Thursday 5 October 2017

ऐनक...

बापू, हमने ज्यादा नहीं सिर्फ ऐनक बदला है,
आप जो दिखा रहे थे उस मार्ग पैर नहीं,
अब बदले हुए ऐनक के मार्ग पैर चल रहे है....

वो जादुई ऐनक है,
जो नहीं है, वो भी उसमेंसे दीखता है,
बंजर जमीं, हरीभरी नजर आती है,
भूखे, नंगे लोग, संतुष्ट एवम पुरे कपडोंमे नजर आते है,
हर कोई काम में लगा हुआ है,
बात करने की भी फुर्सत नहीं,
बेरोजगारी सिर्फ इतिहासोंमे नजर आती है...

बात, पहलेकी नहीं, अब की भी नहीं, भविष्यकी है,
बदलाव के लिए, कुछ विचारोंको कभी कभार छोड़ना पड़ता है, 
लेकिन आप रहोंगे जिन्दा हमेशा,
अपने सत्य के मार्गसे प्रेरित करते हुए,
भविष्यमें जब निति का मार्ग अनीति में बदलेगा,
तब विरोध ले लिए आपहीकी निति काम आएंगी,

बापू, उस जादुई ऐनक को पहननेके लिए सिर्फ और सिर्फ चाहिए,
...थोडीसी सहनशक्ति, कणखर वृत्ति और दूरदृष्टि....
क्योंकि, बदलाव के लिए, खुद बदलना जरुरी है.....


- सुरेश सायकर  

Tuesday 23 May 2017

आमरस आणि बाप्पू...



शाळेला उन्हाळ्याची सुटी आणि मामाचे गाव, हे आयुष्यातलं खरंच डेडली कॉम्बिनेशन आहे. ज्यांनी अनुभवले आहे, ती आठवणींची शिदोरी त्यांच्या आयुष्यातून कधीच संपणार नाही. मला आयुष्यात खूप चांगलं शिकवणारी, अगदी बोटावर मोजावी एवढीच लोकं भेटली. त्यात खूप वरचा नंबर लागेल, तो म्हणजे माझ्या आजोबांचा, बाप्पूंचा, म्हणजेच माझ्या आईच्या वडिलांचा.

बाप्पू म्हणजे खूप भारी रसायन होतं. ‘रसायन’ हा शब्द आणि तोही वयोवृद्द माणसासाठी अश्यासाठी कि, त्यांच्यात कणखरपणा जितका होता तितकाच अवखळपणा देखील होता, असा समप्रमाणात गुण असणाऱ्या व्यक्ती फारच कमी आढळतात. कणखरपणा यासाठी कि, त्यांच्या तरुणपणी बारामतीमधल्या, माळेगाव इथे बामणाच्या मळ्यावर सालगडी म्हणून काम करण्याआधी, लहानपणी ते त्यांच्या सख्ख्या मामाच्या घरी सालगडी म्हणून काम करत होते. आता मामा म्हंटल्यावर, कामामध्ये थोडीफार सूट मिळेल, अशी आशा वाटणे देखील स्वप्नवत. अश्या परिस्थितीमध्ये काम केल्यावर कणखरपणा माणसामध्ये येणार हे नक्कीच. पण तो येत असताना, त्यांनी आपल्यातले लहान मुल आणि अवखळपणा, कधीच मरू दिला नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये विलक्षण मिश्कीलपणा आढळायचा. कोणाची टर उडवताना, डोळे बारीक करून, बोळक्या गालात असे काही हसत कि, ते बघणेबल (नवीन शब्द शोधलाय...वापरत आणायला कोणतेही राईटस नाहीत.असो.) असायचे.
तर सालाबादप्रमाणे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, आंब्यांच्या सिझनमध्ये आमचा मुक्काम तिकडेच असायचा. पाड  लागला कि, आंब्यांच्या झाडावरून आंबे उतरवल्यावर, घरामध्ये एका कोपऱ्यात, आंबे पिकवण्यासाठी ‘आडी’ घातली जायची. ‘आडी’ म्हणजे सगळ्यात आधी गवत पसरवून ठेवायचे, मग त्यावर कच्चे आंबे ठेवले जायचे आणि मग त्यावर पुन्हा गवत पसरविले जायचे. हे काम बाप्पू स्वतः करायचे, कधी गरज पडली तर मला आणि मामाच्या मुलाला हाताखाली घ्यायचे. एकदा का, ‘आडी’ घातली कि, पाड लागलेल्या त्या कैऱ्यांचा प्रवास सुरु व्हयाचा, कच्च्यापासून तो पिकण्यापर्यंतचा आणि त्याला साक्षीदार असायचो, मी.

