Sunday 11 October 2015

मी आणि स्मार्ट?फोन....

हातावर मारलेल्या झिकझाक पद्धतीच्या पुसट रेषा पाहून एकदम आठवलं, दोन दिवसापूर्वी काही कामानिमित्त बाहेर जायचे होते आणि सोबत मित्र देखील येणार होता. त्याला भेटलो गप्पा मारल्या आणि मित्राला अचानक एका कामासाठी जायची आठवण झाली. बरं, त्याला यायला अर्धा तास लागणार होता तेव्हा नेहमीप्रमाणे आपण माणसं न्याहाळत बसूयात असं स्वतःशी म्हणेपर्यंत त्याने त्याचा स्मार्टफोन माझ्या हातात दिला आणि म्हणाला ‘माझ्यामुळे तुला थांबावं लागतंय तेव्हा मी येईपर्यंत डाऊनलोड केलेला नवीन साऊथ इंडिअन पिक्चर बघ, तुफान फायटिंग आहे’. मी अजूनही स्मार्टफोन हाताळण्यासाठी इतका स्मार्ट झालेलो नाही हे त्यालाही ठावूक. तेव्हा त्याने व्हिडिओ डाऊनलोड केलेल्या फोल्डरमध्ये जाण्यासाठी एक विशिष्ट पासवर्ड असतो हे सांगितले आणि बोटाने आडव्या तिडव्या रेषा मारत व्हिडिओ ओपन करून दाखवला आणि ‘असं ओपन कर आणि पिक्चर बघ’ असं म्हणाला अन निघाला. मी बावळटासारखं त्याच्याकडे पाहत होतो, खरंतर त्याने पासवर्डरुपी मारलेल्या आडव्यातिडव्या रेषा माझ्या स्मरणातून कधीच पुसल्या गेल्या होत्या. याबाबत माझे अज्ञान त्याला पुरेपूर ठावूक असल्याने तो पुन्हा एकदा सांगू लागला त्याक्षणी मी पेन घेवून तो मारत असलेल्या रेषा पाहून हातावर रेघोट्या मारल्या. जमतंय कि, असं मनाशी म्हणून त्याच्याकडे पहिले तर ‘काय बावळट आहेस रे’ असा त्याचा अविर्भाव होता. असो. अनेकदा अश्या गोष्टी दिसत असून देखील त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करणे हे खूप जिकरीचे आणि....पुन्हा एकदा,असो. थोडक्यात जितके जास्त फोल्डर तितके जास्त पासवर्ड.   

तर मित्राने माझ्या हातात स्मार्टफोन सोपविला आणि तो त्याच्या कामासाठी निघून गेला. मी पिक्चर चालू केला आणि मान खाली घालून तिथे उभ्या असलेल्या सजीवांमधून क्षणात गायब होवून स्वतःच्या कोशात गेलो. अनेकदा अशी टाळकी मान खाली घालून इवलीश्या स्क्रीनवर डोळ्यांचे आकुंचन करून स्वतःमध्येच मग्न झालेली पाहून त्यांच्या अश्या एकटेपणाची कीव करावीशी वाटायची. आज मित्राच्या कृपेमुळे मी त्यांच्यापैकी एक झालो होतो आणि कोणीतरी माझी देखील कीव करीत असेल इतका विचार करायला मी निदान त्यावेळी तरी सजीव असायला पाहिजे ना. इतक्यात मोबाईल वाजला आणि मी सजीवांमध्ये म्हणजे भानावर आलो. स्क्रीनवर एक नंबर आला, अश्यावेळी दुसऱ्यांच्या फोनवर आपण उत्तर देणे सोईस्कर वाटले नाही म्हणून फोन सायलेंट मोडवर टाकला. काही सेकंदानी फोन कट झाला. मी पुन्हा व्हिडिओच्या फोल्डरमध्ये गेलो तर तो ओपन होण्यासाठी ‘खुल जा सिमसिम’ प्रमाणे पासवर्ड सांगा म्हणून अडून बसला. तसा मी हुषार आहेच, कारण लक्षात न राहण्याच्या सवयीमुळे अनेकदा पंचाईत आणि हसू होत असल्याने स्वतःच्या मोबाईलवर (स्मार्ट मोबाईल नाहीये हो...सांगितलंय ना आधीच) स्मार्टपणे ‘टू डू लिस्ट’ या एकमेव ऑप्शनचा पुरेपूर वापर करून घेतो. त्याची क्षमता फक्त पाच गोष्टी लक्षात ठेवण्याची असल्याने अनेकदा कसरत करावी लागते, बघा, जुन्या का होईना पण तंत्रज्ञानाला देखील काहीवेळेस मर्यादा असते केवळ या विचारानेच आतल्याआत अगदी सुखावून गेलोय. तर, मित्राने सांगितलेला पासवर्ड हा झीकझाक पद्धतीचा असल्याने तो त्यावर कसा सेव्ह करून ठेवणार म्हणून हातावर आधीच त्या झिकझाक रेघोट्या मारलेल्या होत्या त्या उपयोगी आल्या. बोटाने स्क्रीनवर रेघोट्या मारल्या आणि डायरेक्ट पिक्चर सुरु झाला आणि मी पुन्हा एका क्षणात सजीवांमधून स्वतःच्या कोशात गेलो. सेनापती बापट सारख्या प्रचंड रहदारीच्या रस्त्याच्या कडेला बसलेलो असूनदेखील आणि हेडफोन नसूनदेखील त्या मोबाईलच्या इवल्याश्या स्पीकरमधून येणारा हळुवार आवाज देखील प्रचंड पुरेसा वाटत होता. नाहीत्यावेळेस त्याच प्रचंड रहदारीमध्ये एखादयाशी मोबाईलवर बोलायचे म्हंटल्यावर अंगावर काटाच येतो. अनेकदा मी अश्या गर्दीच्या ठिकाणी किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी मोबाईलवर आलेला कॉलदेखील घेत नाही. कारण आपण फोनवर बोलत असतो आणि आपण जे बोलतोय ते समोरचा ऐकतोय असं वाटून आपण झपाटल्यासारखे बोलतच राहतो. त्याचवेळी विनाकारण वाजवल्या जाणाऱ्या हॉर्नचा आवाज असा काही मिक्स होतो कि, समोरच्याने आपल्याला मूर्ख समजून कधी फोन कट केलाय हे देखील समजत नाही. मग अश्यावेळी फोन न उचलेला बरा. तर, पिक्चर बघण्यात तल्लीन झालेलो असताना पुन्हा एकदा फोन वाजला मग स्वतःच्या कोशातून सजीवांमध्ये आणि फोन पुन्हा सायलेंटवर. बिचारा वाजून वाजून कट झाला. पुन्हा पासवर्ड, पुन्हा आडव्यातिडव्या रेषा आणि पुन्हा पिक्चर चालू, पुन्हा सजीवांमधून स्वतःच्या कोशात. थोड्यावेळाने पुन्हा फोन वाजला मग स्वतःच्या कोशातून सजीवांमध्ये आणि फोन  सायलेंटवर, या वेळेस मात्र मित्र आला, त्याला फोन आलाय सांगितल्यावर त्याने तो घेतला आणि बोलायला लागला.

