Tuesday 17 September 2019

पुरानी डायरी...

पुराने डायरी के पन्ने
खुल गए अपने आप ही
मेरे गुजरने के बाद,
थे स्याही से लिखे हुए
मेरे कुछ अल्फ़ाज़
कुछ जज़्बात
कुछ हकीकत
कुछ सपने
कुछ यादें
कुछ भूले हुए
कुछ भुलाये हुए
कुछ मिटे हुए
कुछ मिटाये हुए
कुछ बूझे हुए
कुछ बुझाये हुए
कुछ मुरझे हुए
तो कुछ मुरझाये हुए
मेरे हकीकत की तरह
पाए मैंने
कबाड़ी के ढेरों में......


ऐ साहिर,
तू लाजवाब हैं
लाजवाब रहेंगा
अंत तक....

- सुरेश तु. सायकर

Monday 12 August 2019

#चंद्रा_अन_महापूर (दीर्घ कविता)



गोठ्यात व्यालेल्या चंद्राने
मोठमोठ्यानं हंबरून
गोठाच काय तर आजूबाजूची
आठ दहा घरं डोक्यावर घेतली होती...

आपल्या खरबरीत जिभेनं
तिनं कालवडीला चाटून पुसून
एकदम साफ केलं होतं
अन कालवडीची कोवळी,सोनेरी
कातडी एकदम रेशम सारखी
चमचम चमकत होती
कोवळ्या उन्हात
कालवडीला आपल्या कोवळ्या खुरांवर
धडपडत, सावरत कसंबसं उभं राहताना पाहून
चंद्राच्या डोळ्यात पूर्णत्वाची अन
मायेची वेगळीच चमक दिसत होती...

पोरांनी तर नुसता धुडगूस
घातलेला होता
जो तो कालवडीच्या कोवळ्या
कातडीवरून हात फिरवत होता
पोटूशी असताना
धन्याशिवाय आजूबाजूला
कोणालाही फिरकू न देणारी
चंद्रा आज कौतुकानं पोरांचा
कालवडीशी चाललेला खेळ
निवांत न्हयाळात होती
भरल्या डोळ्यांनी....

आज येरवाळीच
अंधारून आलं
काळ्याकुट्ट ढगांनी
चंद्राच्या कालवडीला
बघायला गर्दी केली काय
असं वाटावं इतकी दाट गर्दी....

विजांनी एकदम तांडवच
सुरू केलं
चंद्राची एकदम गडबड उडाली
खाटंवरून लेकरू
एका कुशीवरून खाली
पडतंय की काय
असं वाटत असताना
ओल्या बाळंतिणीला लेकराच्या
काळजीनं जसं मायेचं भरतं येऊन
बाळाला वाचवायला ताकद येते
तशी चंद्रामध्ये एकदम ताकद आली
आणि ती खुंटी भोवती गोलगोल
फेऱ्या मारायला लागली....

धन्यानं तिच्या पाठीवरून
हात फिरवून आश्वस्त केलं
पण चंद्रा काही शांत होईना
बाहेर पाऊस आणि
आत चंद्रा
दोघांचा जोर वाढलेला होता....

बराच उशिरापर्यंत
ना चंद्राच्या ना धन्याच्या
डोळ्याला डोळा लागला होता
गोठ्यात बाज टाकून
चंद्राच्या जवळ बसलेल्या धन्याला
मध्यरात्री अचानक डोळा लागला
हाताला गार गार लागल्यानं
साप पांघुरणात घुसलं
की असं वाटून धन्यानं
सावध होत
हळुवार डोळं उघडलं तर
समोर गुडघाभर पाणी
डोळे चोळून खात्री केली
पाणीच ते
त्यानं घाबरून चंद्राकडं पाहिलं
चंद्रा अवसान गळून गेल्यासारखी
झाली होती
धन्यानं एकदम पांघरून भिरकावून दिलं
कालवडीच्या उचलून
बाजं वर ठेवायला गेला
तर ते हातपाय झाडायला लागलं
अन त्याची कोवळी खुरं
बाजंमध्ये अडकायला लागली
व्याल्याने चंद्राची
उरलेली निम्मी अधिक
ताकद हंबरून गेलेली
आता ती हताशपणे
नुसतीच धन्याकडं बघत होती
अपेक्षनं....

