Thursday 15 December 2016

शहिदांची नेमकी व्याख्या कोणती ?

सीमेवर शत्रूसोबत दोन हात करीत लढताना वीरमरण आल्यावर सैनिक शहीद होतो. त्याला सरकारदरबाराकडून शहीदाचा दर्जा प्रदान केला जातो. हे अगदी योग्यच आहे, त्यांचे बलिदान नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. कारण तो देशातील अंतर्गत नागरिकांचे रक्षण करण्याच्या महान उद्देश्याने सीमेवर लढतो. सैनिक म्हणून हे त्याचे सर्वप्रथम कर्तव्य, आणि तो त्या कर्तव्याला पुर्णपणे जागतो आणि मरतो देखील.

पण जेव्हा देशाच्या अंतर्गत भागामध्ये काही आणीबाणीचे प्रसंग उद्भवतात जे नैसर्गिक नसतात. ज्याची पूर्णतः जबाबदारी लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या सरकारवर असते. अश्यावेळी ती जबाबदारी सरकारने स्वीकारून, त्यावर ताबोडतोब प्रभावी उपाययोजना राबवल्या पाहिजेत. देशाचा नागरिक म्हणून, देशहितासाठी  त्रास सहन करण्याची नागरिकांची तयारी असावी, अशी सर्वसाधारण धारणा असते. काही प्रमाणात ती योग्यदेखील आहे. देशहितासाठी घेतला जाणारा, एखादा निर्णय दूरगामी परिणाम करणारा असतो आणि त्याचा येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी फारच उपयोगाचा असतो. पण देशामध्ये प्रत्येक वर्ग वेगवेगळा असतो आणि तो वेगवेगळा स्तरावर मोजला जातो, कनिष्ठवर्ग,मध्यमवर्ग,उच्चवर्ग. प्रत्येकाच्या दैनंदिन आणि मुलभूत गरजा देखील वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कनिष्ठवर्ग पूर्णतः आणि मध्यमवर्गातील काही सुरुवातीचे घटक, हाती येणाऱ्या रोजच्या मिळकतीवर त्यांच्या दैनंदिन गरजा भागवत असतात. परंतु अश्यावेळी त्यांच्या दैनंदिन गरजांवर घाला घालणे, मानवनिर्मित उदभवलेल्या परिस्थितीवर वेळीच ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे न करणे. ससेहोलपट होत असताना, दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी, हाती निराशा लागणाऱ्या रांगांमध्ये उभे राहावे लागले, तरीही जनता हा त्रास सहन करीत कितीही काळ उभी राहते. अश्यावेळी त्यापैकी एखाद्याने जरी  बंडखोरीची भाषा वापरली तर त्याला शांत करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची उदाहरणे दिली जातात. निस्पृह सेवेसाठी कटीबद्ध असणारे, देशासाठी आपले प्राण न्योछावर करणारे आपले वीर सैनिक, ज्यांना गोळीच्या बदल्यात गोळी मिळते, पण तुम्हाला तर इथे पैसे मिळणार आहेत. मग कांगावा कशाला ??? प्रत्येक देशाचा  नागरिक, प्रचंड मातृप्रेमी असतो आणि तितकाच मातृभूमी प्रेमी देखील. जितकी श्रद्धा त्याची जन्मदात्या आईवर असते तितकीच आईचा दर्जा असलेल्या आपल्या मातृभूमीवर देखील असते. मग तो देश क्षेत्रफळाने प्रचंड प्रमाणात विस्तारलेला असेल किंवा अगदी बेटांच्या स्वरुपात तुकड्यांमध्ये विखुरलेला असेल. रांगांमध्ये उभे राहणाऱ्या नागरिकांना, सीमेवर लढणाऱ्या वीर सैनिकांचे उदाहरण देवून, एकाच पट्टीमध्ये मोजले जाते. पण मग जेव्हा रांगामध्ये उभे राहणारे सामान्य नागरिक जीवानिशी मरतात, तेव्हा त्यांच्या मरणाची अहवेलना का ??? त्यांचे मरण मोजताना ती पट्टी अचानक कुठे गायब होवून जाते ???

