जेव्हा सोडून गेला तेव्हा. परत तेच त्याची आज अशी आठवण का व्हावी हेच कळत नव्हते. आठवड्याभराची कामं पडलेली होती ती करण्यासाठी माझ्याशिवाय देवेन शिवाय घरात दुसरं कोण होतं. देवेन जरी समंजसपणे स्वतःची कामे स्वतः करी असला तरीही एक आई म्हणून आणि घरातील स्त्री म्हणून बरीच कामे मलाच पार पडावी लागत होती. आठवड्याभरचा कपड्यांचा ढीग, घरातील साफसफाई, त्यातून मिळालेला वेळ म्हणजे शरीराला आराम आणि मनाला मिळणारा आराम म्हणजे देवूला जास्तीचा देऊ शकणारा वेळ.

आज खरंच अंथरुणातून उठावसं वाटत नव्हतं, कारण एक तर बाहेर पडलेली डिसेंबरची छान थंडी आणि  अंथरुणामध्ये पडल्या पडल्या हवासा वाटणारा आयता वाफाळणारा चहा. नवीन लग्न झाल्यानंतर रवी बनवून दयायचा छान दुधाचा आले टाकलेला चहा, इतकं नशीबवान समजायचे स्वतःला कि स्वतःचीच नजर लागेल कि काय म्हणून भीती वाटायची. रवी खरंच खूप समंजस होता मग नेमकं कोणाचं चुकलं, स्वतःला कधीच स्वतःची चूक असेल असं वाटत नाही हे मला समजून देखील मी चुकत नव्हते यावर आजही मी ठाम आहे. मग नेमकं काय झालं? आता खरंच उठून कामाला लागायला हवं असं जाणवलं कारण विचार करण्याच्या पलीकडल्या घटना या मधल्या काही वर्षात घडून गेल्या होत्या. विचारातच पाय फरशीवर ठेवले आणि गारठलेल्या फरशीची थंड कळ मेंदूपर्यंत गेली. एका अर्थी बरंच झालं कारण अश्या शॉकची गरजच होती भूतकाळाच्या आठवणींमधून बाहेर पडायला. 

माझ्या आवाजाने देवूने झोपेत चाळवत कूस बदलली आणि मी माझ्या विचारांची. ग्यास पेटवला एका  बाजूला अंघोळीसाठी पाणी आणि दुसऱ्यावर चहा ठेवला आलं टाकलेला. ब्रश करून येईपर्यंत चहा चांगलाच उकळला होता. यांत्रिकपणे चहा बनवायला सोप्पा असतो पण तो बनवताना त्यामध्ये योग्य प्रमाण राखत मिसळलेले दुध, साखर, चहा पावडर आणि चवीसाठी आलं आणि तो बनत असताना त्याचे होणारे एकत्रीकरण बघणे हे समीकरण जर योग्य पद्धतीने जुळून आले तरच चहा छान होतो अश्या विचारांची मी मग लग्न संस्थेमध्येच का मागे पडले? चूक फक्त माझ्या एकटीचीच होती का? उत्तर नाही असंच होतं.

चहा कपामध्ये ओतून मी बाहेर आले तर देवू अजून मस्तपैकी झोपलेला होता. पेपर घेण्यासाठी दरवाजा उघडला तशी हवेची थंडगार झुळूक अंगावर आली. हातातल्या कपातील गरम चहाचा केवढा आधार वाटला त्यावेळेस हे शब्दात देखील कोणाला सांगू शकणार नाही आणि सांगणार तर कोणाला कारण देवू आता पहिल्या सारखा राहिलेला नव्हता आता त्याचे विश्वच बदलून गेले होते. कॉलेजला जायला लागल्या पासून बऱ्याचश्या गोष्टी त्याला समजू लागल्या होत्या. बापाविना सांभाळणारी आई, हि संकल्पनाच आपल्या व्यवस्थेने मान्य केली नव्हती आणि त्यातल्या त्यात पटत नाही अश्या फालतू कारणाने स्वतःच्या जबाबदारी पासून पळून गेलेल्या रवी सारख्या तकलादूनीच बनवलेली हि व्यवस्था असल्याने त्याकडून अपेक्षा ती काय करणार. पेपर घेवून दरवाजा लावून घेतला पण डोक्यात चालणाऱ्या विचारांचा मात्र उघडा ठेवून. बाहेर पडलेली मस्त थंडी त्यात पेपर वाचत असताना वाफाळणारा चहा असलं भारी कॉम्बिनेशन बऱ्याच दिवसानंतर अनुभवत होते. गरम चहाचे घुटके घेत घेत सगळा पेपर चाळून झाला विचार करून जड झालेलं डोकं आता खरंच खूप हलकं वाटत होतं. सहवासाची हि संकल्पना माझ्यासाठी तरी खूपच महत्वाची होती. पुन्हा पुन्हा भूतकाळात जावून मेलेली आठवणींची प्रेतं उकरून काय हाशील होणार हे माहित असून देखील मन एकसारखं पुन्हा तिथेच रमत होतं.