मनात विचार आला, सध्या आपणदेखील स्मार्टफोनच्या फिचर प्रमाणेच आपले जीवन जगत आहोत, एकलकोंड्यासारखे, स्वतःच्याच कोशात. म्हणजे आतल्याआत कुढत बसत आपण आपल्या मनाची कवाडे बंद करून घेतलेली आणि आतमध्ये कोणालाही अजिबात प्रवेश नाही. जर एखाद्याला प्रवेश दयायचा असल्यास आडवा येतो पासवर्ड. म्हणजे समोरची व्यक्ती आपली गुपिते सांगण्याइतपत योग्य आहे कि नाही याची शंका येवून फक्त वरवरचे बोलणे, समाजामध्ये न मिसळणे, एखाद्याच्या समारंभासाठी आमंत्रण असूनही टाळणे, गर्दी किंवा माणसांचा समूह नकोसा वाटणे, एकांतात रहावेसे वाटणे असे एक ना अनेक प्रकार. स्वतःच्या आईवडिलांनसोबत व्यक्त होताना देखील हातचे राखून सांगणे, इतकेच काय तर लग्न झालेले पुरुषदेखील स्वतःच्या बायकोपासून बऱ्याचदा काही गोष्टी लपवून ठेवतात. आपण सांगितलेली गोष्ट तिला कितपत पटेल अन तिने त्या गोष्टीचा गैरसमज करून घेतला तर? इतकेच काय, तर आपल्या मनात एखादा विचार असाही निर्माण होवू शकतो कि ज्याचा सुगावा बायकोला लागला तर काय? या विचाराने देखील ती व्यक्ती, त्या विचारांना पासवर्डच्या आतमध्ये कायमचे बंदिस्त करते. नेमकी अशीच स्थिती बायकांच्या बाबतीत घडते, आपल्या नवऱ्याला आपण एखादी गोष्ट सांगावी आणि त्याने त्याचा सरळ अर्थाने विचार केला तर ठीक अन्यथा त्याच्या विपरीत घडले तर? या विचाराने मनात असूनदेखील त्या शेअर करीत नाहीत. मग वाढत जातात कुलुपबंद नाती. भाड्याने शेजारी रहायला आलेल्या कुटुंबाची फक्त माहितीच नाही तर नाव देखील अनेकदा आपल्याला माहित नसते आणि ते असावेच अशी काही अट देखील नाही. तरीही आपण स्वतःहून चौकशीला गेल्यास समोरच्यांच्या वागण्या बोलण्यामधला तुटकपणा सहज लक्षात येतो. ‘कशाला हव्यात फुकटच्या चौकश्या’ अश्या अविर्भावात पहिले जाते. मग एकूण परिस्थितीचा अंदाज आल्यावर आपण तिथून काढता पाय घेतो. आपण बाहेर पडल्या पडल्या होणाऱ्या दरवाज्याच्या ‘धाडडड्’दिशी आवाजावरून ओळखून जायचे कि आपले त्या घरात पुन्हा कधीच स्वागत होणार नाही. त्या एकाच दरवाजाला कितीतरी पासवर्डस, खालची कडी, वरची कडी, की-व्होल, सेफ्टीचेन, भरीसभर म्हणून सेफ्टीलॉक आणि त्यावर कडी म्हणजे बाहेर भक्कम तटबंदीचा लोखंडी दरवाजा. आपटलेल्या दरवाजावरून समजून घ्यायचे कि तिथला पासवर्ड किती घट्ट आणि अनब्रेकेबल आहे ते. परंतु आपण आपल्या लहानपणापासून नेहमीच माणसांच्या गराड्यात वाढलेलो असल्याने आणि अश्या परिस्थितीला सामोरे गेलो नसल्याने सुरुवातीला त्रास होतो. परंतु पुढेपुढे सराईतपणे अश्या प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ आपोआप आपल्यात तयार होते. म्हणजेच नकळतपणे आपणदेखील पासवर्डरुपी कुलुपबंद व्यवस्थेचे कधी भाग होवू लागतो हे देखील समजत नाही. मग हीच व्यवस्था आपल्याकडून आपल्या मुलांना देणगीदाखल मिळते आणि मग वाढत जाते पासवर्डचे अनब्रेकेबल जटील जंजाळ.    
           
अनेकदा आपण व्यक्ती समूहामध्ये असतो, हस्तांदोलन करतो, समोरच्याशी बोलत देखील असतो, व्यक्त होत असतो, हसत असतो, पटल्यास टाळीरुपी प्रतिक्रियादेखील देत असतो. पण तरीही आपण त्या व्यक्तीशी खुलून बोलत नसतो, अगदी वरवरचे असले प्रकार चालू असतात. बोलावेसे, विचारावेसे वाटून देखील कृत्रिम हास्याने बोलत असतो. पण जेव्हा ती वेळ येते आणि आपण ती गोष्ट विचारतो तेव्हा समोरची व्यक्ती सराईतपणे तो विषय टाळून आपली पासवर्डरुपी बंदिस्त कवाडं उघडतच नाही. अगदी आपली स्वतःची मुलं देखील आपल्याला त्यांच्या बाबतीत घडणारी प्रत्येक गोष्ट सांगतीलच असे नाही. अनेकदा आपण स्वतःहून विचारल्यावर देखील ती अगदी वरवरचे सांगतील. फक्त बापच नाही तर आजकाल आयांना देखील असेच वरवरचे ऐकून खरे वाटायला लागते. कारण आपल्या मुलांना आपण पूर्वी जे आयुष्य जगलोय ते कसे अवघड, लढाईचे आणि हलाखीचे होते याचे वर्णन करून वारंवार सांगत असतो. त्यामुळे मुलेदेखील अश्या विरुद्ध विचारप्रवाहाच्या विरुद्ध जावून काही वेगळे धाडस करायचेच म्हंटल्यावर अनेकदा विचार करतात. मग अश्यातच काहीजण स्वतःला हवीशी वाटणारी ती गोष्ट करण्याचे धाडस खाजगीत करतात आणि वारंवार करीत राहतात, असे करत असताना ती गोष्ट घरच्यांना समजणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते आणि त्यांना साथ मिळते ते अश्याच पद्धतीने पासवर्डबंद आयुष्य जगणाऱ्या समवयस्कांची. जितकी जास्त गुपिते तितके जास्त पासवर्ड झिकझाक पद्धतीचे. मित्राने सांगितले कि एखाद्या अनाहुताने तीन पेक्षा जास्त वेळेस चुकीच्या पद्धतीने रेषामारून फोल्डरमध्ये जाण्याचा प्रयत्न केला कि मोबाईलमधला सायरन वाजायला लागतो आणि कॅमेरा आपोआप सुरु होवून समोरचा अनाहूत त्यात बंदिस्त होतो. अगदी तसेच, जेव्हा अश्या पासवर्डरुपी माणसांचे बंदिस्त आयुष्य अनवधानाने ओपन होते तेव्हा नात्यांचा सायरनरुपी स्फोट होवून समोरची व्यक्ती समाजासमोर उघडी पडते. 
                                
म्हणून वरवर चांगली दिसणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू किंवा गोष्ट स्मार्टच असेल असे नाही. तेव्हा पासवर्डरुपी बंदिस्त आयुष्याची कवाडं उघडी करा.....आणि मोकळेपणाने जगा.

-सुरेश सायकर     

Friday 25 September 2015

गणपतीबाप्पा मोरया...