जिथे नक्षलवाद्यांसोबत दोन हात करीत असताना, वीरमरण आलेल्या पोलिसांना शहीदाचा दर्जा प्राप्त होत नाही, तिथे सर्वसामान्यांची काय टाप.

- सुरेश तु. सायकर   

Sunday 4 December 2016

...शेवटी सुधाकररावच

शेवटी सुधाकररावानां प्रोमोशन मिळून खुर्ची मिळालीच. इतके वर्ष ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो ‘सोनियाचा’ दिन त्यांनी छिनके, हिकमतीने मिळवून आपल्या आयुष्यात आणलाच. खुर्चीमध्ये स्थानपन्न झाल्यावर, त्यांनी खुर्चीवर विश्रांती न घेता दौऱ्याचा धडाका सुरु केला. पूर्वीच्या काळी जसे राजे-महाराजे सूत्रे हाती घेतल्यावर आपल्या राज्याचा दौरा करून सगळी परिस्थिती पहायचे. अगदी तसेच सुधाकररावांनी दौरे सुरु केले. जसे प्रत्येक ऑफिसमध्ये/दुकानामध्ये/कारखान्यांमध्ये अगदी मित्रांमध्ये दोन गट असतात, अगदी तसेच इथे देखील होते. सुधाकररावांना त्यांच्या ऑफिसमधल्या दुसऱ्या गटाच्या इतर सभासदांनी विरोध सुरु केला. असे राज्यभर उंडगायचा (पक्षी-दौरे) खर्च ऑफिसला पेलवणारा नाही, असं सूर सगळ्यांनी काढला. तरीही सुधाकरराव त्यांना बधले नाही. त्यांनी सगळे राज्य पायाखालून (पक्षी- विमानाखालून) घालवले. प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाचा डंका जोरजोरात वाजवला. अगदी तिथल्या स्थानिक रहिवाश्यांनी सुद्धा आश्चर्याने त्यांच्या पुढे मान झुकवली (खरं तर ती त्यांची, पाहुण्याचे स्वागत करण्याची पद्धत आहे.) असा चारही दिशांना आपल्या नावाचा गवगवा झाल्यावर, सुधाकरराव मनोमन सुखावले. अगदी त्यांच्या स्थानिक वर्तमानपत्रात देखील मानाचे फ्रंट पेजवरचे स्थान सुधाकररावांनी मिळवले होते. पण इकडे ऑफिसमधल्या विरोधकांची घालमेल जास्तच वाढू लागली. ‘ऑफिस म्हणजे फक्त सुधाकरराव’ (पक्षी- भारत म्हणजेच....श्री._ _ _ बस्स का राव...हे पण आम्हीच सांगायचे का..???) अशी समीकरणे जिथे-तिथे उमटू लागली. आपले स्थान आणि आपल्या नावाचे रुपयासारखे घटत जाणारे अवमूल्यन विरोधकांना असह्य होवू लागले. त्या सर्वांनी मिळून सुधाकररावांच्या दौऱ्याची यथेच्छ टवाळकी सुरु केली, एवढ्यावरच न थांबता त्यांना ऑफिसमधून मेमो दयायचा घाट घातला. सुधाकारारावांना त्यांच्या विरोधात होत असलेली हालचाल जाणवली आणि सरतेशेवटी सुधाकारारावांनी आपले दौरे एकदाचे थांबवले.