विचारांची तंद्री एकदम भंग झाली ती ग्यासवर अंघोळीसाठी पाणी ठेवल्याच्या आठवणीने. उठून स्वयंपाकघरात गेले तर पाठोपाठ देवू आत आला आणि मला जरा काम आहे महत्वाचे त्यामुळे लवकर अंघोळ करून जायचं म्हणाला आणि माझ्या प्रतिक्रियेची वाट न पाहता दात घासायला सरळ बाथरूममध्ये शिरला. मी स्तब्ध, रविवारच्या दिवशी असं काय त्याचे महत्वाचे काम कि ज्यासाठी घाईघाईने उत्तराची वाट न पाहता सरळ आत निघून देखील गेला. त्याच्या कलाने घ्यायचे अश्या विचाराने मी शांत झाले. दात घासून बाहेर आला मी चहाचा कप त्याच्या हातात दयायला लागले तर ठेव म्हणाला. एकवार मी त्याच्याकडे आणि मग चहाच्या कपाकडे पहिले तर तो वाफाळणारा चहा थंड वाटला आणि देवू देखील. त्याला त्याच्या वडिलांकडून रक्तातून मिळालेला हा गुण होता कि अवगुण देव जाणे. कोणतंही मनासारखं घडलं नाही कि प्रतिक्रिया एकदम थंड असायची, ‘ठेव’, ‘बरं’ ऊहुं’ ‘नको’ अशी. तरीही मी जास्त विचार न करता विचारलं चल सांग, नाश्त्यासाठी काय बनवू. तुझ्या आवडीचे शेव टाकून पोहे कि मस्त उपीट चहाचे घुटके घेत खाली बघत फक्त ‘काही नको’ इतकंच बोलला. त्याच्या बाजूला बसले आणि त्याच्याकडे बघत त्याला विचारलं ‘कोणी काही बोललं का? म्हणजे कॉलेजमध्ये काही घडलं का?  चहाचा शेवटचा घुटका घेत उठून उभा राहत बोलला काहीच नाही घडलं आणि जरी काही घडलं तरी मी तुला सांगेलच अशी अपेक्षा कशाला करतेस’ अश्या तुटक वागण्याने मी आधीच कोलमडून गेलेली कशीबशी उभी राहू पाहत होते तर देवूच्या अश्या वागण्याने पुन्हा कोसळून जाईल पुन्हा न उठण्यासाठी असं वाटायला लागलं. तरीही संयमाने घेत ‘ठीक आहे’ इतकंच म्हटलं आणि उठून आत जायला लागले तर ‘कॉलेज मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि मी त्यामध्ये मी स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे आणि त्या  संदर्भात कॉलेजच्या आवारात आमची मिटिंग आहे म्हणून घाई करत होतो.’ देवूने एका दमात सगळं सांगून टाकलं. आता मळभ दूर झाला होता बरं वाटलं त्याने मनमोकळेपणाने सांगितल्यावर आणि आनंद जास्त झाला कि कारण तो आता चांगल्या संगतीमध्ये घडत होता. मी पुन्हा त्याच्या शेजारी बसले त्याच्याकडे पाहत विचारलं ‘मग आज संध्याकाळी तुझ्या आवडीच्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं’ स्वारी एकदम खुष कारण त्याला त्याच्या आवडीच्या हॉटेलपेक्षा आईची सोबत मिळणार होती याची पुरेपूर जाणीव मला होती. देवू हसत म्हणाला ‘ठीक आहे, आता मला आवरून घेवू दे उशीर होतोय’ आणि घाईघाईत उठून अंघोळीला गेला. त्याला पाठमोरा पाहत स्वतःशीच हसायला लागले. लगोलाग स्वारी आवरून तयार देखील झाली नाश्तासाठी थांब म्हंटल तर मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये प्लान बनवलाय असं सांगून छान हसत बाय करून गेला देखील. देऊच हसणं अगदी माझ्या सारखं गोड. म्हणजे तसं कोणी सांगितलं नव्हतं पण मी आरश्यात स्वतःला न्ह्याळत स्वतःशीच हसताना पहिल्याचं आठवलं पण हे नक्की आठवत नव्हतं कि मी स्वतःला शेवटचं कधी आरश्यात न्ह्याळून पाहिलं ते. 
                        