धन्यानं, घरच्यांना आवाज दिला
मग काय एकच कल्लोळ
जो तो आपापल्या घरातून
जीव वाचवायला
बाहेर पडायला लागला
बघता बघता पाणी
कमरेच्या वर जायला लागलं
धन्यानं कालवडीला
लोखंडी पिंपावर उभं केलं
अन पायांच्या मिठीत
कसंबसं पिंप धरू पाहत होता....

चंद्राच्या डोळ्यातून
धारा वाहत होत्या
ती एकवार कालवडीकडं
अन एकवार धन्याकडं बघत होती
आशेनं....

जो तो जीव वाचवायला
धावपळ करत होता अन
श्रीपतीला पण गोठ्यातून
निघायला सांगत होता
पण श्रीपती,
त्याची बायको अन पोरं
चंद्राला अन कालवडीला
वाचवायला बघत होती
कारण एके काळी घरात
खायला काहीही नसताना
चंद्राच्या फक्त दुधानं श्रीपतीचं
घर सावरलं होतं
अन आज चंद्राला असं सोडून !
श्रीपतीनं विचार पुरात सोडून दिला
पण पूर काही केल्या पाठ सोडेना....

दिवस उजाडला पण
पाणी छातीपर्यंत पोहचायला लागलं
तशी श्रीपतीची आशा मावळली
त्यानं कशीबशी आपली नजर
चंद्राच्या नजरेला भिडवली
चंद्राच्या डोळ्यात पाणी नव्हतं
होता तो परिस्थितीचा स्वीकार
एवढ्यात बोट आली
लोकांनी बोट भरून गेलेली
श्रीपतीनं कसंबसं
बायको, पोराला बोटीत बसवलं
परत येऊन कालवडीला सावरलं
अन उचलून बोटीकडं वळणार
तोच मूक हुंकार जाणवून
त्यानं चंद्राकडं पाहिलं
अन तो थबकलाच
पुन्हा एकवार अविश्वासानं चंद्राकडं पाहिलं
ती निश्चल होती
त्याने मानेनं 'नाही' असं खुणावलं
पण चंद्रा ठाम होती
श्रीपतीनं बोटीत
पोराला पोटाशी घट्ट धरून बसलेल्या
बायकोकडं बघितलं
अन पुन्हा चंद्राकडं
चंद्रानं जणू होकाराची मान हलवली
श्रीपतीच्या डोळ्यातून घळाघळा
अश्रू व्हायला लागले
आई विना तान्हं पोर?
अन तान्ह्या पोराबिगर आई?
कोणीच विचारच करू शकत नाही
काळजावर दगड ठेवून
श्रीपतीनं कालवडीला पत्र्याच्या
ड्रमवर कसंबसं उभं केलं
पोहत चंद्राकडं सरसावला
सासरी जाणाऱ्या लेकीच्या
तोंडावरून बाप जसा हात फिरवतो
तसा त्याने हात फिरवला
चंद्रानं आपली मान पुढं करून
जणू आलिंगन दिलं
तशी श्रीपतीनं पाण्यात डुबकी मारली
अन खुंटीची गाठ सोडण्याआधी
चंद्राच्या पायाला हात लावून
आशीर्वाद घेतला
श्रीपतीच्या डोळ्यातील महापूर
आणि नदीचा महापूर एकमेकांत
मिसळून दुःख व्यक्त करीत होते
खुंटीची गाठ सोडून श्रीपती वर आला
पण त्याची हिंमत झाली नाही
मागे वळून पाहण्याची
कालवाडीच्या पाठीवरून हात फिरवून
ती बोटीकडं सरसावला
पण त्याला बोटीपर्यंत पोहचताच येईना
हात पाय एकदम गळून गेले
एवढ्यात एक-दोन जणांनी
वाहत चाललेला ओंडका उचलावा
तसं श्रीपतीला उचलून बोटीत घेतलं....