झोपेचे आणि माझे आधीपासूनच वाकडे आणि त्यात जागायची संधी मिळाली कि मग विचारताच सोय नाही. तशी संधी चालून यायची ती गणपतीच्या दिवसांमध्ये, दिवस काय आणि रात्र काय काहीच पत्ता लागायचा नाही. आमच्या इथे दोन वेगळी गणपती मंडळं होती, एक वडारी समाजाची मुलं असलेली आणि एक इतर समाजाची मिळून राहणाऱ्या लोकांची म्हणजे आमचे ‘अष्टविनायक मित्र मंडळ’. वडारी समाजाची मुलं आमच्या वाडीमध्ये येवून लोकांना वर्गणी मागायची पण आमच्या इथली मुलं त्यांच्या एरियामध्ये कधीच जायची नाही आणि त्यामुळे वारंवार दोन्ही मंडळांमध्ये खटके उडायचे. एखाद दुसऱ्याला गचांडी पकडून जाब विचारायचे पण तुंबळ अशी हाणामारी व्हायची नाही. बऱ्याचदा फक्त खोलवर रोखून पाहणारी नजर काम करून जायची. तर अश्या वातावरणात राहत असल्याने आपोआप अंगात थोडीफार रग यायची. पण आईला समजले तर, फक्त या एका विचाराने ती रग जागच्या जागी मिटायची. 
 
आमच्या अष्टविनायक मंडळाचा मंडप जो होता तो मी राहत असलेल्या घराच्या समोर होता. दहा दिवस आधीच लोखंडी पहारीने खड्डे खोदून खांब रोवण्याचे काम चालू व्हायचे म्हणजे खांब रोवून फक्त सांगाडा उभा केला जायचा. पण त्या खोदलेल्या खड्ड्यांचा कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेवूनच काम सुरु व्हायचे. मंडळामध्ये असणारी मोठी मुलं आम्हाला फक्त ऑर्डर न सोडता स्वतः कामं करायला मदत करायची. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमची नवीन पिढी तयार होत होती. काथ्या बादलीत भिजायला ठेवून आडव्या फळ्या टाकायच्या आणि मग भिजेल्या काथ्याने फळ्या करकचून बांधायच्या. डोकोरेशन साठी केलेली मेहनत पाण्यात जावू नये म्हणून चोहोबाजूने आणि वरतून लोखंडी पत्रा लावला जायचा कारण पाऊस हा हमखास येणारच. पत्रा दिसू नये म्हणून आतमधून चारही बाजूने आणि वरती पांढरा कपडा लावला जायचा आणि त्याचबरोबर दिवसा गणपतीबाप्पाला झाकायला समोर मोठा पांढरा पडदा. दिवसा प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला असल्याने हि सर्व कामे चालायची ती रात्रीचीच, तेव्हा रात्रभर जागावे लागणार असल्याने चहा तर हवाच मग नंबर प्रमाणे प्रत्येकजण चहाची जबाबदारी घ्यायचा. पंप मारून स्टोव्ह सुरु करायचा आणि त्यात होणारा स्टोव्हचा आणि भांड्याचा आवाज येवून देखील कोणाच्याच घरचे झोप मोडली म्हणून किरकीर करायचे नाहीत. आमच्यासाठी रात्रभर जागवण्याचे काम करायचा तो चहा आणि मोठ्या मंडळींना जागवण्याचे काम करायचा बार...गायछापचा.  
      
या तयारीबरोबरच सुरु व्हायची लगबग ती म्हणजे देखाव्याची, यंदा कोणता देखावा करायचा याबद्दल चर्चा व्हायच्या, कोणी म्हणायचे हलता देखावा, कोणी म्हणायचे गाण्यावरचे लायटिंग, कोणी म्हणायचे निसर्गदर्शन किंवा कोणत्यातरी किल्ल्याची प्रतिकृती. प्रत्येकाला वाटायचे कि त्याची कल्पना वास्तवात उतरावी पण मेन मुद्दा यायचा तो म्हणजे खर्चाचा आणि मग जास्त खर्चिक देखावे आपोआप मागे पडायचे आणि कमी खर्चाच्या देखाव्यांचा विचार केला जायचा. एके वर्षी मंडळाने ठरवले कि,हलता देखावा करायचा पण तो थोडा खर्चिक असल्याने मागे पडू पाहत होता, त्यावर उपाय म्हणजे देखाव्यातील त्या मूर्तींची हालचाल करण्यासाठी मंडळातील लहान आणि तरुण मुलांनी जबाबदारी घ्यायची. म्हणजे प्रत्येक वाक्याला त्या त्या मूर्तीची हालचाल करायची. वरकरणी सोप्पं वाटत असणारं काम नंतर नंतर खूपच त्रासदायक वाटायला लागलं. मांडवाला खालून पडदे गुंडाळलेले आणि आम्ही खाली, मिळाली तर खुर्ची नाहीतर दोन पायावर बसून प्रत्येक मूर्तीची हालचाल करायला बसायचो. त्रासदायक जरी असले तरी त्यामध्ये गंमत आहे असं हळूहळू जाणवायला लागलं. सगळ्यात आधी मंडळाच्या गणपतीच्या आरती व्हायची आणि त्या आरतीसाठी झाडून सगळी मंडळी हजर असायची. मग ज्येष्ठ व्यक्तीला आरतीचा मान देवून आरती केली जायची, प्रत्येक जण स्वखर्चाने प्रसादाची सोय करायचा. सरकारी नोकरदार असणारी मंडळी पेढा किंवा खव्याच्या मोदकांचा प्रसाद आणायचे तर तुटपुंजा पगारदार मंडळीचा हमखास ठरलेला प्रसाद म्हणजे केळी. समजा उद्या एम.एस.बी. मध्ये काम करणाऱ्या आणि रोज मुंबई पुणे अप डाऊन करणाऱ्या कुर्डेकर मामांचा नंबर असेल तर हमखास समजायचे कि, खव्याचे मोदक किंवा पेढा येणार आणि तेही दोन ते तीन बॉक्स. आणि त्यानंतर रिक्षा चालवणाऱ्या शिंदे मामांचा नंबर आला की, दोन डझन केळी फिक्स. छोट्या चकत्या केल्या कि, भरपूर प्रसाद व्हायचा. मंडळाच्या गणपतीची आरती झाली आणि सगळ्यांना प्रसाद वाटून झाला कि मग बाकीच्यांच्या घरातल्या गणपतीच्या आरतीसाठी आम्ही निघायचो. मग काय नुसताच कल्ला व्हायचा. सर्वात आधी, कुर्डेकर मामांच्या घरची आरती प्रसाद,पेढा किंवा मोदक आणि पुढे उभे राहणाऱ्या मुलांना टपलांचा प्रसाद, नंतर शिंदे मामांच्या घरची आरती, प्रसाद, केळी, आणि पुढे उभे राहणाऱ्या मुलांना टपलांचा प्रसाद, नंतर विकी जागडेच्या घरी आरती, प्रसाद, उकडीचे मोदक, आणि पुढे उभे राहणाऱ्या मुलांना टपलांचा प्रसाद, सकाळवाले मोरे, प्रसाद, साखर-खोबरे किंवा केळी, आणि पुढे उभे राहणाऱ्या मुलांना टपलांचा प्रसाद, वरेंच्या घरीची आरती, प्रसाद, केळी, आणि पुढे उभे राहणाऱ्या मुलांना टपलांचा प्रसाद, असे करत करत अख्ख्या वाडीला प्रदक्षिणा घातली जायची. सर्वात शेवटची आणि त्या वयात कंटाळवाणी वाटणारी आरती म्हणजे भाजीवाल्या विदर्भीय देशमुखांच्या घरची आरती, किमान पाच ते सहा इतर देवांच्या, देवीच्या मोठमोठ्या आरत्या झाल्यावर मग मूळ गणपतीच्या आरतीपर्यंत पोहचायला अर्ध्यातासांपेक्षा जास्त वेळ जायचा, प्रसाद, साखर-खोबरे, आणि इथे मात्र पुढे कोणीच उभे रहायला तयार व्हायचे नाही मागे-मागे करत मुलं अगदी देशमुखांच्या दरवाज्यापर्यंत यायची, आरती करणाऱ्या देशमुखकाका आणि मुलांच्या मध्ये प्रचंड अंतर आणि जेव्हा ‘घालीन लोटांगण... म्हणायला काका वळायचे तर मुलं इतकी लांब पाहून नजरेने त्यांना पुढे या असे दटावायचे. मग त्यातल्या त्यात पुढे उभे राहणाऱ्या मुलांना टपलांचा प्रचंड प्रसादच प्रसाद.