इकडे विरोधकांनी आपण कसे विजयी झालो आणि सुधाकारारावांची कशी जिरवली याचा आनंद ढोल बडवून, एकमेकांना शुभेच्छा, आलिंगन देत साजरा करू लागले. पण.....सावजाला बेसावध ठेवून त्याची शिकार करण्याचे कमालीचे कसब सुधाकारारावांनी आत्मसात केलेले होते. एखाद्या तेल लावलेल्या पैलवानासारखे ते तयार गडी होते. आपल्या विरोधात असणाऱ्यांवर त्यांनी प्रभावी अस्त्र उगारले (बी.आर.चोप्रांच्या टी.व्ही.वरच्या ‘महाभारता’चे सुधाकारारावांनी अगदी पारायण केलेले आहे. म्हणजे, इकडून शत्रूने भात्यामधून बाण बाहेर काढून अर्जुनावर डागला कि तिकडून अर्जुन आपल्या भात्यामधून बाण बाहेर काढून धनुष्यामध्ये अडकवून त्या बाणाला नमस्कार करीत काहीतरी पुटपुटत असे आणि ’ये लो मेरा ब्रम्हास्त्र’’ असे म्हणत शत्रूवर डागत असे.मग शत्रूकडून येणारा बाण आणि अर्जुनाकडून येणारा बाण एक विशिष्ट संगीत ‘ढिंग.ढिंग.ढिंग..टव्यांक... टव्यांक... टव्यांक ’ असं वाजवत येवून एकमेकांवर आदळत असे, (कृपया प्रत्येकाच्या आवाजाच्या बाबतीतचे ज्ञान अगदी अल्प असे शकते. तेव्हा वाचकांनी आपल्या स्वतःच्या स्मरणशक्तीवर भार देवून आणि शक्य न झाल्यास यू-ट्यूब या आधुनिक ‘संजय’ची मदत घेवून ऐकू शकता/पाहू शकता...) आणि मग त्यातून शत्रूचा बाण एखाद्या फुसक्या चायनीज फटाक्यासारखा फुस्स्स...होऊन गायब होत असे. (अहो राजे....विषयांतर होतंय...भूतकाळातून, चालू-वर्तमानाकाळात या...अजून भविष्यात काय वाढून ठेवलंय ते सुधाकारारावांनाच ठावूक....) तर असा खेळ पुरेपूर पाठ असलेल्या सुधाकारारावांनी एका बेसावध क्षणी ते ब्रम्हास्त्र (पक्षी-क्षेपणास्त्र) आपल्या शत्रूवर (पक्षी-विरोधकांवर) डागले. त्यांनी एका रात्रीत बेसावध रात्री शत्रूला खिंडीत पकडून, आदेश काढला.

टेबलाखालून येणाऱ्या ‘माया’वर त्यांनी बंदी घातली. कोणीही कितीही ‘ममते’ने अगदी काहीही दिले तरी त्याच्यावर कडक कारवाईचे आदेश दिले. कोणीही ‘लालू’च दाखवली तर त्याला भुलू नये. इतके दिवस ‘मुलायम’ वाटणारे खुर्चीचे आसन ऑफिसमधल्या विरोधकांच्या आता बुडाला टोचू लागले. ‘सोनियाचे’दिन जावून भिक्षेचे पात्र हाती आले. के’जरी’वालले (पक्षी-केस जरी वाळले...थोडे ओठांचा चंबू करून या आडनावाचा उल्लेख करावा...किंवा एखाद्या बोबडे बोल बोलणाऱ्याला हे आडनाव उच्चारायला लावावे....म्हणजे लक्षात येईल...आणि यातला ‘स’ हा सायलेंट आहे...(अरे किती फेकायचे....) तर... असो ) तरीही खोकल्याची उबळ अजिबात कमी होणार नाही, याची पुरेपूर काळजी सुधाकारारावांनी घेतली. मग काय विचारता....ऑफिसातल्या सगळ्या विरोधकांचे धाबे दणाणून गेले. जो-तो सुधाकारारावांना आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करू लागला, परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आपली कामे करून घेण्यासाठी ऑफिसमध्ये येणाऱ्या पिचलेल्या सर्वसामान्यांना कसे छळले जात होते, हे सर्वश्रुत होतेच. मग सर्वसामान्यांनी देखील आम्हाला त्रास झाला तरी चालेल, परंतु हि बुरशी,कीड,वाळवी प्रभावी पेस्ट कंट्रोल करून एकदाची मुळासकट उपटून टाकाच, असं म्हणत पाठींबा दिला. विरोधकांनी मग ‘एक दिवस ऑफिसचे काम बंद’ची हाक दिली, मग सुधाकारारावांनी नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांना भावनिक आवाहन केले. आणि मग त्यांच्या आवाहनाला तळागाळातून भरभरून पाठींबा मिळाला. इकडे ऑफिसमधल्या विरोधकांच्या आरोपांची हवाच निघून गेली. (ऑफिसमधल्या अज्ञानी विरोधकांच्या बऱ्याच उशिरा लक्षात आले कि, त्यांनी बंद साठी निवडलेल्या तारखेला वार हा ‘रविवार’ होता..आणि असं हि...रविवारच्या दिवशी फक्त, टमरेल घेवून सार्वजनिकला आणि दुपारी मटण/चिकन/मासेवाल्याशिवाय पब्लिक कोठेही लाइनीला उभे राहत नाही. तिथे बंदसाठी विरोधकांच्या काय पाठी उभे राहणार.)      
  
