Wednesday 6 February 2019

नाक-पुराण

हा हा हा हा.....म्हणता तो दिवस आला. राज्याच्या स्वर्गवासी महाराणीचा पुनर्जन्म झाल्याची आणि राज्यात कुठल्यातरी घरी जन्मल्याची माहिती,पंचांग बघून पंडितांनी दिली. मग काय धुराळच....सगळे धुरिणी हात-पाय डेटॉलने स्वच्छ धुवून शोध कार्याला लागले. पण महाराणीचा पुनर्जन्म झाल्याची कोणती खूण त्या बालिकेमध्ये शोधायची, हा यक्ष प्रश्न नमक वाल्या कोलगेटने ब्रश करून 'आ' वासून समोर उभा ठाकला. तेव्हा नेहमीप्रमाणे पंडितांनी पुन्हा एकदा पंचांग काढून,विनाकारण २०-२५ पानं मागे-पुढे उलटवून, एका पानाच्या, दहाव्या (अरे बापरे....पुन्हा दहावा) एके ठिकाणी बोट ठेवून सांगितले,"महाराणीच्या आणि नवजात बालिकेमध्ये एक अनन्यसाधारण साधर्म्य आहे आणि ते म्हणजे... महाराणीचं आणि त्यांच्या पुनर्जन्मित  राजकन्येचं नाक.... शेम टू शेम आहे ('शेम' हा प्रचलित भाषेतील उच्चार आहे...प्युअर इंग्रज व्यतिरिक्त इतरजण याचा उच्चार 'सेम' असा करतात) ...euuuuuuuu...."(हे आजकाल सर्रास फेकबुकावर वाचायला आणि पाहायला मिळतं....म्हणजे अत्यंत घाईचा आणि जोरकस आनंद (आनंद...हा फसवा असतो....स्वानुभव) झाला कि, मंडळी आपला आनंद असा व्यक्त करतात. पंडितांनी वर्णन केल्या-केल्या सर्व सरदारांमध्ये उत्साहाचं वाता-वरण(साखर टाकून) निर्माण झालं. सर्व सरदार, "हुर्रर्रार्रार्रा...हुर्रर्रार्रार्रा.....हुर्रर्रार्रार्रा......" (ह्या जयघोषाचे अधिकार फक्त राजघराण्यापुरतेच  मर्यादित आहेत. आपण आपलं साधं.... 'चांगभले' बरं) असं म्हणून एकदाचे कामाला लागले.          
      
साऱ्या राज्यात दवंडी पिटली, "ऐका हो ऐका.....इकडून आलू सोडा, तिकडून सोना काडा...(अय येड्या....युवराजांची नॅशनल स्लो-गन हाये ती) राज्यातल्या सर्व प्रजेला कळविण्यात अत्यंत आनंद (अरे ह्यो फसवा असतोय रं) होत आहे कि, आपल्या स्वर्गवासी महाराणींचा पुनर्जन्म झालेला आहे हो........(ढुम...ढुम....ढुम....ढुम..... आं....कशी काय अय मुजिक.... येक नम्बर ना) महाराणीच्या आणि नुकत्याच जन्माला आलेल्या स्त्री अर्भकामध्ये एक विलक्षण, अद्भुत, जगावेगळे, रम्य हि स्वर्गाहून लंका पेक्षा भारी, साम्य आहे...आणि ते आहे..... नाकाचे..... होय, बरोबर ऐकलान (कोकणी लहेजात...) तर धारदार नाकाचे अर्भक जेव्हा सापडेल, ज्याच्या कडे सापडेल, हुकुमाप्रमाणे त्याला ताब्यात घेऊन राजवाड्यात आणून, भावी महाराणी म्हणून घोषित करण्यात येईल....... हो ......हो ......हो ......(आरं सोड कि मुजिक....एकांकिका संपायला लागलीया) ढुम...ढुम....ढुम....ढुम....."   