माझी नोकरी मल्टीनेशनल कंपनीमध्ये हुद्दा मोठा नव्हता पण खर्च वजा देवूच्या भविष्यातील शिक्षणासाठी बचत बऱ्यापैक्की होत होती. घरापासून ऑफिसचे अंतर दीड तासाचे, सकाळी ९ वाजता निघाल्यावर कॅब बाकीच्यांना पिकअप करून १०.३० पर्यंत ऑफिसला पोहचायची आणि मग उशिरा निघून ट्राफिकमधून वाट काढत रात्रीचे ११.३० वाजायचे पोहचायला. आधार एका गोष्टीचा खूप जास्त होता आणि तो म्हणजे माझे माहेर. 

मी सध्या राहत असलेल्या घरापासून जवळ होते म्हणून देवूच्या जेवणाची काळजी करायची मला अजिबात गरज नव्हती. स्वतःचे आटपून तो कॉलेजला सकाळी ७ वाजता जायचा तेवढा माझ्या हातचा नाश्ता करून आणि त्यानंतर दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण आजीच्या घरी. आईचा केवढा मोठा आधार वाटायचा म्हणून सांगू. माझ्या प्रत्येक अडचणींच्या वेळेस ती माझ्या मागे उभी राहायची तशी आजही आहे. माझ्या प्रेमविवाहाला वडिलांसोबत दादाचा देखील विरोध होता तरीही माझ्या सुखात आनंद मानून आई माझ्या मागे उभी राहिली होती त्यावेळेस. रवी सोडून गेल्यावर मी स्वतंत्र राहायचे ठरवले तर बाबांनी घर डोक्यावर घेतले होते त्यांची इच्छा होती कि मी त्यांच्या सोबतच राहावे पण प्रत्यक्षात ते शक्य नव्हते कारण घरात आई, बाबा, मोठा दादा, वाहिनी, त्यांची दोन मुलं आणि त्यात आमची भर म्हणजे अधिकचा भार. त्यात दादा वाहिनीच्या स्वातंत्र्यावर एकप्रकारे माझा घालाच की, म्हणजे मी तिथे राहिले असते तर त्यांना मनमोकळेपणाने वागता आलं नसतं एवढं समजण्या इतपत ज्ञान माझ्याकडे होते. त्यामुळे आई वडिलांच्या जवळच भाड्याने घर घेवून राहायचे ठरवले. देवू रात्रीचे जेवण करून आला कि माझ्यासाठी डब्बा घेवून येत असे. मग उशिरा घरी आल्यावर फक्त अन्न गरम करून घ्यायचे. बाबांची खूप तळमळ व्हायची, रोज चक्कर मारून देवू घरी व्यवस्थित आहे ना याची काळजी घेत. लग्नाला आलेली मुलगी जशी वडिलांच्या काळजीचा विषय असतो तशीच काळजी लग्न होवून आपल्या मुलासोबत एकटी राहणाऱ्या मुलीची देखील असते. बाबा मला अजूनही दुसऱ्या लग्नाचा आग्रह करीत होते पण एकदा हात भाजल्यावर पुन्हा तो मूर्खपणा न करण्याच्या विचारांची मी होते. त्यामुळे मी दुसऱ्या लग्नाचा विचार अजिबात करणार नाही यामुळे त्यांचा त्रागा जास्तच व्हायचा. मी समजू शकत होते वडिलांचे दुःख, आता ठीक आहे पण उतार वयात सोबत हवी असते अश्या विचाराचे ते असल्यामुळे त्यांची समजूत मी काढण्याचे सध्या बंदच करून टाकले होते. मला होती सोबत माज्या देवूची तो माझ्या कष्टांना वाया जावू देणार नाही याची पुरेपूर खात्री होती मला. आज रविवार, म्हणजे बाबांची इकडे कोणत्याही क्षणी धडक होणार आणि चहाचे घुटके घेत गाडी पुन्हा पूर्वपदावर घसरणार याची मला खात्री होती. मग त्यांची समजूत काढत काढत त्यांच्या आवडीचा गोड शिरा करून दिला कि मग तो संपेपर्यंत तेवढी शांतता आणि मग थोड्यावेळाने समजावण्याच्या सुरात पुन्हा आग्रह पण तो आधीच्या सुरासारखा नसून गोड झालेल्या असे शिरयासारखा. मग माझी बाजू लढवण्याचे नेहमीचे कार्य त्याच जोमाने मी करे. कारण कॉलेजवयीन मुलाच्या आईसोबत लग्न करायला कोण तयार होणार आणि झालाच तर तो देवूची काळजी कितपत घेणार आणि तोही रवी सारखा फसवा निघाला तर. अश्या प्रश्नांची माझी सरबत्ती झाल्यावर बाबा लगेच डिफेन्स मोड मध्ये जायचे, लग्न झाल्यावर एड्जस्टमेंट करावी लागते असा त्यांचा नेहमीचा सूर. केली ना मी एड्जस्टमेंट रविसोबत चांगली ६ वर्ष आणि मग नंतर सुरु झाले वादविवाद आणि नवरेपणाची हुकुमशाही. तरीही त्यातून मार्ग काढायचा अश्याच विचारांची मी होते. पण तो पसार झाला न सांगता. सध्याचा ठावठिकाणा माहित नाही आणि मी शोधण्याचा प्रयत्न देखील केला नाही कारण अश्या पळपुट्याचे पाय धरण्यासाठी मी तयार नव्हते. कारण ज्याला जबाबदारीची जाणीवच नाही त्याच्या सोबत संसार करण्यात काय अर्थ आहे? माझ्या मनात स्वतःशी प्रश्नांची चालेली सरबत्ती काही केल्या संपणारी नव्हती. आता बाबा कधीही येतील आणि अंघोळ झालेली नाही हे पाहिल्यावर प्रचंड चिडचिड करतील या विचाराने भानावर येवून मी आवरायला घेतले. 