इकडे विरोधकांमध्ये मात्र तिसरे महायुद्ध भडकले आहे. जो-तो दांडके (पुरुषांचे हत्यार) आणि लाटणे (स्त्रियांचे हत्यार) हातात घेवून फिरत आहेत. आणि दिसेल त्याला एकमेकांची गचांडी (पुरुष-पुरुषांची) आणि पदर (स्त्रिया-स्त्रियांचे) पकडून दरडावून विचारात आहेत....आयचा घो....आरं कुनी त्या सुधाकारारावांना दौरे करून नगा म्हणून सांगितलं हुतं....त्यो भायर हुता तेच बरं हुतं....त्ये हापिसात येऊन बसाय लागलं...अन आपल्या बुडाखाली आग लावलीया.... (एक कळकळीची विनंती... कृपया, वरील डायलॉग प्रत्येकाने आपापल्या भाषेमध्ये अनुवादित करून घ्यावा....किशोरदा/बच्चनसाहेबांच्या कृपेने आम्हाला फक्त ‘आमी तुमाके भालो बाशि’ एवढंच येतंय.....शेवटी कमी बुकं शिकलेली अडाणीच आम्ही...बरोबर ना....असो...)

- सुरेश तु. सायकर                                       

Sunday 16 October 2016

...तथास्तु

( स्थळ : पुण्यातला प्रचंड रहदारीच्या, अगदी बाजीराव रस्त्याकाठच्या, सदाशिव पेठेतील पाच मजली इमारत, नाव-कल्पवृक्ष, टेरेसवर जमलेली सोसायटीची सभासद मंडळी )

सोसायटीच्या अजेंड्यावर कधी नव्हे तो खूप मोठा आणि अतिमहत्वाचा विषय आला होता.

लिफ्टचा दरवाजा उघडा राहू नये आणि जर चुकून राहिलाच तर तो लक्षात यावं म्हणून, सोसायटीच्या सर्व सभासदांनी (कोकणस्थ आणि देशस्थ याचे पहिल्यांदा एकमत झालेले दुर्मिळातले दुर्मिळ उदाहरण.असो.)   असे ठरवले कि, जोरात वाजणाऱ्या एखाद्या संगीताची धून लावावी. (बरं, इथे शीला कि जवानी, मुन्नी बदनाम हुई, असले थर्ड क्लास संगीत कानाखाली फुकटात वाजवले जाते. त्यामुळे त्याचा विचार देखील कोणाच्या मनात येणे देखील दुर्लभ) कोणी तरी सुचवले कि, पंडितजींच्या आवाजातील भैरवी लावावी. पण समजा रात्रीच्या वेळी जर कोणी घाईघाईमध्ये दरवाजा लावायचा ठार विसरला तर...? आख्खी सोसायटी पहाट झाली समजून जागी व्हायची. तेव्हा तेही बारगळले. अगदी संगीत नाटकाचे पद ते समुधुर संगीत यावर देखील चर्चा झाली. शेवटी एकमताने निवड झाली ती, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे याची. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि चहा पाण्याचा कार्यक्रम करायचा ठरला...आपापल्या घरी.