देशमुखांचे शेवटचे घर झाले कि मग घरी जेवायला जायचे, जेवणानंतर स्वीट खाल्ले जाते पण आम्ही जेवणाआधीच खायचो फक्त गणपतीच्या दिवसांमध्ये...असो. तर जेवण झाले कि, मोर्चा पुन्हा वळायचा मंडळाच्या मंडपाकडे आधीच बसून असलेल्या मुलांमध्ये सामील व्हायचो आणि गप्पांचा फड रात्री उशिरापर्यंत चालायचा. कोणत्या मंडळाने कोणता देखावा केला, किती खर्च केला, कोणाची किती वर्गणी जमा झाली, कोणत्या दोन मंडळांमध्ये खुन्नस चालू आहे, वर्गणीवरून कशी दोन मंडळांमध्ये मारामारी झाली अश्या एक ना अनेक गप्पा. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर टाकायला जायचे असून सुद्धा कधीच वैताग किंवा आळस आला नाही. शहरातल्या बऱ्याच मोठमोठ्या मंडळांचे देखावे गणपती बसल्यावर देखील पूर्ण झालेले नसायचे. साधारण दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी ते तयार व्हायचे आणि मग सुट्टीचा आदला दिवस गाठून गणपती बघायला जायचो. काही वेळेस त्या दहा दिवसांमध्ये कोणती इतर सुट्टी यायची नाही आणि आलीच तर मुलांना शाळेला सुट्टी पण वडिलांना ऑफिसला नाही मग अश्यावेळी शनिवार गाठून सगळी मंडळी आपल्या कुटुंबकबिला घेवून देखावे पाहायला बाहेर पडायची, म्हणजे रविवार दिवसभर आराम करायला मिळायचा. गणपती पहायला जाण्यासाठी आमचा एक ग्रुप होता, विनोद भताने त्याच्या दोन बहिणी विनिता ताई, हेमा आणि त्यांच्या शेजारच्या शिंदेंच्या दोन मुली, ज्योती आणि कविता. त्या दोन मुली सहसा कोणामध्ये जास्त मिसळायच्या नाही पण विनोद सोबत आहे म्हंटल्यावर शिंदेमावशी निर्धास्त असायच्या. विनोद म्हणजे एक अजबच रसायन होतं, एकदम दिलखुलास माणूस, कधी कोणासोबत वाद नाही तंटा नाही, नेहमी हसतमुख. फक्त एक दोन वाक्यांमध्ये त्याच्याविषयी लिहिणे शक्यच नाही सविस्तरपणे लिहिणे क्रमप्राप्त. शनिवार गाठून आमचा सहा जणांचा ग्रुप गणपती बघायला निघायचा. आमचा गटप्रमुख विनोद त्याला पुण्यातल्या सगळ्या गल्लीबोळाबद्दल माहिती, कोणत्या मंडळाचा देखावा चांगला आहे, त्या देखाव्यापाशी जास्त गर्दी असल्यास तिथून बाहेर पडायचे असेल तर कोणत्या बोळातून शोर्टकर्ट घेता येईल, कुठला रस्ता कोठे निघतो, हे त्याला अगदी तोंडपाठ होते, नाहीतर एवढ्या प्रचंड गर्दीत शहाणा माणूस देखील गोंधळून जाण्यासारखी स्थिती निर्माण व्हायची. या गर्दीमध्ये देखावे पहायला येणारे कमी आणि गर्दीचा गैरफायदा घेणारे जास्त असायचे, भुरटे चोर आणि त्याहून जास्त असायचे ते स्त्रियांना आणि मुलींना नको तिथे हात लावण्यात समाधान मानणारे वखवखलेल्या नजरेची गिधाडे. अशी चीड आणणारी माणसं दिसली कि प्रचंड राग यायचा आणि आमच्या सोबत असणाऱ्या मुलींच्या अंगचट यायचा प्रयत्न करताना दिसला कि, मी मारामारीच करायचो आणि मग अशात विनोद सामंजस्याची भूमिका घेत तो वाद तिथेच संपवायचा. मला म्हणायचा, भाई, लोकं वाईट नसतात तर त्यांची वृत्ती वाईट असते. जर वृत्ती चांगली तर माणूस चांगला.त्यावेळी इतका राग आलेला असायचा कि त्याचे उपदेशाचे डोस कधीच पचनी पडायचे नाहीत. विनोदला  आवडणाऱ्या व्यक्तीला संबोधण्याची त्याची एक खास स्टाईल होती, ’भाई’. मला आमच्या वाडीतले लोक खूप रागीट म्हणायचे आणि आजही म्हणतात, पण माझा राग नेहमी असायच्या तो अन्यायाविरुद्ध मग तो अन्याय कोणत्या प्रकारचा असो. आजही मी आतल्या आत धुमसत असतो आणि तेव्हासारखा आजही व्यक्त होतो ते हातांनीच, पण आता लेखणीद्वारे. वाद निवळा कि मग डोकं शांत होण्यासाठी विनोद हसून म्हणायचा, ’चला, भाईचं डोकं गरम झालंय, बघू आईस्क्रीम किती लवकर वितळतय ते’ मग आम्ही आईस्क्रीम खायला भैय्याच्या गाडीपाशी जायचो. मग भाजलेलं कणीस, वडापाव, पोपकोर्न सगळं दाबून व्हायचे आणि त्या दिवशी होणाऱ्या सगळ्या खर्चाचा पुरस्कर्ता असायचा तो म्हणजे विनोद. शेवटच्या विसाव्याचा टप्पा म्हणजे बालगंधर्वाचा पूल, तिथं बसल्यावर जाणवायचे कि पाय दुखायला लागलेत. त्यावर उपाय म्हणजे गरम गरम चहा मग सगळी मरगळ झटकून घरी निघायचो. हे सगळे देखावे पायी फिरत पहायचो आणि पहाटे उशिरा घरी यायचो. घरी जावून सुतळी घ्यायची मग जाधव सायकलमार्ट आणि तिथून मग पेपरलाईन. इतकं फिरून पायाचे तुकडे पडलेत असं कधीच वाटायचं नाही. काही दिवसानंतर आजारपणात विनोद गेला......कायमचा आणि त्यानंतर मी गणपतीचे देखावे देखील पाहणे बंद केले...कायमचेच.

मंडपाच्याखाली बरीच जागा असायची मग अशातच मोठ्या मुलांचे रात्रभर पत्त्यांचे डाव चालायचे ते पत्त्यांचे डाव पैश्यात चालायचे. सिगरेट ओढणे, तंबाखू खावून पचापच थुंकणे असले धंदे चालू व्हायला लागले. अश्यातच कोणीतरी पोलिसांना टीप दिली बहुतेक आमचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या मंडळाने दिली असावी आणि अचानक पोलिसांची धाड पडली. पत्ते खेळणाऱ्याना पोलिसांनी पकडून नेले, मग त्यांच्या घरच्या मोठ्या माणसांनी, मुलं रात्रीची झोप येवू नये म्हणून टाईमपाससाठी खेळत होती पण पैसे लावून खेळत नव्हती असे काहीबाही सांगून त्यांना सोडून आणले. या प्रकारानंतर माझ्या सोबतच माझ्या वयाच्या इतर मुलांचे मन उडाले आणि अशातच ठरवले कि आपण आपले वेगळे नवीन मंडळ स्थापन करायचे आणि मग स्थापना झाली ‘अष्टविनायक बालमित्र मंडळ’ची.