श्रीपतीची हिंमत होईना
मागे वळून चंद्राला पाहण्याची अन
बायको, पोराकडं पाहण्याची
पण त्याला बायकोच्या डोळ्यात जाणवत होती
आपल्या लेकरा प्रती
एका आईची, दुसऱ्या आईबद्दलची माया
बोट वेगानं पुराचं पाणी कापत निघाली होती
आणि चंद्राची शेवटची नजर, श्रीपतीचं काळीज.....

 
-सुरेश तुळशीराम सायकर

Thursday 18 July 2019

#पहिली_सर

अपमानाने अनेकदा
धुडकावलेले,
तुच्छ समजलेले,
ओथंबलेले,
भिजलेले,
घुसमटलेले,
कुस्करलेले,
कोमजलेले,
अव्हेरलेले,
बस्स...
आता नाही, असं म्हणून
अगदी गळ्यापर्यंत आलेले
.....शब्द


पुन्हा एकवार
विसर्जित केले
पहिल्या पावसाच्या
वाहत्या पाण्यात
नाते
टिकवण्यासाठी
अन
नात्याच्या वेलीची
कोमेजलेली पालवी
नव्याने फुलवण्यासाठी....

- सुरेश तुळशीराम सायकर

Saturday 18 May 2019

वर्गवारी

माणसाला,माणसातला 'माणूस' अभिप्रेत असतो. पण अनेकदा तो चंगळवादाचा शिकार बनल्याने जिवंतपणी माणसामधला 'अभि' वजा होऊन 'प्रेत' शिल्लक राहिलंय. जे फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करते. बरं, याला देखील माणूसच कारणीभूत असतो. कारण मनुष्यप्राण्याला एक दुसऱ्याची ईर्षा आणि कॉपी करण्याचा गुण जन्मजातच  मिळालेला असतो. तो 'असा' तर मग मी देखील त्याच्यासोबत 'असंच' वागलं पाहिजे, जर मी 'तसं' वागलं तर तो माझा वापर करून घेईल, अशी समजूत करून घेतल्याने माणसामाणसातले अंतर हे अंतरानेच नव्हे तर मनातल्या अढीने देखील वाढल्याचे दिसते. याला समाजामध्ये असलेले वर्ग देखील तितकेच कारणीभूत, निम्नवर्ग,मध्यमवर्ग,उच्चवर्ग. अश्या वर्गामध्ये समाज मोडल्याचे वरवर जरी दिसून येत असले तरीही त्या प्रत्येक वर्गामध्ये आणखीन उपवर्ग अस्तित्वात आलेले नाहीत तर जन्माला घातले गेले आहेत.

म्हणजेच, 'निम्नवर्गा'मध्ये मोडणारा दुसरा वर्ग म्हणजे उच्च-निम्नवर्ग, ज्याकडे किमान दैनंदीन गरजा पूर्ण करण्याचा आवाका असतो आणि सोबतच चंगळवादाची चव चाखण्यासाठी  प्रसंगी कर्जाच्या फेऱ्यात अडकण्याची देखील तयारी असते . पण असे असूनही ते स्वतःला मात्र निम्नवर्गातले असल्याचे मानायला तयार होत नाहीत आणि त्यांची स्पर्धा ही मध्यमवर्गीयांसोबत असते.

असाच काहीसा प्रकार 'मध्यमवर्गीयां'मध्ये दिसून येतो. यामध्ये देखील उच्च-मध्यमवर्गीय हा उपवर्ग निर्माण झालेला आहे. जो गरजेपेक्षा जास्त आणि ताळमेळा पेक्षा अधिक खर्च करण्याची उसनी ताकद राखून असतो. ज्यांची खरी स्पर्धा ही उच्चवर्गीयांसोबत असते.

तिसरा वर्ग म्हणजे, उच्चवर्गीय. या उच्चवर्गीयांमध्ये देखील अति-उच्चवर्ग हा उपवर्ग निर्माण झालेला नसून सोयीने निर्माण केलेला असतो. आपण उच्चवर्गीयांपेक्षा वेगळे आहोत, हे दाखवण्यासाठी एकमेकात चढाओढ होते. मग आलिशान जीवनाचे अतिरंजित आणि अतिरंगीत प्रदर्शन भरवले जाते. मग या सगळ्याचे अति- झाल्यावर वर्ग चा उलटा शब्द केल्यास गर्व होतो.आणि मग अति गर्व झाल्यास निम्नवर्ग, मध्यमवर्ग, उच्चवर्ग हे आपले सेवक आणि आपणच तारणहार अश्या गैरसमजातून समाजातील दुही वाढण्यास प्रारंभ होतो आणि खऱ्या अर्थाने तीच खरी समाजपरिवर्तनाची नांदी असल्याचे द्योतक आहे.

