शेवटी
सुधाकररावानां प्रोमोशन मिळून खुर्ची मिळालीच. इतके वर्ष ज्याची आतुरतेने वाट पाहत
होतो तो ‘सोनियाचा’ दिन त्यांनी छिनके, हिकमतीने मिळवून आपल्या आयुष्यात आणलाच. खुर्चीमध्ये स्थानपन्न
झाल्यावर, त्यांनी खुर्चीवर विश्रांती न घेता दौऱ्याचा धडाका सुरु केला.
पूर्वीच्या काळी जसे राजे-महाराजे सूत्रे हाती घेतल्यावर आपल्या राज्याचा दौरा
करून सगळी परिस्थिती पहायचे. अगदी तसेच सुधाकररावांनी दौरे सुरु केले. जसे
प्रत्येक ऑफिसमध्ये/दुकानामध्ये/कारखान्यांमध्ये अगदी मित्रांमध्ये दोन गट असतात,
अगदी तसेच इथे देखील होते. सुधाकररावांना त्यांच्या ऑफिसमधल्या दुसऱ्या गटाच्या इतर
सभासदांनी विरोध सुरु केला. असे राज्यभर उंडगायचा (पक्षी-दौरे) खर्च ऑफिसला पेलवणारा
नाही, असं सूर सगळ्यांनी काढला. तरीही सुधाकरराव त्यांना बधले नाही. त्यांनी सगळे
राज्य पायाखालून (पक्षी- विमानाखालून) घालवले. प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाचा डंका
जोरजोरात वाजवला. अगदी तिथल्या स्थानिक रहिवाश्यांनी सुद्धा आश्चर्याने त्यांच्या
पुढे मान झुकवली (खरं तर ती त्यांची, पाहुण्याचे स्वागत करण्याची पद्धत आहे.) असा
चारही दिशांना आपल्या नावाचा गवगवा झाल्यावर, सुधाकरराव मनोमन सुखावले. अगदी
त्यांच्या स्थानिक वर्तमानपत्रात देखील मानाचे फ्रंट पेजवरचे स्थान सुधाकररावांनी
मिळवले होते. पण इकडे ऑफिसमधल्या विरोधकांची घालमेल जास्तच वाढू लागली. ‘ऑफिस
म्हणजे फक्त सुधाकरराव’ (पक्षी- भारत म्हणजेच....श्री._ _ _ बस्स का राव...हे
पण आम्हीच सांगायचे का..???) अशी समीकरणे जिथे-तिथे उमटू लागली. आपले स्थान
आणि आपल्या नावाचे रुपयासारखे घटत जाणारे अवमूल्यन विरोधकांना असह्य होवू लागले. त्या
सर्वांनी मिळून सुधाकररावांच्या दौऱ्याची यथेच्छ टवाळकी सुरु केली, एवढ्यावरच न
थांबता त्यांना ऑफिसमधून मेमो दयायचा घाट घातला. सुधाकारारावांना त्यांच्या
विरोधात होत असलेली हालचाल जाणवली आणि सरतेशेवटी सुधाकारारावांनी आपले दौरे एकदाचे
थांबवले.
इकडे विरोधकांनी
आपण कसे विजयी झालो आणि सुधाकारारावांची कशी जिरवली याचा आनंद ढोल बडवून,
एकमेकांना शुभेच्छा, आलिंगन देत साजरा करू लागले. पण.....सावजाला बेसावध ठेवून
त्याची शिकार करण्याचे कमालीचे कसब सुधाकारारावांनी आत्मसात केलेले होते. एखाद्या
तेल लावलेल्या पैलवानासारखे ते तयार गडी होते. आपल्या विरोधात असणाऱ्यांवर त्यांनी
प्रभावी अस्त्र उगारले (बी.आर.चोप्रांच्या टी.व्ही.वरच्या ‘महाभारता’चे सुधाकारारावांनी
अगदी पारायण केलेले आहे. म्हणजे, इकडून शत्रूने भात्यामधून बाण बाहेर काढून
अर्जुनावर डागला कि तिकडून अर्जुन आपल्या भात्यामधून बाण बाहेर काढून धनुष्यामध्ये
अडकवून त्या बाणाला नमस्कार करीत काहीतरी पुटपुटत असे आणि ’ये लो मेरा
ब्रम्हास्त्र’’ असे म्हणत शत्रूवर डागत असे.मग शत्रूकडून येणारा बाण आणि
अर्जुनाकडून येणारा बाण एक विशिष्ट संगीत ‘ढिंग.ढिंग.ढिंग..टव्यांक... टव्यांक... टव्यांक
’ असं वाजवत येवून एकमेकांवर आदळत असे, (कृपया प्रत्येकाच्या आवाजाच्या बाबतीतचे
ज्ञान अगदी अल्प असे शकते. तेव्हा वाचकांनी आपल्या स्वतःच्या स्मरणशक्तीवर भार
देवून आणि शक्य न झाल्यास यू-ट्यूब या आधुनिक ‘संजय’ची मदत घेवून ऐकू
शकता/पाहू शकता...) आणि मग त्यातून शत्रूचा बाण एखाद्या फुसक्या चायनीज
फटाक्यासारखा फुस्स्स...होऊन गायब होत असे. (अहो राजे....विषयांतर
होतंय...भूतकाळातून, चालू-वर्तमानाकाळात या...अजून भविष्यात काय वाढून ठेवलंय ते
सुधाकारारावांनाच ठावूक....) तर असा खेळ पुरेपूर पाठ असलेल्या सुधाकारारावांनी
एका बेसावध क्षणी ते ब्रम्हास्त्र (पक्षी-क्षेपणास्त्र) आपल्या शत्रूवर (पक्षी-विरोधकांवर)
डागले. त्यांनी एका रात्रीत बेसावध रात्री शत्रूला खिंडीत पकडून, आदेश काढला.