आंघोळ झाल्यावर पुन्हा एकदा चहा पिण्याची तलफ झाली आणि सोबत जगजितसिंहची गझल ऐकण्याची. माझ्या एकटेपणाला हीच तर साथ होती. कॅब मध्ये जाता, येताना हेडफोन कानात घातला घातला आणि गझल ऐकायला लागले कि दीड तासाचे अंतर कधी संपून जायचे समजायचे देखील नाही. चहा संपल्यावर आता आवरायच्या मोहिमेवर निघायचे होते. धुण्यासाठी कपडे भिजत घातले आणि संपूर्ण घर झाडून घेतले  कोपऱ्यात कोळ्यांच्या जाळ्या होत्या त्या झटकून टाकल्या. किती कष्टाने त्याने ते विणलेले असते याची कल्पना असून देखील कारण कोळी टपलेलेच असतात भक्ष्य आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी. कोळी, पुरुषांच्या रुपात देखील असतात सगळीकडेच, तेही एकटी बाई बघून जाळे टाकून टपलेले असतात, अडकवण्यासाठी. सुरुवातीला भीती वाटायची पण जेव्हा नवऱ्यासोबत असलेली बाई देखील सुरक्षित नसते हे पहिले तेव्हा माझ्या एकटेपणाची भीत वाटेनाशी झाली. आता पुन्हा विचारांशी लढाई चालू झाली मनात. त्यांना झटकून देत सगळा कचरा डस्टबीन मध्ये टाकला आणि झाडूला लागलेला कचरा ग्यालरीमधील भिंतीवर आपटून साफ करायला लागले. त्यासरशी खालच्या ग्यालारीमध्ये उभा असलेला एकजण पेपर वाचत उभा होता, कोठून कचरा येतोय म्हणून वर पाहू लागला. मला पाहिल्यावर काहीही न बोलता पुन्हा आपल्या जाग्यावर जावून पेपर वाचू लागला. मी राहत असलेल्या इमारतीमध्ये नुकतेच रहायला आलेले ते नवीन बिऱ्हाड होते. नवरा, बायको आणि दोन मुली असा चौकोनी आणि सुखी संसार.