मी मात्र जाम वैतागली होती, सगळ्यांवरच, अगदी आयुष्यावर देखील. इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये टीचर म्हणून काम करणे सोप्पे नव्हे. त्यातल्या त्यात, लहान मुलांना शिकवायचे म्हणजे तुमच्यामध्ये, फक्त असीम नव्हे तर जीव गेला तरी शांत राहून हसरा चेहरा ठेवण्यासाठीचे, पेशन्स असणे खूप गरजेचे. सरकारचा नवीन नियम, लहान मुलांवर हात उगारायचा नाही, त्यांना शारीरिक शिक्षा देखील करायची नाही. तर शिक्षा म्हणून त्यांना वर्गाच्या बाहेर उभे करायचे. त्यातल्या त्यात काही टारगट मुलं तर ठरवून दंगा करतात आणि शिक्षा म्हणून बाहेर उभे राहण्याची शिक्षा आनंदाने स्वीकारतात. त्यातल्या त्यात शिक्षा जर कारंज्यापाशी झाली तर अगदी मान ताठ करून जातात, कारण समोरच रहदारीचा वाहता रस्ता असल्याने, मुलांना मस्त आनंद वाटायचा. तिथली शिक्षा अगदी रंगवून इतर मुलांना सांगायचे. जणू काय पिकनिक पॉइंटच तो. अशातच घरी येवून थोडा वेळ शांततेत राहावे तर ब्लॉक नेमका लिफ्टच्या बाजूलाच असल्याने नेहमी लिफ्टचा दरवाजा उघडा राहायचा. मग कोणीतरी पाचव्या मजल्यावर येवू पाहणारे, तळमजल्यावरून दरवाजा उघडा ठेवणाऱ्याच्या नावाचा उद्धार करायचे. मग न राहून शेवटी आवाज यायचा तो यायचाच, बाळ इंदू, अगं जागीच असशील, तर जरा त्या लिफ्टचा दरवाजा (पण खरं तर तो उच्चार...थोबाड असाच असायचा) व्यवस्थित लाव बरं. मग दरवाजा न लावणाऱ्याचा आणि तळमजल्यावरून अगदी पाचव्या मजल्यापर्यंत उंच स्वरात दरवाजा लाव म्हणून ऑर्डर सोडणाऱ्याच्या नावाचा उद्धार करीत, मी लिफ्टचा उघडा दरवाजा व्यवस्थित लावत असे. तसा सगळ्यांना माहित होता, माझा जमदग्नीचा अवतार. पण इथे दारात उभ्या राहिलेल्या सेल्समनला कोणी दार उघडून बघत नाही, तिथे माझा जमदग्नीचा अवतार पाहायला, कोण पाचव्या मजल्यावर येणार.    