मी अश्यासाठी कि, रोज सकाळी झोपेतून उठलो कि, आधी ‘आडी’पाशी जावून आंबे पिकलेत का? याचा वास घ्यायचो. बापूंनी सांगितले होते, कि जेव्हा आंबे पिकायला सुरुवात होईल तेव्हा घरभर घमघमाट सुटेल. मग मी नजर चुकवून, गवत न सरकवता, ‘आडी’मध्ये हात घालून, एखादा आंबा पिकलाय का दाबून बघायचो. आणि एखादा हाताला लागलाच कि, चेहऱ्यावर असले भारी भाव उमटायचे कि, हात जेव्हा ‘आडी’मधून बाहेर यायचा तेव्हा हातात तो अर्धवट पिकलेला आंबा असायचा. मग मी तो आंबा खिशात टाकून, कोणाचे लक्ष नाहीये याची काळजी घेत बाहेर पडायचो आणि मग घोलपाच्या आमराईमध्ये जावून, अर्धवट पिकलेल्या आंब्याला दोन्ही हातात ‘शंख’ पकडतात असा पकडायचो. मग दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी हळुवार दाबत जाग्यावर गोलगोल फिरवायचो. तो अश्यासाठी कि,  आंबा जिथे थोडाफार कच्चा राहिलेला असायचा, तो देखील कडक न राहता रसाने भरून जायचा. मग आंब्याच्या वरचे तोंड, नखाने हळुवार उडवायचे, आणि चीकासोबत थोडा रस बाहेर काढून तो झटकायचा. कारण तो चिक   तोंडाला लागल्यावर ‘जर’ उमटायचा आणि चोरी उघडी पडण्याची शक्यता असायची. मग तो आंबा स्वर्गीय सुखाने खायचो. हे सगळे उपद्व्याप बापूंची नजर चुकवून यासाठी म्हंटले कारण, असे आंबे, पिकण्याआधी दाबून बघितले तर खराब होण्याची शक्यता असते, असे बापूंनी सांगितले होते. तरीही मी बधत नाहीये आणि अधूनमधून आंब्यांची संख्या कमी होतीये, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला समोरासमोर काहीही न बोलता, सकाळचा चहा प्यायला बसल्यावर इनडायरेक्ट ऐकवले. ते असे, कि काय आहे, उन्हाळ्यात लांबड्याना खूप गरम होते ना, मग ते गारव्यासाठी, अगदी इथे आडीतल्या गवतात देखील येवून बसतात. हे ऐकल्यावर कोणाच्या बापाची बिशाद पुन्हा ‘आडी’ मध्ये हात घालायची. कारण बापूंना माहित होते कि, मला लांबड्याची (म्हणजे सापाची) खूप भीती वाटायची.  हि मात्रा अगदी बरोबर लागू पडायची. मग मी रोज सकाळी, ‘आडी’पाशी उभा राहून, ‘आडी’तल्या अर्धवट पिकलेल्या आंब्यांच्या फक्त वासावरच भागवायचो. हे बापूंच्या अनेक मिश्किल स्वभावातल्या किश्यांपैकी एक छोटासा किस्सा.