खूप असूया वाटायची जेव्हा दोन मुलींसोबत तो नेहमी खुश दिसायचा आणि ती देखील. तसं आमच्यात बोलणं व्हावं असं काही घडलंच नाही. माझी सकाळी लवकर कामाला जायची घाई आणि तिची मुलींना शाळेत आवरायची घाई आणि त्यातही खालच्या मजल्यावर राहत असल्याने फक्त जिन्याने जाता येता त्यांचा येणारा आवाज. हा अपवाद फक्त रविवारचा, म्हणजे समजा दारात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा नळाला कधी प्रेशरमुळे पाणी नाही आलं तर खालच्या मजल्यावर जावं लागायचं तेव्हा हमखास  बोलणं व्हायचं पण तेही अगदी जुजबी ‘आवरली का कामं..वगैरे वगैरे’ कारण त्यापेक्षा जास्त काही बोलावं असं घडलंच नव्हतं. पण एकूणच तिच्या वर्तनावरून ते अगदी सुखी कुटुंब असावं असं ताडलं होतं. आणि नेमकं हेच माझ्या असूयेचे कारण असावे असं वाटतं. कारण माझ्या वाटेला नाही पण दुसऱ्याला कसं काय? हे जेव्हा एखाद्याच्या मनात येतं ना नेमकी त्याच अवस्थेला असूया असं म्हणतात किवां म्हणत असावेत. हा एकमेव अपवाद सोडला तर एखाद्याविषयी असूया वाटावी असा माझ्या आयुष्यात कधी घडलंच नव्हतं. किवां घडलेच तरीही ते फक्त ऑफिसमध्येच पण तेव्हा देखील समोरच्याची इतकी काळजी घेणारे स्वतःच्या घरी आपल्या बायको मुलांची देखील तितक्याच आस्थेने विचारपूस करीत असतील का? असा प्रश्न निर्माण व्हयाचा आणि उत्तर जणू माहित असल्याच्या अविर्भावात माझ्या मनात असूयाच निर्माण नाही झाली. पण या कुटंबाबद्दल असूया निर्माण व्हायला अनेक कारणं होती आणि पण समक्ष डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टी मी नाकारूच शकत नव्हते. कारण अनेकदा मी पाणी भरायला खाली आल्यावर त्याला घरातील केर काढताना, अंथरुणच्या घड्या घालताना पाहिलं होतं. मुलींसोबत मस्तपैकी मित्रासारख्या गप्पा मारताना ऐकलं, त्या म्हणतील त्या खेळामध्ये सहभागी होवून त्यांच्या सारखं लहान होवून खेळताना ऐकलं आणि पाहिलं देखील आहे. याचबरोबरीने त्या दोघांमध्ये वादविवादाचा एखादा प्रसंग देखील ऐकला नव्हता. मग एवढं सगळं असताना असूया निर्माण होणे साहजिकच आहे आणि तेही माझ्यासारख्या संसार नामे विवाह संस्थेमध्ये पोळून निघालेल्या अनुभवी व्यक्तीकडून. कारण फक्त एका हाताने टाळी वाजत जर नसेल तर फक्त चूक माझीच नव्हती हे समजून घेण्याइतपत शहाणपण रवीच्या डोक्यात का नाही आलं? पुन्हा तेच, टाळू पाहणारा विषय म्हणजे रवी. आज एकसारखा का बरं डोक्यात येतोय काहीच कळेना. असूयेतून आणि विचारातून पुन्हा बाहेर पडून कामे लवकर आटपून घ्यावी लागणार कारण आज बाहेर जेवणाचा प्लान बनवलेला होता देवूसोबत या आठवणी बरोबर हात यांत्रिकपणे चालू झाले.

देवूने छान पैकी आवरून घेतले होते. लहान मूल ते एका तरुण मुलामध्ये त्याचा होणारा बदल मी स्वतःच्या डोळ्याने पाहत होते म्हणण्यापेक्षा अनुभव होते कारण कोणत्याही छोट्या गोष्टींसाठी त्याने कधीही हट्ट असा केला नाही. तसा रुसायचा पण तेही काही क्षणा पुरताच पुन्हा गाडी रुळावर यायची आणि मग सुसाट सुटायचा शाळेत घडलेल्या गोष्टी सांगण्यात, मी पाहतच बसायची त्याच्याकडे. मला म्हणाला आई आज जीन्स आणि टॉप घाल. ऑफिसमध्ये जाते ना नेहमी शुक्रवारी घालून तसा. मला एकदम अजबच वाटलं त्याचं बोलणं ऐकून कारण त्याला मी असे जीन्स टॉप घालून गेलेलं कधीच आवडलं नव्हतं. त्याच्या वडिलांना तरी कधी आवडलं म्हणा म्हणजे लग्नाच्या आधीपासून मी घालायची तेव्हा वारेमाप कौतुक पण लग्न झाल्यावर हक्क निर्माण झाले आणि त्या मग हक्कातून हुकुमशाही. काय घालायचं आणि कसं राहायचं याचा तक्ताच तेवढा राहिला होता घराच्या भिंतीवर टांगायचा. 