लिफ्टमन म्हणून काम करणारा महादू, वय झाल्यामुळे काम सोडून गेला होता. त्या बिचाऱ्याने इमानीतबारे पुरे चाळीस वर्षे नोकरी केली होती. तसा त्यालाही दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आधी जसे, कारकुनी नोकरी करणारे आयुष्यभर एकाच जागी चिटकून अगदी, पी.एफ. ग्राजुईटी घेवून निवृत व्हायचे. अगदी तसेच महादूचे होते. जाताना त्याला अगदी उचलून, रिक्षात घालून त्याच्या मुलांनी नेला होता. त्याला पी.एफ. ग्राजुईटी मिळाली नाही, हि गोष्ट अलहिदा. तर तो गेल्यानंतर, इथे कोणीच लिफ्टमन म्हणून काम करायला तयार होत नव्हता. त्याला कारण फक्त अशक्त, कमकुवत पगार नव्हता. तर त्याला असणारे कारणच खूप विचित्र होतं, तळमजल्यावरच्या जोशींकाकूंना दुधाच्या पिशव्या आणून देण्यापासून ते पाचव्या मजल्यावरच्या दामले आजींची औषधे आणून देण्याची कामे त्या एकाच पगारामध्ये त्याला करावी लागत असे. मधल्या मजल्यावरच्या मंडळींची मग बातच नको. अनेकदा तर, दुसरे कामाला लावतात, तर मग आपणा का नको? अशी ईर्ष्या वाटून, कुलकर्ण्यांनी तर एकदा कहरच केला. त्याला अगदी ठरवून पाच वेळा वर्तमानपत्र बदलून आणायला पाठवले होते. प्रत्येक वेळी वेगवेगळे समूहाचे वर्तमानपत्र बदलून आणायला नव्हे, तर, आधी काय म्हणे तर वर्तमानपत्राचा छोटासा कोपराच फाटलेला,  तर दुसऱ्यांदा आतल्या पानाची घडी व्यवस्थित नसल्याने नेमकी त्यांना वाचायच्या बातमीवर रेघ पडली होती म्हणून. असल्या छळाला वैतागून, तो बिचारा लिफ्टमन फक्त पळून गेला म्हणून नशीब. नाहीतर बिचाऱ्याने पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला असता, तो हि नेमका जोशींच्या, कुलकर्ण्यांच्या,दामलेंच्या डोक्यावर. तसेही हे सगळे एका जागीवर सापडणे दुर्मिळच, बहुतेक त्याला याची जाणीव झाल्याने, तो बापडा पळून गेला.

कमीला भर म्हणून कि काय, माझ्या शेजारच्या ब्लॉकमध्ये कानाने एकदमच ब्लॉक झालेल्या दामले आजी राहत होत्या. नेमक्या त्याच नेहमी लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवून निघून जात असत. तश्या त्या एकट्याच राहत होत्या, मुलगा अमेरिकेला आणि मुलगी लग्न होवून मुंबईला. दामले आजींना जिथे मुंबईच वर्ज्य तिथे अमेरिकेची बातच नको. त्यामुळे त्या एकट्याच राहायच्या, जसे जमेल तसे स्वतःसाठी बनवून खायच्या. त्यांचा वेळ घरापेक्षा, राम मंदिरामध्येच जास्त व्यतीत व्हायचा. त्यांना ऐकू अजिबातच यायचे नाही, तरीपण भजन, कीर्तन यामध्ये अगदी तल्लीन होवून जायच्या. मला नेहमी वाटायचे, सोसायटीच्या सभासदांना सांगून लिफ्टच्या दरवाजास भजन, कीर्तनाची ट्यून लावावी. कमीकमी त्यामुळे तरी त्यांना ऐकू जाईल. कावळा बसायला अन फांदी तुटायला एकच वेळ म्हणतात. तसं घडलं, मला जेव्हा समजले कि, लिफ्टसाठी ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून लावणार आहेत. त्यावेळेस साखरेचे अगदी चार दाणे, सोसायटीतल्या सगळ्या लोकांच्या हातावर ठेवावेत असे मनात आले. पण दुसऱ्याच क्षणी, एखाद्याचे एफ.बी.वरचे अपडेट केलेले स्टेटस चांगले असून देखील लाईक करायचा विचार झटकावा, तसे ते झटकून टाकले. शाळेतून आल्यावर, तळमजल्यावरून लिफ्टने डायरेक्ट पाचव्या मजल्यावर येणारी मी, मधल्या मजल्यांवर कोण राहते याची साधी चौकशी पण कधी केली नव्हती आयुष्यात. त्यातल्या त्यात बेशिस्त लोकं जवळपास म्हंटली कि, माझ्या डोक्यात प्रचंड तिडीकच जाते. शाळेतील मुलं कमी पडतात म्हणून कि काय, सोसायटीमधली मुलं काही कमी नव्हती. पण त्यांना माझा नेहमीच धाक असायचा. मी फक्त डोळे रोखून जरी त्यांच्याकडे पहिले, तरी ती मुले मुकाट तोंड खाली पाडून निघून जात. अश्यातच, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून लावणार म्हंटल्यावर, आता आपली, लिफ्टचा दरवाजा लावण्यापासून सुटका होणार, याचा खूपच आनंद झाला.