मग तो सोन्याचा सुदिन दिवस उजाडायचा, पिकलेले आंबे बाप्पू ‘आडी’ मधून बाहेर काढायचे आणि मग संध्याकाळी आमरसाचा बेत फिक्स. बाप्पू मोठ्या पितळेच्या परातीमध्ये आंबे धुवून ठेवायचे आणि स्वतः समोर एक पितळी पातेल्यात त्याचा रस काढायचे. बाप्पू आंबा हातात असा काही गोल फिरवून, आपल्या एका डाव्या हाताच्या अंगठ्याने पिळायचे, कि ते बघायला भारी वाटायचे. कारण त्यांच्या उजव्या हाताला अंगठा नव्हता. तरुणपणी घोड्याला चारा खायला घालत असताना, घोड्याने त्यांच्या अंगठा तोडला होता. 

खरी मजा तर पुढे यायची, म्हणजे संख्येने आंबे जास्त असल्याने, आंबे  जास्त न पिळता, फक्त गर काढून घ्यायचे आणि मग कोय आणि साल याला चिटकून राहिलेला केशरी गर, अधाश्यासारखे बसून असलेल्या, मला आणि मामाच्या लहान मुलाला, म्हणजे नानाला मिळायचा. इथे बाप्पू खरी गंमत करायचे. आंबा पिळून घेण्याआधी आम्हा दोघांना विचारायचे, हा बोला, कोय कोणाला? आणि साल कोणाला? नाना म्हणायचा, मला कोय.. मग बाप्पू नानाला कोय देताना खूप सारा गर तसाच ठेवायचे आणि साल मात्र पिळवटून, अगदी कोरडी करून मला खायला दयायचे. मग मी आपलं तोंड वाकडं करून, अगदी म्हणायला थोडाफार गर असलेली ती साल खायचो. इकडे बाप्पू गालातल्या गालात मिश्किलपणे हसत असायचे. तो आंबा पिळून झाला आणि दुसरा आंबा घेतला कि, पुन्हा विचारायचे,हा आता बोला, कोय कोणाला? आणि साल कोणाला?यावेळी मी म्हणायचो, कोय मला पाहिजे... मग बाप्पू आंबा थोडासा पिळून, कोय बाहेर काढायचे आणि साल नानाला खायला दयायचे, ज्यामधून गर अगदी नावापुरताच काढलेला असायचा. मग गालातल्या गालात हसत, स्वतःच्या हातात कोय पकडून, त्याचा अगदी सगळा गर काढू घ्यायचे आणि नावापुरता राहिलेला गर असलेली कोय, म्हणजे अगदी पांढरे  केसं पिंजारलेली म्हातारी दिसावी, अशी कोय ते माझ्यापुढे धरायचे. मी हात पुढे करून ती कोय घ्यायचो आणि तोंड वेडावाकडं करीत गर शोधत कोय खायचो. इकडे नाना मात्र मिटक्या मारत गर असलेली सालं, कोय खात असायचा. आणि माझ्या वाट्याला फक्त म्हणायला पांढरी झालेली कोय आणि कोरडी सालं यायची. 

हि गोष्ट मात्र आजीच्या नजरेतून सुटायची नाही. पण आजी, जिला आम्ही आक्का म्हणायचो, ती काहीही न बोलता फक्त डोळे मोठे करून रागाने बापूंकडे बघायची आणि बाप्पू मात्र जणू काही घडलेच नाही अश्या अविर्भावात गालातल्या गालात हसायचे. मी चिडून त्यांना म्हणायचो, तुम्ही मुद्दाम असं करताय... यावर बाप्पू म्हणायचे, मुद्दाम कशाला...अरे, कितीही केलं तरी तू माझ्या लेकीचा, मुलगा आहेस. तेव्हा तुझा इथे काहीच अधिकार नाहीये. याउलट नाना माझ्या लेकाचा, मुलगा आहे. तेव्हा इथल्या सगळ्या गोष्टींवर त्याचाच हक्क आहे. त्यामुळे त्यालाच जास्त खायला घालणार ना. तुम्ही म्हणजे फक्त पाव्हणे...असं म्हंटलं कि, माझ्या रागाचा पारा चढायचा, कानशिलं गरम व्हायची, समोर जे दिसेल ते फेकून द्यायचो आणि तिथून आमराईमध्ये, जांभळाच्या झाडाखाली किंवा आंब्याच्या झाडावर, फांदीवर जावून बसायचो. 