या सर्वासाठी काही अंशी म्हणण्यापेक्षा खूप जास्त कोणी कारणीभूत असेल तर ती म्हणजे आपली, शिक्षणसंस्था. याचे जिवंत आणि छोटे उदाहरण म्हणजे, इयत्ता पहिली च्या अनेक तुकड्या असतात. अ,ब,क, ड अश्या तुकड्या(वर्ग) निर्माण केल्या जातात. हुशार मुलांची 'अ', कमी हुशार मुलांची 'ब', त्याहून कमी हुशार मुलांची 'क' आणि अजिबात हुशार किंवा उडानटप्पू मुलांची 'ड' (जी चा उल्लेख 'ढ' असा केला जातो.) जर मुलांमध्ये याच वयामध्ये फरक व्हायला लागले आणि प्रत्येक 'अ' वाला 'ब', 'क', 'ड' यांना आपल्यापेक्षा कमी समजायला लागला आणि 'अ' वालेच श्रेष्ठ असं मानून 'अ' वर्गात जाण्यासाठी म्हणजेच उच्चवर्गामध्ये जाण्यासाठी धडपडू लागला, तर माणसाला, माणसातला अभिप्रेत असणारा माणूस, त्यातून 'अभि' वजा होऊन 'प्रेत' होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.

- सुरेश तुळशीराम सायकर



               

Saturday 4 May 2019

#स्वप्नांचं गाव

स्वप्नांचं गाव माहिती आहे का?
रस्ता अवघड आहे
सोप्पा करून सांगतो....
 
अपेक्षांचं ओझं
घुसमटीचा उच्चांक
भावनेचा उद्रेक
मेंदूचा ३६० डिग्री शॉट
भरीस भर म्हणून
अपयशाची भली मोठ्ठी रांग
त्या रांगेत फक्त आपणच
दुसरं कोणीच नाही
असं आपल्याला वाटतं
खरं तर
दृश्य भ्रम असतो तो
कारण आपल्याला फक्त
आपलीच स्वप्ने दिसत असतात
दुसऱ्यांची वेगवेगळी असतात
आणि आपल्याला त्यांच्या स्वप्नांशी
काहीच घेणं देणं नसतं
म्हणून
आपल्याला जशी त्यांची दिसत नाही
अगदी तशीच
त्यांना आपली स्वप्ने दिसत नाहीत....

पण हो,
ती फक्त एखाद दुसऱ्याला
दिसू शकतात
जेव्हा त्याची आणि तुमची स्वप्ने
एकसारखीच असतात
मग वाटा दूर असल्या तरी
जवळच्या वाटतात
काटेरी वाटांच्या वाटेत
स्वप्नांचे गुलाब फुलतात....

गप्पांमधून स्वप्नांमध्ये
रंग भरले जातात
हवे तसे पुसता येतात
हवे तसे पुन्हा भरता येतात
सुरुवातीचे रंगीबेरंगी रंग
कालांतराने
मग दोनच रंगात उरतात
पांढरा अन काळा
मग हळूहळू
वाटा बदलतात
फक्त
वाटा बदलतात
पण स्वप्ने तीच असतात....

कट...

