Tuesday 25 August 2015

मी स्वतःला कोंडून घेतलंय.....

मी स्वतःला कोंडून घेतलंय, आपल्याच लोकांपासून,
काल परवा पर्यंतचे हेच माझे लोक, आता मला परके वाटू लागलेत...
दुष्काळात विषाची बाटली शेतकऱ्याच्या उशाशी अन
पाण्याने भरलेला तुपाचा डब्बा उगीचच वाहू देणाऱ्याच्या उशाशी...
पाण्याची गरज फक्त पिण्यापुरतीच नाहीये तर पोटच्या मुलांसारखं जपलेल्या पिकांसाठी आहे,
नळ उघडा राहून उगीच वाहून जाणारे पाणी,

शेतकऱ्याला दिले तर पाण्यावाचून तडफडून मरणाऱ्या जनावरांचा शाप लागणार नाही
स्वच्छ कपड्यांसाठी लागणारे जास्तीचे पाणी वाचवून,
शेतकऱ्याला दिले तर आत्महत्येचा डाग लागणार नाही...

टिळक तुम्ही आनंदाने केसरीत लेख लिहाल तिथे,
जेव्हा तुम्ही जन्माला घातलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा अर्थ लोकांना कळेल अन
बळजबरीने गोळा केलेली वर्गणी गरजू शेतकऱ्याला दिली जाईल अन तीही
आत्महत्येच्या आधी....
कारण खरा शेतकरी कधीही स्वतःच्या जमिनीचा लिलाव होत असताना,
मर्सिडीज मधून भाषणं देत फिरत नाही,
तर तो कुढत बसतो कर्जाच्या ओझ्याखाली अन मग संपवतो स्वतःला....
नाही, खरंच नकोय खोटी सहानुभूती आणि खोटी आश्वासनं,
आणी रडतोय असं वाटून तर अजिबात नकोय अहवेलना,
जर वाटत असेल ना रडतोय, तर या सर्व सोडून आणि फक्त एकच वर्ष राबून दाखवा काळ्या मातीत,
दिवसभर काबाडकष्ट करून पाऊस जेव्हा हुलकावणी देतो,
तेव्हा उद्या नक्की पडेल या आशेवर दुबार पेरणी होते,
ती नको म्हणत असताना तिच्या गळ्यातलं सौभाग्य गहाण टाकून,
पण पेरलेलंच बी जेव्हा बनावट निघतं, तेव्हा समजेल आत्महत्या का घडतात ते,
आणि असं फक्त एकाच वर्षी नाही होत तर होत राहत वर्षानुवर्षे, 
आणि मग तिच्या गळ्यातलं नसलेले सौभाग्य पाहण्यापेक्षा ते डोळे मिटलेलेच बरे....

-सुरेश सायकर