थोड्यावेळाने जेवणाची वेळ व्हयाची, आमरस तयार झाला असेल या आठवणीनेच पोटात आग पडायला लागायची. फांद्यावरून खाली उतरायचो आणि सरळ घरी जायचो. मला बघितल्यावर आक्का, स्टीलचे ताट काठोकाठ  भरून आमरस वाढायची, आणि तो हि अनलिमिटेड. सोबत गव्हाची चपाती. आक्का, चुलीवर चपाती एवढी खरपूस भाजायची कि, चपाती कोरडी जरी खाल्ली तरी मन आणि पोट भरायचे नाही. मग जेवत असताना मान वर न करताच जेवायचो. त्याला कारण हि तसेच असायचे. परंतु मान खूपच दुखायला लागली कि, नाईलाजाने वर बघावे लागायचे, तर समोर जेवायला बसलेले असायचे, बाप्पू. डोळे बारीक करीत मिश्किलपणे माझ्याकडे बघत, गालातल्या गालात हसत असायचे. बापूंचे गालातल्या गालात हसणे, ज्याने कोणी अनुभवले किंवा ज्याला उमगले असेल त्याला त्यांचा मिश्किल स्वभाव नक्कीच कळला असणार. बापूंचे ते हसणे अगदी त्यांना शेवटची अंघोळ घालताना देखील मी अनुभवले होते. ते आयुष्यात कधीही माझ्या स्मृतीपटलावरून पुसले जाणार नाही. 

बापूंकडून मी अनेक चागंल्या गोष्टी घेतल्या, त्यातल्या तीन आजही भारी वाटतात. पहिली, त्यांचा मिश्कीलपणा, दुसरी,लहान मुलांसोबत, लहान होवून खेळकरपणे खेळणे आणि तिसरी, खूप महत्वाची म्हणजे, त्यांचे चहाची आवड (याला काही लोकं, व्यसन, असं म्हणतात, उगीचच...). या तिन्ही गोष्टी त्यांच्याप्रमाणेच शेवटपर्यंत माझ्यासोबत राहोत, हि प्रार्थना.

- सुरेश तु. सायकर                       

Wednesday 4 January 2017

बंडूमामा...

थंडीचे दिवस आले कि, दरवर्षी तीव्रतेने आठवण येते ती, बंडूमामाची. हा मामा आईचा मावसभाऊ, अहमदनगरमध्ये राहणारा. पांढरा शुभ्र नेहरू शर्ट, पायजमा, खांद्याला शबनमची पिशवी अडकवलेला, त्यामध्ये वर्तमानपत्र, आणि एखाद दुसरं वैचारिक पुस्तक, आणि काहीबाही ठेवलेलं असायचं. जनरल नॉलेजमध्ये कोणीच हात धरू शकणार नाही. राजकारण, समाजकारण, अश्या एक ना अनेक प्रांतात मुशाफिरी करणारा. रंगाने अगदी सावळा, कुरळे केस, सदा हसमुख, तंबाकू खावून थोडेसे पिवळे झालेले खालचे दात, पण वरचे पांढरे शुभ्र, अगदी छन्नी हातोडीने कोरीव काम केल्यासारखे, हसताना डोळे मिचकावून, अगदी मोठ्ठा ‘आ’ वासून हसणारा आणि सोबत पहाडी आवाज. समोरच्याची बोलता-बोलता कधी फिरकी घ्यायचा, ते समोरच्याला देखील समजायचे नाही. समोरचा बकरा बनला हे बंडूमामाच्या लक्षात आलं कि, त्याला होणारा आनंद आणि सोबत त्याचा तो अगदी टिपिकल हास्याचा विस्फोट. मामाच्या गावी गेल्यावर प्रत्येक कार्यामध्ये सगळ्यात पुढं असायचा. तो असला कि, सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडेच जायचे. मी लहान असून देखील मला त्याचे विलक्षण वेगळेपण जाणवायचे. त्यात माझी  निरीक्षणाची सवय अगदीच लहानपणापासून असल्याने, मी सगळ्यांच्या खाणाखुणा, बोलण्याच्या लकबी आणि त्यांचे वेगळेपण बरोबर लक्षात ठेवायचो. बंडूमामाच्या अंगात नाना कळा, कधीही एका ठिकाणी फार काळ न टिकणारा अगदी स्वतःच्या घरात देखील. मिळेल ते उद्योगधंदे करणारा, समोरच्याला शब्दांमध्ये गुंग करून आपले ईप्सित साध्य करून घ्यायचे, काम झाले कि, मग गडी गुलाट.