राज्यातील प्रजा विचारात, चिंतेत पडले. कारण राज्यात काही दिवसांमध्ये स्त्री अर्भक जन्मालाच आलेले नव्हते (भाऊ...आजकाल समद्यांना...मिशन मदून सोना काडणारा वंशाचा दिवाच पायजे असतो ना.) तरीही संबंधित अधिकारी, राज्यात सगळीकडे शोध घेऊ लागले. पण काही केल्या त्यांना नाकाशी साधर्म्य असणारे, स्त्री अर्भक सापडेना. काहींनी आपलं बाळ, राजवाड्यात जावं, भावी महाराणी म्हणून घोषित व्हावं म्हणून प्लास्टिकचं खोटं नाक लावून पाहिलं... पण सर्दीचा मोसम असल्याने, अर्भकाने तो डाव हाणून पाडला...कसं काय विचारता...कफामुळे आणि सर्दीमुळे एकसारखं गळणाऱ्या नाकावर प्लास्टिकच काय तर चांभारी दोऱ्याने खोटं नाक जरी शिवलं तरी ते फुर्रर्र दिशी उडून जाईल (खात्रीसाठी सर्दी झालेल्या लहान अर्भकासोबत एक दिवस व्यतीत करून पाहावे). आता काय क्रावे ब्रे....असा मोठा यक्ष प्रश्न पडला.                                 

खोदा चुहा अन निकली बिल्ली किंवा काखेत कळसा आणि पळसाला पाने तीन (काहीतरी चुकलंय....नाही...पंचांगामध्ये नाहीये ते) वगैरे वगैरे. तर महाराणीचा पुनर्जन्म हा कोणत्या झोपडीत, कोणत्या वाड्यात, कोणत्या फ्लॅटमध्ये, कोणत्या ब्लॉकमध्ये, कोणत्या बंगलोमध्ये, कोणत्या रो-हाऊसमध्ये, कोणत्या सेकंड होम (फॉर लेट नाईट पार्टी स्पेशल)मध्ये झालेला नव्हता (आणि होत पण नसतो.... काय??? कोण म्हणालं रे...घराणेशाही...बरं पुढे) तर दूरदेशी, साक्षात एका राजवाड्यातच झालेला होता. मग काय म्हणता,त्या नवजात अर्भकाला डायरेक्ट स्पेशल विमानाने राज्यात आणले गेले. रस्त्यावर जनता दुतर्फा, नाक साधर्म्य असणारी भावी महाराणी पाहण्यासाठी दाटीवाटीने उभी राहिलेली होती. नावाचा एकसारखा जयघोष सुरूच होता. विमानाचे दार उघडले गेले आणि सध्याच्या राणीने खुद्द, साक्षात ते अर्भक आपल्या दोन्ही हातात घेऊन, प्रजाजनांना दाखवण्यासाठी आकाशामध्ये उंचावले (भाऊ-बळी स्टाईल). त्या सरशी "हुर्रर्रार्रार्रा...हुर्रर्रार्रार्रा.....हुर्रर्रार्रार्रा......" या जयघोषाने आसमंत दुमदुमला आणि क्षणातच सगळे वातावरण नाकमय झाले.  

क्रमशः 

आं.....काय म्हणालात? नाकात काय आहे? भाऊ, नाकातच तर नथ फसलीये ना.....स्वर्गवासी महाराणीच्या कर्तृत्वाची उंची, एवढी उंच आहे ना....तिथवर पोहचायला आत्ताच्या पिढीला २ काय तर चांगले ३-४ जन्म लागतील. My IRON LADY.

-  सुरेश तु. सायकर 

Saturday 2 February 2019

#बिर्याणीपुराण

शेवटी अप्पा गेलेच.
गेली 4 वर्षे अप्पा अंथरुणाला खिळून होते. उभी हयात घर आणि मुलांना सावरण्यात आणि मोठं करण्यात गेली. जोवर अप्पांचे हात-पाय चालू होते, तोपर्यंत घरात अप्पा एक आदरणीय व्यक्ती होती. पण जशी अप्पांची रिटायरमेंट झाली आणि जवळच्या पैशांचे वाटप झाले. तसतशी अप्पांची आदरणीय प्रतिमा सावलीसारखी लहानलहान होत अदृश्य झाली. एकवेळच्या गोडीगुलाबी बोलण्याला भुलून अप्पा स्वतःला स्वर्गात समजायचे तेच अप्पा आता एकवेळच्या अन्नालाच काय तर एका घासाला पण महाग झाले होते. स्वतःच्याच घराचे वासे फिरले, तर हा पामर तरी काय करणार? या विचाराने अप्पांनी आहे ते, जसे ते, प्राक्तन म्हणून स्वीकारले.

