Tuesday 2 August 2016

पाऊस आणि रोमांटिक...

पाऊस आणि रोमांटिक अनुभव याचा दूरान्वये सबंध नाही असं म्हणणारा सजीव या पृथ्वीतलावर क्वचितच आढळेल. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती ना कोणती घटना पावसासंबंधीत घडलेली असतेच. काही जणांसाठी आनंददायी, सुखदायक असते तर काही जणांसाठी त्रासदायक.
आनंददायी, सुखदायक यासाठी कि , ज्याच्यासोबत, ज्याच्यासाठी हा पाऊस अनुभवलेला असतो तो तुमच्या सोबत अजूनही कायम असतो. तुम्हाला जेव्हा एखादी व्यक्ती आवडायला लागते. तेव्हा त्याच्या चांगल्या वाईट वर्तवणुकीचा विचार अजिबात न करता आपण त्याच्या प्रेमात पडतो. मग हळूहळू त्याच्या मध्ये इतके गुंतत जातो कि, त्याच्या वाईट गोष्टी आपोआप नजरेआड होतात. कधीतरी जेव्हा आपण नकळत दुखावले जातो तेव्हा ती ठसठसणारी जखम वेळेच धुवून टाकणे महत्वाचे. कारण एकमेकांमध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी योग्यवेळी वाहून जाणे म्हणजे एकमेकांसोबत जास्त काळ व्यतीत करणे. त्या धुवून जातात, जेव्हा तुम्हाला आवडणारा पाऊस त्याला किंवा तिला देखील आवडत असतो. मग अशातच पावसाची पहिली सर येते, अन दोघांच्या डोळ्यात पालवी फुटते. दुरावलेल्या, दुखावलेल्या मनांना हलकीच फुंकर घालते. दोघांच्या मनात त्याला अनुभवण्याची ओढ निर्माण होते. पण तो अनुभवण्यासाठी गरज असते सोबतीची. तो अनुभव आणखीन द्विगुणीत होतो जेव्हा आपल्या सोबत असते आपल्याच पहिल्या प्रेमाची. बाल्कनीतून बाहेर कोसळणारा पाऊस पाहून आठवतो, तो तिला फक्त पाहण्यासाठीचा अट्टाहास. कारण प्रेम व्यक्त करण्याआधी बऱ्याचदा आपण तिच्या कळत किंवा नकळत फक्त तिला पाहण्यासाठी धडपड करत असतो. कधी तिच्या क्लास बाहेर, कधी तिच्या नेहमीच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर, कधी तीच्या घराबाहेर तर कधी अगदी भाजीमंडई पर्यन्त. अश्यावेळी तिथपर्यंत पोहचण्याची धडपड जरी आठवली तरी आत्ता ती किंवा तो सोबत असल्याची किंमत आपल्याला सहज कळेल. त्या धो-धो कोसळणाऱ्या पावसात अनेकदा चालत, कधीकधी धावपळत कधीतरी मित्राच्या सायकलवर फक्त तिला पाहण्यासाठी केलेली मरमर जर आठवली तर आपल्याला स्वतःचेच हसू येईल. तिने जेव्हा पहिल्यांदा प्रेमाला होकार दिला तेव्हा साक्षीला फक्त हाच पाऊस होता, धो-धो कोसळणारा. पण तो तेव्हा किती रोमांटिक वाटला, इतके दिवस त्याच्या वेडसर कोसळण्याने तिची एक छबी पाहू शकत नव्हतो म्हणून किती कोसले होते. आणि जेव्हा तिने पहिल्यांदा आपल्याला होकार दिला. तेव्हा साक्षीला फक्त हाच होता. म्हणजे नक्कीच कोणते तरी अतूट नाते याच्यासोबत असणार. मग जेव्हा जेव्हा हा कोसळायला लागतो तेव्हा तेव्हा आठवण येते त्या सुगंधित क्षणांची. पहिला पाऊस पडल्यावर मातीचा जो सुगंध येतो तो त्या मातीचा नसून त्या प्रेमाच्या पहिल्या अंकुरापासून फुललेल्या फुलांचा असतो. तो फक्त जरी आठवला....तर आयुष्य सुसह्य.
त्रासदायक यासाठी कि, ज्याच्यासोबत, ज्याच्यासाठी हा पाऊस अनुभवलेला असतो तो किंवा ती आज आपल्या सोबत नसते. जेव्हा हाच पाऊस नकोसा वाटायला लागतो तेव्हा समजायचे कि, आपल्या नात्याची सुरुवात होताना असलेला साक्षीदार आता तिच्या किंवा त्याच्या दृष्टीने फितूर झालाय. अशातच काहींनी मध्येच साथ सोडलेली असते तर काहींची सुटलेली असते....आयुष्याच्या शेवटाला.....वयोपरत्वे.
-सुरेश तु. सायकर