तर असाच एके दिवशी, भर थंडीच्या संध्याकाळी, कधी नव्हे ती स्वारी आमच्या घरी अवतरली. बंडूमामा याआधी कधी घरी आलेला मला आठवत नव्हते. हो, माझे वडील होते तेव्हा एकदा येवून गेलेला अंधुकसे आठवत होते आणि त्यानंतर वडील गेल्यानंतर साधारण दोन-तीन वर्षांनी तो आलेला. आमची घर चारही बाजूने लोखंडी पत्र्याने वेढलेले असल्याने थंडीच्या दिवसांमध्ये जरा लवकर आणि जास्तच गार पडायचे. त्यामुळे घरात वावरताना, दातांचे अगदी तुणतुणे वाजायचे. जिथे घालायलाच चांगल्या कपड्यांची मारामार असायची, तिथे स्वेटर सारख्या तद्दन गोष्टींचे फालतू लाड कोणाला परवडणार. आई कामावरून प्रचंड दमून यायची. तिच्या कामाचा भार हलका व्हावा म्हणून, ती येईपर्यंत मी निम्मे काम उरकून ठेवायचो. ती आल्यावर शिरस्त्याप्रमाणे, पहिले हात पाय स्वच्छ धुवून मगच पुढचे काम हाती घ्यायची. आणि मी देखील शिरस्त्याप्रमाणे गरमागरम चहा बनवून तिच्या हाती द्यायचो. मग ती एकदम खुश व्हायची, छान हसायची, दिवसभराचा शिनभाग एका झटक्यात हलका व्हायचा तिचा. मग चहा झाल्यावर, आई स्वयंपाक  बनवायला घ्यायची. त्यादिवशी तिचा चहा पिऊन होतो ना होतो तोच, बंडूमामा अचानक आणि अनपेक्षितपणे दारात अवतरला. त्याला बघितल्यावर आईला आश्चर्य वाटलं, कारण, बंडूमामा कधीही अगदी सहज कोणाच्या घरी जाणारा नव्हता. पण त्याच्या नेहमीप्रमाणे हसण्याच्या स्टाईलने तिची चिंता थोडी कमी झाली. कारण मामाला पाहिल्यावर, काहीतरी अघटीत घडले कि काय? असेच काहीसे तिच्या मनात आले. आईने मामासाठी चहा बनवला. मामा फुरके मारत मारत गप्पा मारायला लागला. जसजसा उशीर व्हायला लागला तसतसा माझा राग वाढायला लागला. मी आपला अभ्यास करीत मामाकडे रागाने बघत, आईला नजरेने खुणावून, मामा कधी जाणार हे विचारत होतो. आईने माझ्याकडे थोडे दुर्लक्षच केले. कारण बऱ्याच दिवसांनंतर माहेरचे कोणी आलेले पाहून, ती खुश झालेली होती. माझ्या रागाचे कारण म्हणजे, मी माणूसघाना असल्याचा नव्हता, तर अश्या प्रचंड थंडीमध्ये मामा इथे कशाला तडफडला याचा होता. कारण माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता. तो म्हणजे, पांघरायला फक्त मोजून दोनच गोधड्या, एक आईसाठी आणि दुसरी माझ्यासाठी आणि मोठ्या भावासाठी, बरं ती पण चार ठिकाणी ठिगळं लावलेली. आता आमच्या वाट्याची गोधडी बंडूमामला दयावी लागणार आणि भर थंडीमध्ये कुडकुडत आम्हा दोघांना भावांना, साडी अंगावर पांघरून रात्र जागायला लागणार. नाहीतर आई, आपल्या भावासाठी, तिची गोधडी बंडूमामला देणार आणि ती थंडीमध्ये कुडकुडत जागी राहणार. एकतर आई आमची गोधडी देवू देणार नव्हती, म्हणजे ती स्वतःची गोधडी मामाला देणार आणि दिवसभर प्रचंड कष्ट करून आलेली बिचारी रात्रभर कुडकुडणार. मला या विचारानेच बंडूमामाचा मनस्वी राग यायला लागला होता. पण मामाच्या ते गावीदेखील नव्हतं. त्याचं नेहमीप्रमाणे जोरजोरात हसत गप्पा मारणे चालू होते. आई आज्जीची खुशाली विचारात होती, आणि कधी नव्हते तो मामा त्यांच्या लहानपणीच्या आठवणींच्या गप्पांमध्ये रमून गेला होता. एवढ्यात मोठा भाऊ देखील कामावरून आला. मग आम्ही सगळ्यांनी सोबत जेवण केले. जेवणावर प्रचंड प्रेम असलेला, मागचा पुढचा विचार न करता तुटून पडणारा, पण त्यादिवशी मामाने अगदी कमीच जेवण केले. गप्पांमध्ये तो एवढा रमून गेला होता कि, ताटामध्ये काय काय वाढलंय, याचे देखील त्याला भान नव्हते. बंडूमामाची जेवण झाल्यावर चूळ भरण्याची एक वेगळीच खासियत होती. जेवण