फाटाफूट झाल्यावर मोठ्या मंडळाच्या गणपतीची स्थापना मेन रोडवर व्हायला लागली. आणि आमच्या नवीन मंडळाच्या गणपतीची स्थापना वाडीतल्या आतल्या जागेत झाली. आता नवतरुणांच्या विचाराने भारावलेले आमचे दिवस सुरु झाले. आधीपासूनच ठरवले कि वाडीतल्या लोकांना वर्गणीसाठी कोणतीही बळजबरी करायची नाही. कारण एकाच वाडीत राहून दोन वेगळी मंडळ झालेली होती त्यामुळे लोकांना असं नको व्हायला कि कोणाला किती रक्कम दयावी. शेवटी ज्यांना मनाला वाटेल तेवढी रक्कम दयावी आणि जास्तीत जास्त सहभाग दयावा असे ठरले. मोठ्या मंडळामध्ये चालणाऱ्या गैरप्रकारामुळे आधीच लोकं त्यांच्या विरुद्ध झालेली होती त्यामुळे आमच्या मंडळाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मंडप उभे करताना ज्यांना वाटेल त्यांनी तो तो खर्च करायचा, कोणी लोखंडी पत्र्यांचा खर्च उचलला, कोणी मंडपासाठी लागणारे लाकडी खांब आणि लाकडी फळ्यांचा खर्च उचलला असे करून पहिल्यावर्षी जोमात सुरुवात केली, देखावा देखील अगदी जेमतेम केला. मंडळाचा जमाखर्च अगदी काटेकोरपणे लिहून अहवाल सुरु केला. ठरल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन मंडपापाशी होवू दिले नाहीत. वरचेवर मिटिंग घेवून नियोजन करायचो काही छोटे छोटे वाद व्हायचे पण ते चहाच्या पेल्यातच संपायचे, पण एकप्रकारे ती सुरुवातच होती. वेगवेगळ्या विचारांची डोकी एकत्र आली आणि त्यातल्या त्यात प्रत्येकाला कार्यकर्ता न राहता नेता व्हायचे असेल तर मग? 

पहिले वर्ष जोमात पार पाडले. दुसऱ्या वर्षीचे नियोजन करताना बऱ्याच गोष्टी भव्य प्रकारात करव्यात असे ठरले. माझ्यासोबत काहीजणांचा विरोध होता पण प्रतिस्पर्ध्याला टक्कर द्यायची म्हणजे भव्यदिव्य करणे आलेच. अशातच एक वेगळाच पायंडा पडायला सुरुवात झाली. याआधी वाडीतल्या ज्येष्ठांना मिळणारा आरतीचा मान आता प्रत्येकजण आपल्या ओळखीच्या सो कॉल्ड नेत्याला दयायला लागला. मग अशातच मी देखील आमच्या इथल्या नगरसेवकाला बोलावले, भव्य करायचे म्हणजे निधी हवा आणि मग जास्त वर्गणी देणाऱ्याला आरतीचा मान. मी बोलावलेल्या नगरसेवकाला मान मिळाला पण मग अंतर्गत विरोध देखील वाढायला लागला. कसेबसे दहा दिवस आटपत आले  आणि अचानक काही महाभागांनी ठरवले कि या वर्षी मूर्तीचे विसर्जन करायचे नाही तर त्या मूर्तीची कायम स्वरूपी मंदिर बांधून त्यात स्थापना करायची. हेतू खूपच चांगला होता, पण मूर्तीची स्थापना करायला मंदिर कुठे होते अन ते उभारायचे म्हणजे तेवढा निधी तरी कुठे होता. नियमाप्रमाणे मिटिंग घेतली ती विकास जागडेच्या घरी, मिटिंग मध्ये पुन्हा हा विषय मांडला. मी विचार मांडला, आपण या वर्षी मूर्तीचे विसर्जन करू. आधी मंदिर बांधू आणि पुढच्या वर्षीच्या मूर्तीची स्थापना त्या मंदिरामध्ये करू. यावर्षी ते शक्य नाही कारण मंदिरासाठीची जागा निश्चित नाही, निधी नाही आणि कोणतीच योजना तयार नाही. सर्वात महत्वाचे, मंदिर बांधून होईपर्यंत सध्याची मूर्ती ठेवायची कोठे? कारण मूर्ती आकाराने मोठी होती आणि त्यामानाने इतरांची घरे लहान आणि त्यातल्या त्यात एखाद्याच्या घरी मूर्ती ठेवायची म्हणजे सोवळेओवळे आलेच त्याचे काय? वाडीतली बरीचशी मंडळी मांसाहार करणारी होती त्याचे काय? अशातच दत्त्या म्हणाला, आपण विकासच्या घरी मूर्ती ठेवू. त्याने नुकतीच त्याच्या चुलत्याची शेजारी असणारी खोली विकत घेतली होती. तिथे मूर्ती ठेवायला काही हरकत नाही. मी म्हणालो, विक्याच्या घरी ठेवण्याऐवजी तुझ्या घरी ठेवू. इतरांच्या मानाने तुझे देखील घर मोठेच आहे. यावर त्याने सांगितले कि, माझ्या वडिलांना दिवसाआड खायला मटण हवे असते. अश्यावेळी ते शक्य नाही. त्यावर अचानक विक्याने स्वतःच्या घरी मूर्ती ठेवून घ्यायची तयारी दाखवली. मी त्याला विरोध केला, त्याला म्हणालो, अरे, तू कशाला विनाकारण पुढारपण घेतोस. जो म्हणतोय यावर्षी विसर्जन न करता मूर्ती ठेवायची आहे त्यालाच ठेवून घे म्हणावं मूर्ती आपल्या घरी. खूप अडचण होईल तुला तुझ्या घरी मूर्ती ठेवून घेतल्यावर पण विक्या म्हणजे गणपतीचे दुसरे रूपच, लोकांचे भले करण्यातच आजपर्यंत त्याने धन्यता मानली आहे. कोणाला खरे वाटत नसेल तर विक्याचे डोळे बघा, सेम टू सेम गणपतीबाप्पा सारखेच, फक्त डोळेच सारखे नाही तर वृत्ती देखील बाप्पासारखीच. विक्या त्याच्या मतावर ठाम राहिला आणि माझा विरोध फिक्का पडू लागला. माझ्या या विरोधाला केवळ शरदचाच पाठींबा होता. सरतेशेवटी या निर्णयाला मी माझा विरोध दर्शवून मिटिंगमधून आणि मंडळामधून बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि पडलो देखील सोबत होता फक्त शरद. अश्याप्रकारे माझ्या सार्वजनिक मंडळातला सहभागाचा देखील शेवट झाला.....कायमचाच. एक कोडं माझं मलाच आजतागायत उलगडलेलं नाही, एखादी गोष्ट माझ्या मनातून कायमची उतरली कि मी कधीच त्याच्या वाटेला जात नाही. नात्यांच्या बाबत अशी वेळ न येवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.

-सुरेश सायकर

Tuesday 25 August 2015

मी स्वतःला कोंडून घेतलंय.....

