Thursday 15 December 2016

शहिदांची नेमकी व्याख्या कोणती ?

सीमेवर शत्रूसोबत दोन हात करीत लढताना वीरमरण आल्यावर सैनिक शहीद होतो. त्याला सरकारदरबाराकडून शहीदाचा दर्जा प्रदान केला जातो. हे अगदी योग्यच आहे, त्यांचे बलिदान नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. कारण तो देशातील अंतर्गत नागरिकांचे रक्षण करण्याच्या महान उद्देश्याने सीमेवर लढतो. सैनिक म्हणून हे त्याचे सर्वप्रथम कर्तव्य, आणि तो त्या कर्तव्याला पुर्णपणे जागतो आणि मरतो देखील.

पण जेव्हा देशाच्या अंतर्गत भागामध्ये काही आणीबाणीचे प्रसंग उद्भवतात जे नैसर्गिक नसतात. ज्याची पूर्णतः जबाबदारी लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या सरकारवर असते. अश्यावेळी ती जबाबदारी सरकारने स्वीकारून, त्यावर ताबोडतोब प्रभावी उपाययोजना राबवल्या पाहिजेत. देशाचा नागरिक म्हणून, देशहितासाठी  त्रास सहन करण्याची नागरिकांची तयारी असावी, अशी सर्वसाधारण धारणा असते. काही प्रमाणात ती योग्यदेखील आहे. देशहितासाठी घेतला जाणारा, एखादा निर्णय दूरगामी परिणाम करणारा असतो आणि त्याचा येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी फारच उपयोगाचा असतो. पण देशामध्ये प्रत्येक वर्ग वेगवेगळा असतो आणि तो वेगवेगळा स्तरावर मोजला जातो, कनिष्ठवर्ग,मध्यमवर्ग,उच्चवर्ग. प्रत्येकाच्या दैनंदिन आणि मुलभूत गरजा देखील वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कनिष्ठवर्ग पूर्णतः आणि मध्यमवर्गातील काही सुरुवातीचे घटक, हाती येणाऱ्या रोजच्या मिळकतीवर त्यांच्या दैनंदिन गरजा भागवत असतात. परंतु अश्यावेळी त्यांच्या दैनंदिन गरजांवर घाला घालणे, मानवनिर्मित उदभवलेल्या परिस्थितीवर वेळीच ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे न करणे. ससेहोलपट होत असताना, दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी, हाती निराशा लागणाऱ्या रांगांमध्ये उभे राहावे लागले, तरीही जनता हा त्रास सहन करीत कितीही काळ उभी राहते. अश्यावेळी त्यापैकी एखाद्याने जरी  बंडखोरीची भाषा वापरली तर त्याला शांत करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची उदाहरणे दिली जातात. निस्पृह सेवेसाठी कटीबद्ध असणारे, देशासाठी आपले प्राण न्योछावर करणारे आपले वीर सैनिक, ज्यांना गोळीच्या बदल्यात गोळी मिळते, पण तुम्हाला तर इथे पैसे मिळणार आहेत. मग कांगावा कशाला ??? प्रत्येक देशाचा  नागरिक, प्रचंड मातृप्रेमी असतो आणि तितकाच मातृभूमी प्रेमी देखील. जितकी श्रद्धा त्याची जन्मदात्या आईवर असते तितकीच आईचा दर्जा असलेल्या आपल्या मातृभूमीवर देखील असते. मग तो देश क्षेत्रफळाने प्रचंड प्रमाणात विस्तारलेला असेल किंवा अगदी बेटांच्या स्वरुपात तुकड्यांमध्ये विखुरलेला असेल. रांगांमध्ये उभे राहणाऱ्या नागरिकांना, सीमेवर लढणाऱ्या वीर सैनिकांचे उदाहरण देवून, एकाच पट्टीमध्ये मोजले जाते. पण मग जेव्हा रांगामध्ये उभे राहणारे सामान्य नागरिक जीवानिशी मरतात, तेव्हा त्यांच्या मरणाची अहवेलना का ??? त्यांचे मरण मोजताना ती पट्टी अचानक कुठे गायब होवून जाते ???

जिथे नक्षलवाद्यांसोबत दोन हात करीत असताना, वीरमरण आलेल्या पोलिसांना शहीदाचा दर्जा प्राप्त होत नाही, तिथे सर्वसामान्यांची काय टाप.