त्या दिवशी शाळेमधून आल्यावर नेहमीप्रमाणे प्रचंड चिडचिड झालेली. वर्गामध्ये एका मुलींला होमवर्क का केले नाही म्हणून विचारले तर, डान्स इंडिया डान्सचा प्रोग्रॅम टीव्हीवर लागलेला होता, तो बघताना झोपी गेले. आता सौम्य शिक्षा ती काय करावी...? या विचाराने डोक्याची नस फुटून जायची वेळ आली होती. वर्गाबाहेर जावून उभी रहा असं सांगितलं तर, अगदी निर्लज्जपणे, मिस, कारंज्यापाशी का..? असं विचारले. मनात आलं, कि दोन, चार.... पण विचार मनातच गाडून टाकला. डोकं प्रचंड दुखत होते, म्हणून घरी आल्यावर आलं, सुंठ टाकून चहा बनवायला घेतला. पातेल्यात चहा उकळत होता आणि   माझं रक्त देखील. इतक्यात ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून वाजली. मनात म्हंटल, चला, आजी मंदिरातून आल्या असतील, आता त्या ट्यून ऐकून लिफ्टचा दरवाजा बंद करतील. पण दरवाजा काही बंद झाला नाही, म्हणून मी लागोलाग बाहेर जावून पाहिलं तर, लिफ्टचा दरवाजा थोडा उघडाच होता. आणि इकडे दामलेआजी जणू काय भजन चालू आहे, अश्या अविर्भावात टाळ्या वाजवत दरवाजा उघडून आपल्या ब्लॉकमध्ये जात होत्या. मी एकदम किंचाळूनच जोरात ओरडले, आजी त्या दरवाजाचे थोबाड आधी बंद करा. भजनामध्ये रंगत यावी, म्हणून बुवा जसे मध्येच उच्च स्वरात हुंकार भरतात. बहूतेक त्यांना तसेच वाटले कि काय, म्हणून त्यांनी टाळ्या वाजवता वाजवता, एकदम दोन्ही हात उंचावले, आणि ब्लॉकचा दरवाजा बंद करून आतमध्ये गेल्या. आता मात्र माझी प्रचंड चिडचिड झाली, मी शक्य तितक्या जोरात ओरडून, सगळ्यांचा उद्धार करीत होते. शाळेमध्ये शिस्त म्हणून मी अजिबात ओरडू शकत नव्हते. त्याचा सगळं कसूर मी इथे भरून काढत होते. पण जणू काही घडतच नाहीये, अश्या अविर्भावात सगळे सभासद आपापल्या ब्लॉकमध्ये, ब्लॉक झाले होते. तिकडे उकळलेला चहा पूर्ण आटून गेला, आणि इकडे माझा आवाज, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे च्या ट्यूनमध्ये.