मी स्वतःला कोंडून घेतलंय, आपल्याच लोकांपासून,
काल परवा पर्यंतचे हेच माझे लोक, आता मला परके वाटू लागलेत...
दुष्काळात विषाची बाटली शेतकऱ्याच्या उशाशी अन
पाण्याने भरलेला तुपाचा डब्बा उगीचच वाहू देणाऱ्याच्या उशाशी...
पाण्याची गरज फक्त पिण्यापुरतीच नाहीये तर पोटच्या मुलांसारखं जपलेल्या पिकांसाठी आहे,
नळ उघडा राहून उगीच वाहून जाणारे पाणी,

शेतकऱ्याला दिले तर पाण्यावाचून तडफडून मरणाऱ्या जनावरांचा शाप लागणार नाही
स्वच्छ कपड्यांसाठी लागणारे जास्तीचे पाणी वाचवून,
शेतकऱ्याला दिले तर आत्महत्येचा डाग लागणार नाही...

टिळक तुम्ही आनंदाने केसरीत लेख लिहाल तिथे,
जेव्हा तुम्ही जन्माला घातलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा अर्थ लोकांना कळेल अन
बळजबरीने गोळा केलेली वर्गणी गरजू शेतकऱ्याला दिली जाईल अन तीही
आत्महत्येच्या आधी....
कारण खरा शेतकरी कधीही स्वतःच्या जमिनीचा लिलाव होत असताना,
मर्सिडीज मधून भाषणं देत फिरत नाही,
तर तो कुढत बसतो कर्जाच्या ओझ्याखाली अन मग संपवतो स्वतःला....
नाही, खरंच नकोय खोटी सहानुभूती आणि खोटी आश्वासनं,
आणी रडतोय असं वाटून तर अजिबात नकोय अहवेलना,
जर वाटत असेल ना रडतोय, तर या सर्व सोडून आणि फक्त एकच वर्ष राबून दाखवा काळ्या मातीत,
दिवसभर काबाडकष्ट करून पाऊस जेव्हा हुलकावणी देतो,
तेव्हा उद्या नक्की पडेल या आशेवर दुबार पेरणी होते,
ती नको म्हणत असताना तिच्या गळ्यातलं सौभाग्य गहाण टाकून,
पण पेरलेलंच बी जेव्हा बनावट निघतं, तेव्हा समजेल आत्महत्या का घडतात ते,
आणि असं फक्त एकाच वर्षी नाही होत तर होत राहत वर्षानुवर्षे, 
आणि मग तिच्या गळ्यातलं नसलेले सौभाग्य पाहण्यापेक्षा ते डोळे मिटलेलेच बरे....

-सुरेश सायकर   

Wednesday 22 July 2015

फकीर...