- सुरेश तुळशीराम सायकर 

Wednesday 6 February 2019

नाक-पुराण

हा हा हा हा.....म्हणता तो दिवस आला. राज्याच्या स्वर्गवासी महाराणीचा पुनर्जन्म झाल्याची आणि राज्यात कुठल्यातरी घरी जन्मल्याची माहिती,पंचांग बघून पंडितांनी दिली. मग काय धुराळच....सगळे धुरिणी हात-पाय डेटॉलने स्वच्छ धुवून शोध कार्याला लागले. पण महाराणीचा पुनर्जन्म झाल्याची कोणती खूण त्या बालिकेमध्ये शोधायची, हा यक्ष प्रश्न नमक वाल्या कोलगेटने ब्रश करून 'आ' वासून समोर उभा ठाकला. तेव्हा नेहमीप्रमाणे पंडितांनी पुन्हा एकदा पंचांग काढून,विनाकारण २०-२५ पानं मागे-पुढे उलटवून, एका पानाच्या, दहाव्या (अरे बापरे....पुन्हा दहावा) एके ठिकाणी बोट ठेवून सांगितले,"महाराणीच्या आणि नवजात बालिकेमध्ये एक अनन्यसाधारण साधर्म्य आहे आणि ते म्हणजे... महाराणीचं आणि त्यांच्या पुनर्जन्मित  राजकन्येचं नाक.... शेम टू शेम आहे ('शेम' हा प्रचलित भाषेतील उच्चार आहे...प्युअर इंग्रज व्यतिरिक्त इतरजण याचा उच्चार 'सेम' असा करतात) ...euuuuuuuu...."(हे आजकाल सर्रास फेकबुकावर वाचायला आणि पाहायला मिळतं....म्हणजे अत्यंत घाईचा आणि जोरकस आनंद (आनंद...हा फसवा असतो....स्वानुभव) झाला कि, मंडळी आपला आनंद असा व्यक्त करतात. पंडितांनी वर्णन केल्या-केल्या सर्व सरदारांमध्ये उत्साहाचं वाता-वरण(साखर टाकून) निर्माण झालं. सर्व सरदार, "हुर्रर्रार्रार्रा...हुर्रर्रार्रार्रा.....हुर्रर्रार्रार्रा......" (ह्या जयघोषाचे अधिकार फक्त राजघराण्यापुरतेच  मर्यादित आहेत. आपण आपलं साधं.... 'चांगभले' बरं) असं म्हणून एकदाचे कामाला लागले.          
      
साऱ्या राज्यात दवंडी पिटली, "ऐका हो ऐका.....इकडून आलू सोडा, तिकडून सोना काडा...(अय येड्या....युवराजांची नॅशनल स्लो-गन हाये ती) राज्यातल्या सर्व प्रजेला कळविण्यात अत्यंत आनंद (अरे ह्यो फसवा असतोय रं) होत आहे कि, आपल्या स्वर्गवासी महाराणींचा पुनर्जन्म झालेला आहे हो........(ढुम...ढुम....ढुम....ढुम..... आं....कशी काय अय मुजिक.... येक नम्बर ना) महाराणीच्या आणि नुकत्याच जन्माला आलेल्या स्त्री अर्भकामध्ये एक विलक्षण, अद्भुत, जगावेगळे, रम्य हि स्वर्गाहून लंका पेक्षा भारी, साम्य आहे...आणि ते आहे..... नाकाचे..... होय, बरोबर ऐकलान (कोकणी लहेजात...) तर धारदार नाकाचे अर्भक जेव्हा सापडेल, ज्याच्या कडे सापडेल, हुकुमाप्रमाणे त्याला ताब्यात घेऊन राजवाड्यात आणून, भावी महाराणी म्हणून घोषित करण्यात येईल....... हो ......हो ......हो ......(आरं सोड कि मुजिक....एकांकिका संपायला लागलीया) ढुम...ढुम....ढुम....ढुम....."   

राज्यातील प्रजा विचारात, चिंतेत पडले. कारण राज्यात काही दिवसांमध्ये स्त्री अर्भक जन्मालाच आलेले नव्हते (भाऊ...आजकाल समद्यांना...मिशन मदून सोना काडणारा वंशाचा दिवाच पायजे असतो ना.) तरीही संबंधित अधिकारी, राज्यात सगळीकडे शोध घेऊ लागले. पण काही केल्या त्यांना नाकाशी साधर्म्य असणारे, स्त्री अर्भक सापडेना. काहींनी आपलं बाळ, राजवाड्यात जावं, भावी महाराणी म्हणून घोषित व्हावं म्हणून प्लास्टिकचं खोटं नाक लावून पाहिलं... पण सर्दीचा मोसम असल्याने, अर्भकाने तो डाव हाणून पाडला...कसं काय विचारता...कफामुळे आणि सर्दीमुळे एकसारखं गळणाऱ्या नाकावर प्लास्टिकच काय तर चांभारी दोऱ्याने खोटं नाक जरी शिवलं तरी ते फुर्रर्र दिशी उडून जाईल (खात्रीसाठी सर्दी झालेल्या लहान अर्भकासोबत एक दिवस व्यतीत करून पाहावे). आता काय क्रावे ब्रे....असा मोठा यक्ष प्रश्न पडला.                                 