झाल्यावर तोंडात थोडं पाणी ठेवून तोंडात बोट घालून दातांवर खसाखसा घासायचा आणि पाणी पिऊन टाकायचा, मला तर तो प्रकार फारच किळसवाना वाटायचा. पण मामाला कधीच कोणाची फिकीर नसायची, अगदी कोणाचीच. जेवण आटपल्यावर आईने भांडी घासायला घेतली आणि मी झाडून घेवून अंथरूण टाकायला. तरी देखील मामाच्या तोंडाचा पट्टा अखंड चालूच होता. लहानपणी त्या सगळ्या भावंडानी मिळून खेळलेले खेळ, त्यांच्या चुलत्याच्या, चुलतीच्या, पुतण्याच्या, पुतणीच्या, एक ना अनेक आठवणींच्या गप्पांचे कोठारच जणू मामा रिता करीत होता. झोपायची तयारी झाली, आणि माझे लक्ष आता कोणाला गोधडीचे बलिदान दयावे लागतय? याकडेच होते. शेवटी आईने स्वतःची गोधडी मामाला दिली आणि ती साडी पांघरून घेवू लागली, तसा मामा गप्पांमधून भानावर आला, आणि म्हणाला, आरं....येडी काय काय तू तायडे...हे बघ आतमधून स्वेटर घातलाय म्या, अन वरून शर्ट...मला दी साडी... आरं...लेकरासाठी, आईची माया आन भावासाठी बहिणीची छाया अस्ती बग...लय ऊब अस्ती मायेमदी... इतका वेळ मामाबद्दल मनामध्ये दाबून ठेवलेला राग झटक्यात विरघळून गेला. आई आग्रह करीत असताना देखील, मामाने गोधडी घेतली नाही, आणि मामा गप्पा मारताच राहिला. त्याच्या त्या पहाडी हसण्याने, आणि मध्येच आईचा डोळा लागतोय कि, काय असं वाटल्यावर, व्हय रं तायडे.. असं म्हणत मामाने आम्हा दोघा भावांसोबत आईला देखील रात्रभर जागं ठेवलं. नाना पेठेमध्ये सकाळी सात वाजता आईला कामावर हजर राहण्यासाठी, साडेसहाला घर सोडायला लागायचे. त्यामुळे आई पहाटे लवकर उठून स्वयंपाक आवरायची. दुसरा दिवस उजाडला तरी मामाच्या गप्पा काही संपतच नव्हत्या. आईने सगळं आवरलं आणि मामाला म्हणाली, “ कामावरून सुट्टी घ्यायची असेल तर आधीच सांगावं लागतं, नाहीतर काम करून देखील दोन दिवसांचा पगार कट करतात. मी कामावरून लवकर येईन संध्याकाळी मामा म्हणाला आरं तायडे...एवढा येळ नाहीये...आता आलोयच पुण्यात तर बाकीच्यांना पन भेटून घेतु कि....” आईने खूप आग्रह केला, पण मामाने अजिबात ऐकलं नाही. आईला म्हणाला “तुज्या हातचा पेशल चहा दे करून” फुरके मारत-मारत, बशीमध्ये खोलवर बघत, मामानं चहा संपवला. तेही अजिबात न बोलता. खालच्या नजरेने बघत, मामा आईला म्हणालं “दाजी गेल्यावर, तू ज्या कष्टानं पोरांसाठी करतीयास ते बगून खरंच लय भारी वाटतंय...अशीच गुनान रहा...माग पुड पोरं मोठी झाल्यावर तुला म्हातारपणात लय चांगली सांभाळतील...” रात्रभर हसून बोलणारा बंडूमामा अगदी गहिवरून बोलत होता. माझ्याकडे बघून म्हणाला,” बाबा रं...म्हातारीला इसरू नगा...गड्यावानी तुमच्यासाठी कष्ट करतीया...लांड्या-लबाड्या, शिंदळकी करू नगा...मानुस म्हणून जगा” आईला इकडं कामाला उशीर होत होता. मामा असं बोलल्यावर तिचा पायच निघत नव्हता. पण परत मामा आपल्या पहाडी हास्यानं म्हणाला, “आता जातू...अजून लय कामं शिल्लक हायेत” आई आग्रह करीत राहिली पण मामा आंघोळ न करता, आहे तसाच, शबनमची पिशवी खांद्याला अडकवून बाहेर पडला. आई आणि मी दारात उभे राहून मामाला बघत होतो. बंडूमामा ताडताड चालत बाहेर पडला. आम्ही दारात उभे राहून त्याला निरोप देतोय हे माहित असून देखील, त्यानं एकदा पण माघारी वळून पाहिलं नाही. कोपऱ्यावरच्या घराच्या बाजूने मामा नजरेआड झाला. का कुनास ठावून, आई त्यादिवशी कामावर जायला मागे पुढे करीत होती. तिचे कामावर जाण्यासाठी मन होतच नव्हते, शेवटी ती कामावर गेली. मी देखील शाळेत जाण्याची तयारी करण्यासाठी घरात आलो.