आईला कामावर सकाळी बरोबर सात वाजता पोहचायला लागायचं. घरापासून कामाचे अंतर लांब असल्याने घाईघाई मध्ये स्टोव्हवर स्वयंपाक उरकून सकाळी सहा वाजताच निघायची. बसने गोखलेनगर पासून शनिपार आणि मग तिथून पायी चालत भवानी पेठत बुरुडगल्ली ओलांडून हमाल पंचायत कष्टाची भाकर केंद्र. सकाळी आईच्या हातचा गरमागरम आणि गोड चहा पिल्यावर पाठोपाठ मी आणि मोठा भाऊ पेपर टाकायला घराबाहेर पडायचो. माझी पेपर लाईन घराच्या जवळच होती, पण पेपर घ्यायला डेक्कनच्या गुडलक चौकात जायला लागायचे.  मग तिथून दीपबंगला चौकातून लाईन सुरु व्हायची मग ओम सुपर मार्केट, सिंबायोसिस कॉलेज असं करत जवळपासच्या सोसायटीमध्ये पेपर टाकून शेवटचा पेपर मुथा चेंबर मध्ये टाकला कि मग तिथून सरळ गोखलेनगर चौकात यायचो. सकाळी साडेसात पर्यंत लाईन टाकून पूर्ण व्हायची. सायकल दुकानामध्ये जमा झाली कि सायकलीला बांधलेली सुतळी सोडवून घ्यायची मग तिथून घराकडे मोर्चा. पेपर मालक एकदाच सुतळी द्यायचा आणि मग तीच सुतळी आपण पेपरलाईन सोडेपर्यंत वापरायची. सकाळी निघताना घरात खिळ्याला लटकवलेली सुतळी खांद्यावर टाकून भाड्याने सायकल घ्यायला सायकलीच्या दुकानात जायचो. एखादा यंत्र कामगार जसा आपले हत्यार घेवून जातो तसाच काहीसा अवतार असायचा. पेपर पडू नयेत आणि व्यवस्थित राहावेत म्हणून पेपरच्या गठ्ठ्यासोबत येणारे ब्राऊन कलरचे जाड पेपर सायकलच्या ह्यांडेल वर बांधून मग त्यावर इंग्लिश पेपरची पुरवणी बांधायचो आणि मग त्यावर लाईनचे पेपर. माझ्या शिवाय दुसरा कोणीच पेपरची पुरवणी बांधायचा नाही आणि त्यात इंग्लिश मग तर शक्यच नाही. मला टाईम्स ऑफ इंडियाची पुरवणी खूप आवडायची त्यातल्या त्यात शनिवार आणि रविवारची असेल तर विचारायलाच नको. त्या पुरवण्या इतक्या भारी असायच्या की बोटाने उलगडायच्या म्हंटल तर तेल लागल की काय असं वाटावं इतक्या त्या ऑईली दिसायच्या. आणि त्यात पिक्चरमधल्या हिरो हिरोइन्सचे येणारे फोटो आणि त्याच्या मुलाखती, त्यांच्या कपड्यांच्या नवनवीन स्टाईल, एखाद्या येवू घातलेल्या नव्या पिक्चरमधील फोटो आणि मग तो फोटो बघून मी पूर्ण पिक्चरची स्टोरी अंदाजाने मनात रंगवायचो. रविवारच्या टाईम्समध्ये चार ते पाच पुरवण्या असायच्या मग मी हळूच कोणाचे लक्ष नाही हे बघून ब्राऊन पेपरवर त्या पुरवण्या  बांधायचो आणि लगेच पेपरचा गठ्ठा ठेवायचो. मग सुतळीने तो गठ्ठा व्यवस्थित बांधायला शेळके यायचा, मालक असला तरी सगळ्यांशी प्रेमाने बोलायचा कारण रागावल्यावर एखाद्या मुलाने लाईन सोडली तर आली का पंचाईत अश्या विचारांचा तो मुळीच नव्हता. मुळातच शांत पण चिडल्यावर सौम्य भाषेत समोरच्या मुलाची बोलण्यात चड्डी उतरवायला कमालीचा हुशार होता. माझ्यासोबत जास्त करून वडारी समाजाची मुलं होती त्यामुळे ती आपआपसात वडारी भाषेत बोलायची आणि शेळकेची टर उडवायची. त्यांच्या सोबत राहिल्याने मला देखील वडारी भाषेचे थोडेफार ज्ञान व्हायला लागले होते. शेळकेच्या डोक्यावरची केसं उडून गेल्याने त्याला मुलं ‘टकल्या’ असं त्याच्या उपरोक्ष म्हणायची. तर मला चहा आवडतो हे शेळकेला माहित असल्याने मला दोनदा कटिंग चहा मिळायचा पहिला म्हणजे सकाळी सगळी मुले आल्यावर हातगाडीवरचा आणि बाकीचे मुले गेल्यावर दुसऱ्यांदा मिळायचा तो म्हणजे माझा आवडता गुडलक मधला. पेपरचा गठ्ठा बांधायचा म्हणजे वेगळेच कसब लागते अगदी शेवटचा पेपर राहिला तरीही तो त्या सुतळीने बांधलेल्या जाळीतून बाहेर पडू शकणार नाही इतका व्यवस्थित बांधायला लागतो आणि शेळके तो बांधण्यात एक नंबर होता. नेमकी गोम इथेच होती शेळके माझा गठ्ठा बांधायला आला कि त्याचे लक्ष नेमके तळाला लावलेल्या पुरवण्यांकडे जायचे. मग आरडाओरड करायचा कशाला बांधतोस इतक्या पुरवण्या म्हणून ओरडायचा तरीही मी रोज बांधायचो मग त्याला हळूहळू कळून चुकले कि मला इंग्लिश वाचण्याचे वेड आहे. कालांतराने तोही मग बडबड करायचा बंद झाला. तर सायकल दुकानात जमा करून झाली कि सुतळी खांद्यावर आणि हातात पुरवण्या घेवून घरी यायचो. मोठ्या भावाची पेपर लाईन वेगळी आणि लांब असल्याने त्याला यायला उशीर व्हायचा मग तो पर्यंत मी माझ्या कामाला लागायचो. पहिल्यांदा सगळं घर स्वच्छ झाडून घ्यायचो तो पर्यंत सार्वजनिक नळाला पाणी आलेलं असायचं. मग पिण्याची भांडी साबणाने चांगली घासून भरायचो आणि हे करीत असताना बाजूला स्टोव्हवर चहा उकळत असायचा. मनी मस्तपैक्की शेपटी अंगाभोवती गुंडाळून स्टोव्हच्या बाजूला झोपायची. थंडीच्या दिवसात तर तिची गंमतच व्हायची ती स्टोव्हच्या इतक्या जवळ जावून बसायची कि स्टोव्हच्या गरम वाफेने तिची केसं जळाली तरी तिला समजायचं नाही. मग मला केस जळाल्याचा वास आल्यावर धावत येवून तिला बाजूला सरकवायचो तरीही ती काहीच घडले नाही अश्या चेहऱ्याने तिची ती गोड गुलाबी जीभ बाहेर काढून अंग ताणून आळस द्यायची आणि पुन्हा तिथेच स्टोव्हखाली स्वतः भोवती गोलगोल फिरून पडून राहायची. आईला सकाळी कामावर जायला  उशीर व्हायचा म्हणून मी तिला फक्त स्वयंपाक करून जायला सांगायचो पण तिचा जीव तसं करायला तयार व्हायचा नाही ती शक्य तितकी कामे स्वतः करून जायला बघायची तिची धडपड बघवायची नाही म्हणून मग मीच तिला ओरडून जायला सांगायचो. स्वयंपाक केल्यावर राहिलेली भांडी घासून पालथी घालेपर्यंत चहा चांगलाच उकळलेला असायचा. तोपर्यंत भाऊ यायचा मग स्टोव्हवर त्याला अंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवायचो. मनीला तिच्या ठरलेल्या वाटीमध्ये दूध ओतले की ती खाली घातलेली मान दूध संपेपर्यंत वर घ्यायची नाही. दूध संपल्यावर तिथेच बसून तिच्या त्या गोड गुलाबी जिभेने आपल्या मिशा साफ करायची आणि मग उजव्या हाताचा पंजा उचलून जिभेने साफ करायची. हे सगळं झालं की माझ्याकडे बघून डोळे बारीक करून मान पुढे करून बघायची आणि मान झटकायची. हे सगळं झालं की तिच्या ठरलेल्या जाग्यावर जावून पुन्हा मस्तपैक्की ताणून द्यायची. मला तिचा खूप हेवा वाटायचा. वडील वारल्यावर, आम्ही गावी गेलो असता याच मनीने कोणाच्या हातचे अन्न अजिबात खाल्ले नाही की दूध प्यायली नाही. आम्ही साधारण एक ते दीड महिन्याने गावावरून परत आल्यावर मनी आम्हाला आलेलं पाहून कशीबशी घराच्या पत्र्यावरून खाली उतरली. आम्ही वडील गेल्यावर पहिल्यांदाच घरी आल्यावर शेजारपाजारचे जमा झाले होते ते पाहून आईला रडू आवरेना मी आणि भाऊ देखील रडत होतो. तर मनी आईच्या पुढ्यात येवून आईचे पाय चाटत बसली. जणू काही आईची चौकशीच करीत होती. आजूबाजूची सगळी लोकं आश्चर्य करीत होती की मांजर किती शहाणी की दुसऱ्यांच्या हातून साधं दूध न पिलेली आईला बघून तिच्या अंगात असं कोणतं बळ संचारलं की धडपडत चालत येवून फक्त आईच्या जवळच बसली. तर अशी हि आमची मनी, तिला पिल्लं झाल्यावर तिने एकही पिल्लू जगू दिलं नाही. दोन चार दिवसात मारून टाकायची आजपर्यंत आम्हाला हे कोडं उलगडलेलं नाही की तिने असं का केलं. एकमात्र आहे की मनी गेल्यानंतर आम्ही कोणताच प्राणी घरात आणला नाही. बहुतेक मनीला हेच अपेक्षित असावं. तर या अश्या मनाबाई दूध पिल्यावर मस्तपैक्की ताणून द्यायच्या आणि मग मी चपाती आणि आणि माझा ठरलेला स्टीलचा ग्लास भरून चहा घ्यायचो. चहा भरलेला ग्लास बघून भाऊ ओरडायचा पण त्याच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करून मी इंग्लिश पेपरच्या पुरवण्या समोर घेवून वाचायला बसायचो. चपाती सोबत चहाचे घुटके घेत पेपर वाचत असताना फोटो पाहण्यातच माझा जास्त वेळ जायचा. त्यांच्या स्टाईल बघून आपण देखील यांच्यासारखं राहावं असं वाटायचं...मनात. भाऊची अंघोळ उरकली की मी स्वतःसाठी पाणी गरम करायला ठेवायचो. भाऊने दहावीमध्ये दोन विषय राहिल्यामुळे शिक्षण सोडून दिले होते. घरात आई एकटी कमावणारी होती, दिवसभर चपात्या लाटून आणि भाकरी थापून महिन्याला तिचा पगार ३५० रुपये यायचा आणि त्यात फक्त खाण्याचे तिघांचे कसेबसे भागवायचो. सोबतीला दोघांची पेपर लाईन होतीच पण त्यातून पैसे खुपच कमी मिळायचे. शिल्लक हा प्रकारच माहित नव्हता त्यामुळे काहीच उरायचं नाही आणि त्यात माझे शिक्षण चालू होते. मराठी माध्यमातून शिकायला होतो म्हणून खर्च कमी व्हायचा पण शेवटी न कमावता खाणारं तोंड होतोच ना. तर भाऊ चिंचवडमध्ये  एका रबर फाक्टरीमध्ये कामाला जायला लागला. त्यामुळे आईला थोडाफार का होईना हातभार लागायला सुरुवात झाली आणि माझ्यावरचे शिक्षण अर्धवट सोडण्याचे संकट टळले. भाऊ त्याचे आवरून, नाश्ता करून झाला की त्याला डब्बा भरून द्यायचो मग तो कामाला जायचा.  