पण आज देवूच्या अश्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं क्षणभर पण लवकर आटप उशीर होतोय असा तगादा लावला त्याने. आवरून बाहेर आले तर अजून एक आश्चर्याचा धक्का. ‘आजची पार्टी माझ्याकडून’ असं त्याने जाहीर केलं. पार्टी देण्याइतपत अजून तो सक्षम झाला नव्हता हे मलाच माहित आणि तरीही याच्याकडे या वयात एवढे पैसे आले कुठून असा प्रश्न येणे साहजिकच होतं. मी विचारलं तर म्हणाला ‘तुला सांगितलं होतं ना कि आमच्या कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे म्हणून तर त्याला कधी नव्हे तर यंदा प्रायोजक मिळाला आणि त्याने अडव्हांस मध्येच पैसे देवूनही टाकले. मग काय ज्याने हा कार्यक्रम करण्याचा घाट घातला होता तो माझा जवळचा मित्र त्याने विचारले, ‘देवू’ तुला आता पैसे ‘देवू’ का कार्यक्रम पार पडल्यावर ‘देवू’. मला तर कार्यक्रम पार पडण्याची वाट पहायचा धीर होत नव्हता तुला कधी एकदा सरप्राईज देतोय असं झालं होतं. म्हणून आजची ट्रीट माझ्याकडून.’ त्याच्या या बोलण्याने माझा सुटलेला संयम कसाबसा सावरला, आवंढा गिळत डोळ्यातील आनंद्श्रू कसेबसे थोपवले. कसं व्यक्त व्हावं हेच सुचत नव्हते क्षणभर जाग्यावरच थबकले तर देवूने मला हाताने सावरले. खूप आधार वाटलं त्या हातांचा आणि भीती देखील कारण तीच अधीरता आणि तीच घाई मला दिसत होती कि जी रविमध्ये होती. रवी सारखा देवू पण जाईल का मला सोडून? या भीतीने क्षणभर काटाच आला. देवूने मला हलवून वास्तवात आणले मी स्वतःशीच हसले. कारण मला देवू आता मोठा आणि जबाबदारीने वागणारा घडू लागल्याचे दिसत होते. आणि हा क्षण साक्षात परमेश्वर देखील माझ्याकडून हिरावून घेवू शकणार नव्हता. त्याने जवळ जवळ ओढतच मला बाहेर घेतले घराला कुलूप लावले आणि नेहमी चावी माझ्या पर्स मध्ये ठेवणारा आज स्वतःच्या खिशात चावी ठेवून चल म्हणाला आणि एखादया लहान मुलासारखा हसत जिन्याच्या पायऱ्या उतरू लागला. माझ्यासाठी जणू आकाशच ठेंगणे झाले होते. त्याच्या पाठमोऱ्या जाण्याकडे पाहत मी हात जोडून परमेश्वराकडे पहिल्यांदाच काहीतरी मागितले आणि ते म्हणजे देवूची  निरागसता अशीच टिकून राहावी....कायमची.          
 
क्रमशः

- सुरेश सायकर                                              .                                                                                                                                                                                                                                                     

Thursday 13 November 2014

धूळ...मनातली

नोकरीचं ठिकाण, कुमठेकर रोड (लक्ष्मी रोडचा जुळा भाऊ ‘खरेदीदारांसाठी’) पार्किंगच दिव्य तिथे गाडी लावणाऱ्यालाच माहित.