टेबलाखालून
येणाऱ्या ‘माया’वर त्यांनी बंदी घातली. कोणीही कितीही ‘ममते’ने अगदी काहीही दिले
तरी त्याच्यावर कडक कारवाईचे आदेश दिले. कोणीही ‘लालू’च दाखवली तर त्याला भुलू
नये. इतके दिवस ‘मुलायम’ वाटणारे खुर्चीचे आसन ऑफिसमधल्या विरोधकांच्या आता बुडाला
टोचू लागले. ‘सोनियाचे’दिन जावून भिक्षेचे पात्र हाती आले. के’जरी’वालले
(पक्षी-केस जरी वाळले...थोडे ओठांचा चंबू करून या आडनावाचा उल्लेख
करावा...किंवा एखाद्या बोबडे बोल बोलणाऱ्याला हे आडनाव उच्चारायला
लावावे....म्हणजे लक्षात येईल...आणि यातला ‘स’ हा सायलेंट आहे...(अरे किती
फेकायचे....) तर... असो ) तरीही खोकल्याची उबळ अजिबात कमी होणार नाही, याची
पुरेपूर काळजी सुधाकारारावांनी घेतली. मग काय विचारता....ऑफिसातल्या सगळ्या
विरोधकांचे धाबे दणाणून गेले. जो-तो सुधाकारारावांना आणि त्यांनी घेतलेल्या
निर्णयाला विरोध करू लागला, परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आपली कामे करून
घेण्यासाठी ऑफिसमध्ये येणाऱ्या पिचलेल्या सर्वसामान्यांना कसे छळले जात होते, हे
सर्वश्रुत होतेच. मग सर्वसामान्यांनी देखील आम्हाला त्रास झाला तरी चालेल, परंतु
हि बुरशी,कीड,वाळवी प्रभावी पेस्ट कंट्रोल करून एकदाची मुळासकट उपटून टाकाच, असं
म्हणत पाठींबा दिला. विरोधकांनी मग ‘एक दिवस ऑफिसचे काम बंद’ची हाक दिली,
मग सुधाकारारावांनी नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांना भावनिक आवाहन केले. आणि मग
त्यांच्या आवाहनाला तळागाळातून भरभरून पाठींबा मिळाला. इकडे ऑफिसमधल्या
विरोधकांच्या आरोपांची हवाच निघून गेली. (ऑफिसमधल्या अज्ञानी विरोधकांच्या बऱ्याच
उशिरा लक्षात आले कि, त्यांनी बंद साठी निवडलेल्या तारखेला वार हा ‘रविवार’ होता..आणि
असं हि...रविवारच्या दिवशी फक्त, टमरेल घेवून सार्वजनिकला आणि दुपारी
मटण/चिकन/मासेवाल्याशिवाय पब्लिक कोठेही लाइनीला उभे राहत नाही. तिथे बंदसाठी
विरोधकांच्या काय पाठी उभे राहणार.)
इकडे विरोधकांमध्ये
मात्र तिसरे महायुद्ध भडकले आहे. जो-तो दांडके (पुरुषांचे हत्यार) आणि लाटणे
(स्त्रियांचे हत्यार) हातात घेवून फिरत आहेत. आणि दिसेल त्याला एकमेकांची गचांडी
(पुरुष-पुरुषांची) आणि पदर (स्त्रिया-स्त्रियांचे) पकडून दरडावून विचारात आहेत....”आयचा
घो....आरं कुनी त्या सुधाकारारावांना दौरे करून नगा म्हणून सांगितलं हुतं....त्यो
भायर हुता तेच बरं हुतं....त्ये हापिसात येऊन बसाय लागलं...अन आपल्या बुडाखाली आग
लावलीया....” (एक कळकळीची विनंती... कृपया, वरील डायलॉग प्रत्येकाने आपापल्या
भाषेमध्ये अनुवादित करून घ्यावा....किशोरदा/बच्चनसाहेबांच्या कृपेने आम्हाला फक्त
‘आमी तुमाके भालो बाशि’ एवढंच येतंय.....शेवटी कमी बुकं शिकलेली अडाणीच आम्ही...बरोबर
ना....असो...)
- सुरेश तु. सायकर