तो निघून गेल्यावर मी उगाचच घुटमळायचो, स्टोव्हची हवा कमी कर, पुन्हा पुन्हा पुरवण्या वाच असं करीत असताना डफलीवर थाप पडल्याचा आवाज यायचा तसा मी त्या आवाजाकडे ओढल्यासारखा दारात येवून उभा रहायचो. रोज येणारा फकीर माझ्या औत्सुक्याचा विषय असायचा. डोक्यावर हिरवं मुंडासं गुंडाळलेला, छातीपर्यंत लोंबणारी काळीभोर दाढी आणि मध्येच काही पांढरी झालेली दाढीची केसं, अंगात हिरवा शर्ट आणि त्यावर जाकेट आणि खाली कमरेभोवती लुंगी गुंडाळलेला, गळ्यात लाल, पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या मोठमोठ्या मण्याच्या दोन ते तीन माळा घातलेल्या असायच्या, उजव्या खांद्यावर झोळी, डाव्या हातात डफली, त्या डफलीच्या आतील कडांना स्टीलच्या पातळ चकत्या मध्ये भोक पाडून लटकवलेल्या असायच्या आणि त्यामुळे डफली सोबत त्या स्टीलच्या कडा देखील किंणकिणायच्या तो आवाज इतका सॉलिड असायचा की आजही स्पष्टपणे तो आवाज माझ्या कानात साठून राहिलेला आहे. तसेच त्याच्या उजव्या हाताच्या कोपरामध्ये स्टीलच्या कडीचा मोठा डब्बा स्थिरावलेला असायचा ज्यात भस्म असायचे आणि त्याच हातात धूप जाळण्यासाठी पितळेची छोट्या तीन खणांची छोटी मिनार असायची. त्या मिनारच्या सगळ्यात वरच्या खणात विस्तव असायचा, दुसऱ्या खणात धूपाचे खडे असायचे आणि तिसऱ्या खणात विस्तवातून तयार झालेली राख. त्याच्या झोळीमध्ये डोक्यावर आपटून आशीर्वाद देण्यासाठी मोरांच्या पिसांचा जुडगा असायचा आणि एक काळ्या रंगाचं वाडगं असायचं ते एकदम पॉलिश केल्यासारखं चकाचक काळेभोर दिसायचं. मेलेल्या माणसाची कवटी उलटी करून समोरील कपाळापासून मागच्या छोट्या मेंदूपर्यंत फोडल्यानंतर जसं मोकळं भांडं दिसेल तसं ते दिसायचं. कोणी पैसे द्यायला लागले की तो ते वाडगं पुढे करीत असायचा. त्याने पैसे हातात घेतल्याचे मी कधीच पहिले नाही. बहुतेक ते वाडगं म्हणजे एखाद्या लालची किवां श्रीमंत माणसाची कवटीच असावी ज्याच्याकडे पैसा लोहचिंबकासारखा जावून चिटकत असावा असं मला लहानपणी एकसारखं वाटत असायचं. तर तो फकीर आमच्या घरासमोर राहणाऱ्या आणि आमच्या वाडीतील इतरांपेक्षा जास्त सधन असलेल्या चौधरी कुटुंबाच्या दारासमोर जावून डफली वाजवून साईबाबांची गाणी म्हणायचा. त्या कुटुंबाची प्रमुख त्या घरातील एक स्त्री होती तिला आम्ही धोबिणमावशी म्हणायचो कारण ते धोबी समाजाचे होते आणि कपडे धुण्याचा त्यांचा व्यवसाय होता. मुंबईला धोबीघाटावर त्यांचा व्यवसाय चालत असे. तर त्या मावशी खुपच भांडकुदळ होत्या कोणी सहज जरी त्यांच्या घराकडे पहिले तर त्याची काहीच धडगत नसायची मावशी त्याच्या संपूर्ण पिढीचा उद्धार करायच्या. त्यांच्या या अश्या वागण्यामुळे कोणीच त्यांच्याकडे जात नसे किवा स्वतःहून बोलत असे. पण फकीर फक्त त्यांच्याच घरासमोर जावून गाणी म्हणायचा. मावशी माहेर येवून त्याच्या वाडग्यात पैसे टाकायच्या, कधीकधीच चिल्लरचा आवाज व्हायचा बहुतेक वेळेला नोटाच जास्त असायच्या. मग फकीर खुश होवून जोरात दुवा द्यायचा, झोळीतून मोरांच्या पिसांचा जुडगा बाहेर काढून मावशीच्या डोक्यावर जोरजोरात आपटायचा. इतर वेळेस सहज कोणी नजर मारलेल्या माणसाच्या पिढीचा उद्धार करणाऱ्या मावशी फकिराने डोक्यात मारलेल्या माराचा भक्तीभावाने हात जोडून स्वीकार करायच्या. त्यामुळे त्या फकीराचा खूप हेवा वाटायचा. मग फकीर काहीतरी पुटपुटत धुपाच्या वड्या विस्तवावर टाकायचा आणि मोराच्या पिसाने धूर मावशीच्या घरात लोटायचा. एवढं करून झाल्यावर फकीर धूप विझेपर्यंत ती मिनार मावशीच्या घराला लागूनच ठेवलेल्या लाकडी बाकावर ठेवून स्वतः तिथेच बसायचा आणि मग सकाळपासून जमा झालेले पैसे काढायचा. नोटा आणि चिल्लर वेगळ्या करून नोटा खिशात आणि चिल्लर वाडग्यात ठेवायचा. जाताना सायकलीच्या दुकानात चिल्लर देवून त्या बदल्यात नोटा घ्यायचा आणि त्या खिशात ठेवलेल्या नोटांसोबत ठेवून पुन्हा एकवार मोजून निघून जायचा.

रोजच्या खरेदीमधून मुद्दाम वाचवलेले पैसे मी त्या फाकीरासाठी ठेवायचो. मी पण दान करू शकतो हे दाखवण्यासाठी माझी धडपड असायची. एकवेळ आमचीच खाण्याची भ्रांत असायची पण हम भी कुछ कम नही हे दाखवण्याचा माझा प्रयत्न असायचा. तो फकीर येण्याच्या वेळेला सकाळी मी रोज दरवाजा उघडा ठेवून दारातच मुद्दाम रेंगाळायचो. त्याने फक्त एकदाच याचानात्मक नजरेने माझ्याकडे पहावे आणि मग मी पण दिलदारपणे त्याला हसून दान द्यावे असे वाटायचे. पण त्या फकिराने एकदाही माझ्याकडे चुकून देखील पहिले नाही. फक्त माझ्याकडेच काय तर वाडीतील कोणत्याच घरासमोर उभा राहून त्याने याचना केलेली मी कधीच पहिले नाही. तो फकीर अगदी म्हातारा होईपर्यंत रोज न चुकता येई. अशातच धोबिणमावशी आजारी पडून देवाघरी गेल्या, तरीही तो फकीर रोज येई. एकेदिवशी मी घरात काहीतरी काम करीत होतो आणि अशातच फकीराच्या डफलीचा आवाज ऐकू आला. मला वाटलं नेहमीप्रमाणे फकीर मावशींच्या घरासमोर डफली वाजवत असेल पण काही मिनटानंतर पुन्हा डफलीचा आवाज ऐकू आला. मला आश्चर्य वाटले कारण त्याला एकदा डफली वाजवल्यावर पुन्हा डफली वाजवायची कधीच गरज पडली नव्हती. मी आश्चर्याने दारात आलो तर म्हातारा फकीर धोबिणमावशीच्या दारासोर उभा होता पण आतून कोणाचाच प्रतिसाद न मिळाल्याने तो हताश होवून फक्त ‘या अल्लाह’ एवढंच पुटपुटला आणि सावकाश चालत तिथून निघून गेला...तो कायमचाच.

-सुरेश सायकर