अशातच सम आणि विषम तारखांचा मेळ बसवत सकाळी लवकर दुचाकी पार्क केली कि तिचे दर्शन डायरेक्ट संध्याकाळीच. उशिरा ऑफिसातून खाली आलो आणि गाडी काढायला लागलो तर हेडलाईटचे पूर्ण कव्हर कोणी महाभागाने तोडून टाकले होते. थोडी जागा मिळाली असेल आणि त्या जागेच स्वतःची दुचाकी कशीबशी लावली असेल (मुंबईच्या ट्रेन मध्ये कसे एकमेकांना चिटकून एकमेकांच्या काखेतल्या घामाचा वास घेत कसेबसे उभे असतात तशीच अवस्था दुचाकींची लक्ष्मी रोड आणि कुमठेकर रोडवर होते) नंतर गाडी काढताना गाडीचे हेन्डेल माझ्या दुचाकीच्या कव्हर मध्ये अडकून ते तुटून पडले असणार. प्रचंड संताप आला एक तर दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना (हा दर महिन्याला येतच असतो, पण का?). नेहमी गाडी स्वच्छ ठेवणारा त्यात दुचाकीचा दर्शनी भागच तुटलेला असल्यामुळे गाडीची शान कमी होत होती. खूपच अपसेट झालो, मनातल्या मनात शिव्यांच्या लाखोल्या वहिल्या. गाडीच्या समोर उभा राहून पाहिलं, तर एखाद्या सुंदर मुलीच्या चेहर्यावर एखादा डाग असेल तर कशी हळहळ वाटते (म्हणजे आपल्याच मनातल्या मनात...जाहीररीत्या व्यक्त्य झाल्यास काय होईल?... हळहळ नाही म्हणत ‘ती’ व्यक्त झाली तर काय होईल हे म्हणतोय).

थोडं निरखून पाहिलं, आता तुटलेला कव्हर दिसत नव्हता तर त्याच्या आतमध्ये साठलेली धूळ दिसत होती. गाडी नेहमी प्रमाणे स्वच्छ दिसत होती पण बाहेरूनच, फक्त आतमध्ये असणारी धूळ आत्ता दिसत होती, तेही कव्हर तुटल्यामुळे. माणसाचे मन पण असेच असतं ना?

वरून कितीही चांगला दिसणारा माणूस ‘आतमधून’ कधीच कळत नाही. किंबहुना दिसतच नाही, दिसते ते फक्त बाह्यांग, रंगवलेलं. तोंडावर चांगला बोलणारा आतून देखील तितकाच चांगला चिंतणारा असेल याची खात्री साक्षात परमेश्वर देखील देवू शकत नाही तर तुमचे आमचे काय. विश्वासातल्या माणसाने तुमचे मन दुखवावे आणि त्याच्या मनात तुमची असलेली त्याच्या दृष्टीने तुमची खरी प्रतिमा काय आहे हे दाखवावे  मग तुमची अवस्था काय होईल? अरे, हा माझ्या बद्दल नेहमी चांगला बोलणारा आज असा कसा काय बोलला. तुम्ही कोलमडून पडता कारण ज्याला तुम्ही अगदी जवळचा मानत असता त्याच्या मनातले तुम्ही जाणूच शकलेला नसता. म्हणजे तुम्ही त्याचे फक्त बाह्यांग पाहिलेलं असतं.  

आणि त्यातल्या त्यात दुसऱ्याला दुखावणारी ती व्यक्ती आपणच असेल तर?

आता माझ्या दुचाकीचे कव्हर तोड्नारयाचे आभार मानावेसे वाटतात, खूप चांगली शिकवण देवून गेल्यामुळे. कव्हर काय कधीही बसवू पण त्याआधी आतली धूळ कधी जमा होणार नाही याची काळजी घेवून...धूळ, आपल्या मनातली.

-सुरेश सायकर    

Saturday 8 November 2014

डूब रही है नैय्या, कूदो कूदो सोनी मैय्या...


विशाल समुंदर में कोंग्रसय्टानिक नामक जहाज दिशा भटकानेवाले तेज हवासे बचता हुआ अपने लक्श की ओर धीमे तेजीसे बढ़ रहा था. उसपर सवार अनेक यात्रियोंकी जान हलक तक आई थी. अब तक ये जहाज कितनेही ऐसे छोटे मोटे तुफ़ानोसे लड़ चूका था. पर इस बार की हवा कुछ और ही रंग दिखा रही थी. इस हवा का जोर नाकि सिर्फ़ जहाज की तेजी को रोकना था बल्की उसे समुंदर की तह तक डुबाने की फ़िराक में था. 