खोदा चुहा अन निकली बिल्ली किंवा काखेत कळसा आणि पळसाला पाने तीन (काहीतरी चुकलंय....नाही...पंचांगामध्ये नाहीये ते) वगैरे वगैरे. तर महाराणीचा पुनर्जन्म हा कोणत्या झोपडीत, कोणत्या वाड्यात, कोणत्या फ्लॅटमध्ये, कोणत्या ब्लॉकमध्ये, कोणत्या बंगलोमध्ये, कोणत्या रो-हाऊसमध्ये, कोणत्या सेकंड होम (फॉर लेट नाईट पार्टी स्पेशल)मध्ये झालेला नव्हता (आणि होत पण नसतो.... काय??? कोण म्हणालं रे...घराणेशाही...बरं पुढे) तर दूरदेशी, साक्षात एका राजवाड्यातच झालेला होता. मग काय म्हणता,त्या नवजात अर्भकाला डायरेक्ट स्पेशल विमानाने राज्यात आणले गेले. रस्त्यावर जनता दुतर्फा, नाक साधर्म्य असणारी भावी महाराणी पाहण्यासाठी दाटीवाटीने उभी राहिलेली होती. नावाचा एकसारखा जयघोष सुरूच होता. विमानाचे दार उघडले गेले आणि सध्याच्या राणीने खुद्द, साक्षात ते अर्भक आपल्या दोन्ही हातात घेऊन, प्रजाजनांना दाखवण्यासाठी आकाशामध्ये उंचावले (भाऊ-बळी स्टाईल). त्या सरशी "हुर्रर्रार्रार्रा...हुर्रर्रार्रार्रा.....हुर्रर्रार्रार्रा......" या जयघोषाने आसमंत दुमदुमला आणि क्षणातच सगळे वातावरण नाकमय झाले.  

क्रमशः 

आं.....काय म्हणालात? नाकात काय आहे? भाऊ, नाकातच तर नथ फसलीये ना.....स्वर्गवासी महाराणीच्या कर्तृत्वाची उंची, एवढी उंच आहे ना....तिथवर पोहचायला आत्ताच्या पिढीला २ काय तर चांगले ३-४ जन्म लागतील. My IRON LADY.

-  सुरेश तु. सायकर 

Saturday 2 February 2019

#बिर्याणीपुराण

शेवटी अप्पा गेलेच.
गेली 4 वर्षे अप्पा अंथरुणाला खिळून होते. उभी हयात घर आणि मुलांना सावरण्यात आणि मोठं करण्यात गेली. जोवर अप्पांचे हात-पाय चालू होते, तोपर्यंत घरात अप्पा एक आदरणीय व्यक्ती होती. पण जशी अप्पांची रिटायरमेंट झाली आणि जवळच्या पैशांचे वाटप झाले. तसतशी अप्पांची आदरणीय प्रतिमा सावलीसारखी लहानलहान होत अदृश्य झाली. एकवेळच्या गोडीगुलाबी बोलण्याला भुलून अप्पा स्वतःला स्वर्गात समजायचे तेच अप्पा आता एकवेळच्या अन्नालाच काय तर एका घासाला पण महाग झाले होते. स्वतःच्याच घराचे वासे फिरले, तर हा पामर तरी काय करणार? या विचाराने अप्पांनी आहे ते, जसे ते, प्राक्तन म्हणून स्वीकारले.