- सुरेश तु. सायकर   

Sunday 4 December 2016

...शेवटी सुधाकररावच

शेवटी सुधाकररावानां प्रोमोशन मिळून खुर्ची मिळालीच. इतके वर्ष ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो ‘सोनियाचा’ दिन त्यांनी छिनके, हिकमतीने मिळवून आपल्या आयुष्यात आणलाच. खुर्चीमध्ये स्थानपन्न झाल्यावर, त्यांनी खुर्चीवर विश्रांती न घेता दौऱ्याचा धडाका सुरु केला. पूर्वीच्या काळी जसे राजे-महाराजे सूत्रे हाती घेतल्यावर आपल्या राज्याचा दौरा करून सगळी परिस्थिती पहायचे. अगदी तसेच सुधाकररावांनी दौरे सुरु केले. जसे प्रत्येक ऑफिसमध्ये/दुकानामध्ये/कारखान्यांमध्ये अगदी मित्रांमध्ये दोन गट असतात, अगदी तसेच इथे देखील होते. सुधाकररावांना त्यांच्या ऑफिसमधल्या दुसऱ्या गटाच्या इतर सभासदांनी विरोध सुरु केला. असे राज्यभर उंडगायचा (पक्षी-दौरे) खर्च ऑफिसला पेलवणारा नाही, असं सूर सगळ्यांनी काढला. तरीही सुधाकरराव त्यांना बधले नाही. त्यांनी सगळे राज्य पायाखालून (पक्षी- विमानाखालून) घालवले. प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाचा डंका जोरजोरात वाजवला. अगदी तिथल्या स्थानिक रहिवाश्यांनी सुद्धा आश्चर्याने त्यांच्या पुढे मान झुकवली (खरं तर ती त्यांची, पाहुण्याचे स्वागत करण्याची पद्धत आहे.) असा चारही दिशांना आपल्या नावाचा गवगवा झाल्यावर, सुधाकरराव मनोमन सुखावले. अगदी त्यांच्या स्थानिक वर्तमानपत्रात देखील मानाचे फ्रंट पेजवरचे स्थान सुधाकररावांनी मिळवले होते. पण इकडे ऑफिसमधल्या विरोधकांची घालमेल जास्तच वाढू लागली. ‘ऑफिस म्हणजे फक्त सुधाकरराव’ (पक्षी- भारत म्हणजेच....श्री._ _ _ बस्स का राव...हे पण आम्हीच सांगायचे का..???) अशी समीकरणे जिथे-तिथे उमटू लागली. आपले स्थान आणि आपल्या नावाचे रुपयासारखे घटत जाणारे अवमूल्यन विरोधकांना असह्य होवू लागले. त्या सर्वांनी मिळून सुधाकररावांच्या दौऱ्याची यथेच्छ टवाळकी सुरु केली, एवढ्यावरच न थांबता त्यांना ऑफिसमधून मेमो दयायचा घाट घातला. सुधाकारारावांना त्यांच्या विरोधात होत असलेली हालचाल जाणवली आणि सरतेशेवटी सुधाकारारावांनी आपले दौरे एकदाचे थांबवले.

इकडे विरोधकांनी आपण कसे विजयी झालो आणि सुधाकारारावांची कशी जिरवली याचा आनंद ढोल बडवून, एकमेकांना शुभेच्छा, आलिंगन देत साजरा करू लागले. पण.....सावजाला बेसावध ठेवून त्याची शिकार करण्याचे कमालीचे कसब सुधाकारारावांनी आत्मसात केलेले होते. एखाद्या तेल लावलेल्या पैलवानासारखे ते तयार गडी होते. आपल्या विरोधात असणाऱ्यांवर त्यांनी प्रभावी अस्त्र उगारले (बी.आर.चोप्रांच्या टी.व्ही.वरच्या ‘महाभारता’चे सुधाकारारावांनी अगदी पारायण केलेले आहे. म्हणजे, इकडून शत्रूने भात्यामधून बाण बाहेर काढून अर्जुनावर डागला कि तिकडून अर्जुन आपल्या भात्यामधून बाण बाहेर काढून धनुष्यामध्ये अडकवून त्या बाणाला नमस्कार करीत काहीतरी पुटपुटत असे आणि ’ये लो मेरा ब्रम्हास्त्र’’ असे म्हणत शत्रूवर डागत असे.मग शत्रूकडून येणारा बाण आणि अर्जुनाकडून येणारा बाण एक विशिष्ट संगीत ‘ढिंग.ढिंग.ढिंग..टव्यांक... टव्यांक... टव्यांक ’ असं वाजवत येवून एकमेकांवर आदळत असे, (कृपया प्रत्येकाच्या आवाजाच्या बाबतीतचे ज्ञान अगदी अल्प असे शकते. तेव्हा वाचकांनी आपल्या स्वतःच्या स्मरणशक्तीवर भार देवून आणि शक्य न झाल्यास यू-ट्यूब या आधुनिक ‘संजय’ची मदत घेवून ऐकू शकता/पाहू शकता...) आणि मग त्यातून शत्रूचा बाण एखाद्या फुसक्या चायनीज फटाक्यासारखा फुस्स्स...होऊन गायब होत असे. (अहो राजे....विषयांतर होतंय...भूतकाळातून, चालू-वर्तमानाकाळात या...अजून भविष्यात काय वाढून ठेवलंय ते सुधाकारारावांनाच ठावूक....) तर असा खेळ पुरेपूर पाठ असलेल्या सुधाकारारावांनी एका बेसावध क्षणी ते ब्रम्हास्त्र (पक्षी-क्षेपणास्त्र) आपल्या शत्रूवर (पक्षी-विरोधकांवर) डागले. त्यांनी एका रात्रीत बेसावध रात्री शत्रूला खिंडीत पकडून, आदेश काढला.