थोड्या दिवसांनतर समजले, बंडूमामा गेला, ब्लड कॅन्सरने. डॉक्टरांनी मामाला सांगितले होते, पण त्याने कोणालाच कळून दिले नव्हते, अगदी घरी आजीला आणि मामीला देखील. त्याची एक इच्छा होती, आपल्या सगळ्या भाऊ, बहिणींना, जवळच्या नातेवाईकांना भेटायचे, अगदी शेवटचे. आम्हाला भेटून गेल्यावर तो आणखीन कोणा-कोणाला भेटायला गेला होता, हे देखील आम्हाला माहित नाही. तशी कोणी एकमेकांकडे विचारणा देखील केली असली तरी, ती माझ्यापर्यंत पोहोचली नव्हते. पोहचले होते ते फक्त, बंडूमामाचे ते समोरच्याची फिरकी घेवून होणारे गडगडाटी हास्य आणि महत्वाचे म्हणजे, माणूस म्हणून जगण्याची कला. बंडूमामाला खरंच कधीच कोणाची फिकीर नसायची, कोणाचीच, अगदी त्या तुच्छ मरणाची देखील.

आज घरामध्ये भरपूर अंथरायला, पांघरायला गोधड्या, ब्लान्केट, घालायला स्वेटर, झालंच तर जर्किन, कानटोपी, असे बरेच काही आहे. तरी देखील भर थंडीमध्ये जेव्हा जेव्हा अगदी सहज जरी कुडकुडायला होते,  तेव्हा आपसूक दाराकडे लक्ष जातं. असं वाटतं कि, दारात उभा राहून बंडूमामा माझ्याकडे बघून हसतोय.


- सुरेश तु. सायकर