शेवटी, पाचव्या वर्षी अप्पांनी देह ठेवला. एका घासाला महाग झालेल्या अप्पांच्या आत्म्याला शांती लाभावी, म्हणून त्यांचा 10वा मात्र जोरात करण्याचा विचार त्यांच्या घरच्या सदस्यांनी बोलून दाखवला. त्यांना कोणीतरी सांगितले की, अप्पांना इब्राहीमच्या "A-1 दमादम बिर्याणी हाऊस" इथली चिकन बिर्याणी खूपच आवडायची. खरं तर अप्पांनी तिथं बिर्याणी कधी खाल्लेली नव्हतीच. बिर्याणी महाग, एकवेळच्या बिर्याणी मध्ये घरात गरजेच्या किती तरी वाण सामानाच्या वस्तू येतील, या विचाराने अप्पांनी इब्राहीम च्या हॉटेल पासून जाताना, फक्त बिर्याणीचा 'सुगंधावरच' आपली भूक भागवली होती. विचार केलेला की, रिटायरमेंट नंतर हातात वेळ आणि बँकेत पैसा जमा झाल्यावर, खाऊ बिर्याणी हवी तितकी. पण गरज सरो आणि वैद्य मरो, अशी अप्पांची रिटायरमेंट नंतर अवस्था झालेली. घरातच तुकडा मिळेना तिथं हॉटेलात जाऊन खायला पैसा कोण देणार.
पण घरातल्या कर्त्यांना उशीरा का होईना 5व्या वर्षी(अप्पा गेल्यानंतरच्या :) ) जाग आलीच. त्यांनी ठरवलं की, अप्पांच्या 10व्याला, इब्राहीमच्या "A-1 दमादम बिर्याणी हाऊस" मधून चांगली,खूप ,लय, भरपूर अशी 1 किलो चिकन बिर्याणी आणायची आणि अप्पांच्या 10व्याला त्यांना नैवेद्य दाखविताना वाढायची. मग काय अनुपम सोहळाच, हा...हा म्हणता, अप्पांचा 10वा साजरा करायचा दिवस उजाडला. इब्राहिमला आधीच सांगून ठेवल्याने, त्याने खास अप्पांसाठी ताजी, गरम बिर्याणी बनवून 9 वाजताच तयार करून ठेवली. सदस्यांनी ( घरच्या :) ) रस्त्याने जात असताना, अप्पांसाठी चिकन बिर्याणी असं म्हणत, लोकांना भुरटे प्रेम दाखवत, नाचवत बिर्याणी घरी आणली. चांगली 1 किलो बिर्याणी...पण जसे बिर्याणीच्या पिशवीचे तोंड उघडले तसा मसाल्याचा, चिकनचा आणि स्पेशल राईसचा सुरेख संगम होऊन, घरातल्या प्रत्येक सदस्याच्या नाकात घुसला. मग पोटातल्या कावळ्यानी त्या डोम कावळ्यांना (सदस्यांना... घरच्या :) ) साद घातली. सर्व सदस्य, तोंडला सुटलेले पाणी कसेबसे जिभेने आत सरकवत, ओठांनी आतल्या आत रोखत एकमेकांकडे आशाळभूत नजरेने पाहू लागले. कोणत्या पर्स मध्ये किती माल आहे, हे न बोलता, भर रस्त्यावर लुटणाऱ्या चोरांनाच नजरेची भाषा फक्त कळते, हे साफ खोटे ठरवत, सदस्यांनी(घरच्या :) ) ठराव केला की, मेलेला माणूस, खरंच कधी येऊन घास खाल्याचे कोणी पाहिलंय का? आणि जर खात असेल तर त्याचा सीसीटीव्ही पुरावा आहे का? तर मग अप्पाच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून, केवळ श्रद्धा म्हणून, .500 (पॉईंट पाचशे ग्रॅम...हां ) बिर्याणी त्यांच्या फोटोसमोर नैवैद्य म्हणून ठेवावी, अशी 'अर्थ'पूर्ण 'संकल्प'ना मांडली आणि उरलेली.....सुज्ञास सांगणे न लागे (जे की काय असेल ते)

शेवटी काय.... तर, अप्पांच्या वाट्याला बिर्याणी खाणे नाहीच...1 किलो असो वा .500 ग्रॅम...शेवटी त्यांना 'सुगंधावरच' भागवावे लागले.

काय 'अर्थ'य असल्या 'संकल्पां'ना....
असो.

-सुरेश तु. सायकर