टेबलाखालून येणाऱ्या ‘माया’वर त्यांनी बंदी घातली. कोणीही कितीही ‘ममते’ने अगदी काहीही दिले तरी त्याच्यावर कडक कारवाईचे आदेश दिले. कोणीही ‘लालू’च दाखवली तर त्याला भुलू नये. इतके दिवस ‘मुलायम’ वाटणारे खुर्चीचे आसन ऑफिसमधल्या विरोधकांच्या आता बुडाला टोचू लागले. ‘सोनियाचे’दिन जावून भिक्षेचे पात्र हाती आले. के’जरी’वालले (पक्षी-केस जरी वाळले...थोडे ओठांचा चंबू करून या आडनावाचा उल्लेख करावा...किंवा एखाद्या बोबडे बोल बोलणाऱ्याला हे आडनाव उच्चारायला लावावे....म्हणजे लक्षात येईल...आणि यातला ‘स’ हा सायलेंट आहे...(अरे किती फेकायचे....) तर... असो ) तरीही खोकल्याची उबळ अजिबात कमी होणार नाही, याची पुरेपूर काळजी सुधाकारारावांनी घेतली. मग काय विचारता....ऑफिसातल्या सगळ्या विरोधकांचे धाबे दणाणून गेले. जो-तो सुधाकारारावांना आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करू लागला, परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आपली कामे करून घेण्यासाठी ऑफिसमध्ये येणाऱ्या पिचलेल्या सर्वसामान्यांना कसे छळले जात होते, हे सर्वश्रुत होतेच. मग सर्वसामान्यांनी देखील आम्हाला त्रास झाला तरी चालेल, परंतु हि बुरशी,कीड,वाळवी प्रभावी पेस्ट कंट्रोल करून एकदाची मुळासकट उपटून टाकाच, असं म्हणत पाठींबा दिला. विरोधकांनी मग ‘एक दिवस ऑफिसचे काम बंद’ची हाक दिली, मग सुधाकारारावांनी नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांना भावनिक आवाहन केले. आणि मग त्यांच्या आवाहनाला तळागाळातून भरभरून पाठींबा मिळाला. इकडे ऑफिसमधल्या विरोधकांच्या आरोपांची हवाच निघून गेली. (ऑफिसमधल्या अज्ञानी विरोधकांच्या बऱ्याच उशिरा लक्षात आले कि, त्यांनी बंद साठी निवडलेल्या तारखेला वार हा ‘रविवार’ होता..आणि असं हि...रविवारच्या दिवशी फक्त, टमरेल घेवून सार्वजनिकला आणि दुपारी मटण/चिकन/मासेवाल्याशिवाय पब्लिक कोठेही लाइनीला उभे राहत नाही. तिथे बंदसाठी विरोधकांच्या काय पाठी उभे राहणार.)      
  
इकडे विरोधकांमध्ये मात्र तिसरे महायुद्ध भडकले आहे. जो-तो दांडके (पुरुषांचे हत्यार) आणि लाटणे (स्त्रियांचे हत्यार) हातात घेवून फिरत आहेत. आणि दिसेल त्याला एकमेकांची गचांडी (पुरुष-पुरुषांची) आणि पदर (स्त्रिया-स्त्रियांचे) पकडून दरडावून विचारात आहेत....आयचा घो....आरं कुनी त्या सुधाकारारावांना दौरे करून नगा म्हणून सांगितलं हुतं....त्यो भायर हुता तेच बरं हुतं....त्ये हापिसात येऊन बसाय लागलं...अन आपल्या बुडाखाली आग लावलीया.... (एक कळकळीची विनंती... कृपया, वरील डायलॉग प्रत्येकाने आपापल्या भाषेमध्ये अनुवादित करून घ्यावा....किशोरदा/बच्चनसाहेबांच्या कृपेने आम्हाला फक्त ‘आमी तुमाके भालो बाशि’ एवढंच येतंय.....शेवटी कमी बुकं शिकलेली अडाणीच आम्ही...बरोबर ना....असो...)

- सुरेश तु. सायकर