शेवटी, पाचव्या वर्षी अप्पांनी देह ठेवला. एका घासाला महाग झालेल्या अप्पांच्या आत्म्याला शांती लाभावी, म्हणून त्यांचा 10वा मात्र जोरात करण्याचा विचार त्यांच्या घरच्या सदस्यांनी बोलून दाखवला. त्यांना कोणीतरी सांगितले की, अप्पांना इब्राहीमच्या "A-1 दमादम बिर्याणी हाऊस" इथली चिकन बिर्याणी खूपच आवडायची. खरं तर अप्पांनी तिथं बिर्याणी कधी खाल्लेली नव्हतीच. बिर्याणी महाग, एकवेळच्या बिर्याणी मध्ये घरात गरजेच्या किती तरी वाण सामानाच्या वस्तू येतील, या विचाराने अप्पांनी इब्राहीम च्या हॉटेल पासून जाताना, फक्त बिर्याणीचा 'सुगंधावरच' आपली भूक भागवली होती. विचार केलेला की, रिटायरमेंट नंतर हातात वेळ आणि बँकेत पैसा जमा झाल्यावर, खाऊ बिर्याणी हवी तितकी. पण गरज सरो आणि वैद्य मरो, अशी अप्पांची रिटायरमेंट नंतर अवस्था झालेली. घरातच तुकडा मिळेना तिथं हॉटेलात जाऊन खायला पैसा कोण देणार.
पण घरातल्या कर्त्यांना उशीरा का होईना 5व्या वर्षी(अप्पा गेल्यानंतरच्या :) ) जाग आलीच. त्यांनी ठरवलं की, अप्पांच्या 10व्याला, इब्राहीमच्या "A-1 दमादम बिर्याणी हाऊस" मधून चांगली,खूप ,लय, भरपूर अशी 1 किलो चिकन बिर्याणी आणायची आणि अप्पांच्या 10व्याला त्यांना नैवेद्य दाखविताना वाढायची. मग काय अनुपम सोहळाच, हा...हा म्हणता, अप्पांचा 10वा साजरा करायचा दिवस उजाडला. इब्राहिमला आधीच सांगून ठेवल्याने, त्याने खास अप्पांसाठी ताजी, गरम बिर्याणी बनवून 9 वाजताच तयार करून ठेवली. सदस्यांनी ( घरच्या :) ) रस्त्याने जात असताना, अप्पांसाठी चिकन बिर्याणी असं म्हणत, लोकांना भुरटे प्रेम दाखवत, नाचवत बिर्याणी घरी आणली. चांगली 1 किलो बिर्याणी...पण जसे बिर्याणीच्या पिशवीचे तोंड उघडले तसा मसाल्याचा, चिकनचा आणि स्पेशल राईसचा सुरेख संगम होऊन, घरातल्या प्रत्येक सदस्याच्या नाकात घुसला. मग पोटातल्या कावळ्यानी त्या डोम कावळ्यांना (सदस्यांना... घरच्या :) ) साद घातली. सर्व सदस्य, तोंडला सुटलेले पाणी कसेबसे जिभेने आत सरकवत, ओठांनी आतल्या आत रोखत एकमेकांकडे आशाळभूत नजरेने पाहू लागले. कोणत्या पर्स मध्ये किती माल आहे, हे न बोलता, भर रस्त्यावर लुटणाऱ्या चोरांनाच नजरेची भाषा फक्त कळते, हे साफ खोटे ठरवत, सदस्यांनी(घरच्या :) ) ठराव केला की, मेलेला माणूस, खरंच कधी येऊन घास खाल्याचे कोणी पाहिलंय का? आणि जर खात असेल तर त्याचा सीसीटीव्ही पुरावा आहे का? तर मग अप्पाच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून, केवळ श्रद्धा म्हणून, .500 (पॉईंट पाचशे ग्रॅम...हां ) बिर्याणी त्यांच्या फोटोसमोर नैवैद्य म्हणून ठेवावी, अशी 'अर्थ'पूर्ण 'संकल्प'ना मांडली आणि उरलेली.....सुज्ञास सांगणे न लागे (जे की काय असेल ते)

शेवटी काय.... तर, अप्पांच्या वाट्याला बिर्याणी खाणे नाहीच...1 किलो असो वा .500 ग्रॅम...शेवटी त्यांना 'सुगंधावरच' भागवावे लागले.

काय 'अर्थ'य असल्या 'संकल्पां'ना....
असो.

-सुरेश तु. सायकर