और इस विशाल जहाज का सारथ्य हमेशा की तरह कर रही थी एक जाबांज, कुशल, कॅप्टन सोनी मैय्या. जिन्हें ऐसी विपरीत परिस्तिथियोंसे लड्नेका ना ही सिर्फ़ ग्यान था बल्की हौसला बुलंद करके लढने के लिए उद्युक्त करवाने का जज्बा भी ठूंस ठूंस के भरा था. एकही वक़्त अनेक काम करने में वो बड़ी माहिर थी इस वक़्त वो जहाज चला रही थी और साथ ही में उन्होंने रानी झाँसी की तरह अपने नन्हे चालीस वर्ष आयु के राजकुंवर को अपने पीठसे बांध कर स्फुरण गीत गा रही थी (इटली का भाषांतर इस समय थोडा कठिन है...असो) और साथमे अपने साथियोंको साथ रहकर परिस्थितिकी सामना कर उसपर विजय पाने का हौसला बढ़ाने का कठिन कार्य भी कर रही थी. परन्तु, ख़ुद कॅप्टनके दिलमे इस वक़्त आशंकाओ ने डेरा जमा रखा था पर उन्होंने अपने चेहरे पर एक भी शिकंज न लाते हुए अपने सरदारोंको लढनेका आदेश दिया. नये भर्ती जोशीले सरदारोने फुर्ती दिखाई पर अनुभवी, थके हुए और लड़ाई का नतीजा लड़नेसे पहले ही जान चुकें सरदारोने अपनी तलवारे म्यान की हुई थी. उनके चेहरे पर ना ही वो पहेलेवाला जोश था ना ही लड्नेकी ताकत बची थी ना ही इच्छाशक्ति. वो किसी भी तरह अपने आपको डुबनेसे बचाने के योजना में व्यस्त थे. आज तक ऊँची रहेन-सहेन वाली, ऐशोआराम की जिंदगी प्रदान करनेवाले जहाज के डूबने की कुछ भी फ़िकर या चिंता उन्हें नहीं थी ना ही उसे बचाने के लिए इच्छाशक्ति उनके पास थी. बस्स अपनी लंगोटी बच जाये यही उनके लिए काफ़ी था. हर एक के मन में शंका थी पर कॅप्टन के सामने मुह खोलने की ताकत किसी में भी नहीं थी. ऐसे में एक सरदारने डेक पर जाकर परिस्थिति का जायजा लेने का नाटक किया और डेक पर पहुचते ही जीवरक्षक जेकेट चढ़ाकर ख़ुद को समुंदर में झोंक दिया. कॅप्टनने आवाज सुनी लेकिन एक के जाने से क्या फर्क पड़ेगा ये सोचकर आवाज को अनसुना कर दिया. इससे बाकी भगोड़े सरदारोंका मनोबल बढ़ गया (लढने के लिए नहीं बल्की लुंगी बचाकर भागने के लिए) उन्होंने भी एक एक कर जहाजसे विदाई ली. 

उसी वक़्त समुंदर से अनेक छोटी छोटी नाव जहाज का जो लक्श था उसी की और बढ़ रही थी. लेकिन हवा के जोर ने उनका भी मनोबल तोड़ दिया था. उनका लड़ने का मनोबल हिमालय की चोटी उतना  ऊँचा था पर उसके लिए जान बचाना भी जरुरी था. कठिन परिस्थिति के रहते उन्होंने परेशानियोंसे बचनेके लिए ‘हाथ’ मिलाते हुए जहाज का सहारा लिया. इससे कॅप्टनका का जोश दुगना हुआ उन्होंने अपने पीठसे बंधे नन्हे राजकुंवर की तरफ़ देखा तो वो मासूमियत भरे चेहरे से मुस्कुराते हुये अपने गालोंके गड्ढे को और गढ़ा करते हुए अपने कॅप्टन ममा की ओर देख रहा था. लेकिन जैसे ही कॅप्टन की नजर बचे हुए सरदारों पर गयी तो उनके हाथ कापने लगे. जहाज छोड़नेवाले उनके निष्ठावान सरदार ‘अनेक’ थे और जो जहाज पर चढ़े थे वे बस ‘कुछ’ ही थे. और जो बचे थे उनमें एक तो कुछ बच्चे थे और बाकी बचे हुए ‘कॅप्टन’ बनने की फ़िराक में.
ये देखकर कॅप्टन सोनी मैय्या के आन्खोंके सामने अंधेरा छाने लगा. उनकी दशा ऐसी थी की,    
हमको तो अप्नोंने लूटा गैरो में कहा दम था... मेरा जहाज डूबा था वहा जहा पानी ही कम था
 मराठी रुपांतर: आलीया भोगासी भोगलेची पाहिजे, आपुले मरण पहिले म्या डोळा – इति. अवध्या स्वामी

-सुरेश सायकर

This was written on 29.03.2014 before Election. So it's kind of Prediction & which was Very Much correct. Same was shared on Facebook as well on the same day....enjoy :)