दुसऱ्या दिवशी शनिवार, म्हणजे शाळेला अर्धा दिवस सुट्टी. त्यातल्या त्यात सोसायटीचे बरेच सभासद जाग्यावरच सापडणार होते. त्यामुळे त्या सगळ्यांना अगदी धारेवरच धरायचे, याच विचारात मी रात्रभर झोपूच शकले नाही. संपूर्ण रात्रभर, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून एकसारखी माझ्या कानात वाजत होती. एक दोन वेळा मी मध्यरात्री उठून, लिफ्टचा दरवाजा कोणी उघडा ठेवलाय कि काय..? हे पाहून पण आले. शाळेत इतकी कठोर शिस्तीने वावरणारी मी, इथे मात्र माझी अगदीच शेळी झाली होती. पण काहीही झाले तरी उद्या, दामले आजींचा निकाल लावायचा म्हणजे लावायचाच असा चंग मनाशी बांधला.
दिवसभराच्या दगदगीमुळे जरा डोळा लागला आणि काही वेळाने पुनश्च, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून. दरवाजा उघडा ठेवणाऱ्याची आता काही खैर नाही. या जोशमध्ये मी डोळे उघडले तर सगळीकडे धूरच धूर, अरे बापरे चहाचे भांडे अजून गैस वर चुकून राहिले कि काय...? अशी शंका मनामध्ये आली. पण हे प्रकरण जरा वेगळेच होते. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून अजूनही वाजतच होती. मग तर डोके सटकलेच, जोरात किंचाळून ओरडलेच. अरे...त्या लिफ्टच्या दरवाज्याचे थोबाड कोणी तरी बंद करा रे. वैताग आलाय त्या ट्यूनचा...एकसारखी वाजतीये मघापासून... दरवाजा तर बंद नाहीच झाला पण प्रत्युतरादाखल काही सफेद वस्त्र परिधान केलेली, मधाळ हास्य चेहऱ्यावर घेवून फिरणारी, डोक्यावर कसल्याश्या टोप्या कि मुकुट घातलेली, इकडून तिकडे फिरणारी माणसं, मला तोंडावर बोट ठेवून, शूउउउउ, असं म्हणत फिरत होती. डोकं एकदम कामातूनच गेलं. चार दिवसांवर गणपती आलेत, आणि दरवर्षीप्रमाणे सोसायटीची मंडळी कसली तरी नाटिका सादर करणार आहेत. अरे पण मग इतक्या पहाटे, हि काय वेळ आहे का, तालीम करायची. पण एकही थोबाड ओळखीचे दिसत नव्हते. तसेही, सोसायटीची मोजकीच मंडळी चेहऱ्याने ओळखीची होती. पण त्यापैकी इथे कोणीही दिसत नव्हते. डोकं आणखीनच दुखायला लागलं आणि त्यात भर म्हणजे, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून चालूच.

मी (एकाच्या हाताला पकडून, त्याला म्हंटल,) - अरे कोणाला तरी सांग रे...हि ट्यून बंद करायला...

तो – “ हे नाम अखंड चालूच असते...ते बंद करू शकत नाही...”

मी – “ अरे...कसं काय बंद नाही करू शकत....दरवाज्याचे थोबाड व्यवस्थित लावले कि होईल ते बंद...पण मला त्या दरवाज्याचे थोबाड इथे कुठेच दिसत नाहीये...”

तो – “ इथल्या पुण्याभूमीवर असले अपशब्द वापरणे पाप आहे “

मी – “पाप...अरे माझ्या झोपेचे खोबरे झाले....त्याचे काहीच नाही....म्हणे पुणे भूमी...”

तो – “पुणे भूमी नाही... पुण्याभूमी आहे ही....स्वर्ग म्हणतात याला...”

मी – “ स्वर्ग....अरे बाजीराव रोडची कल्पवृक्ष सोसायटी हि....माझ्यासाठी तर नरकच....म्हणे स्वर्ग....”
इतक्यात थोड्या उंचावर, खुर्चीवर बसलेला एकजण, खुर्ची कसली तर लग्नात असते ना तसली. तर  खुर्चीवरून बसून म्हणाला, “कोण गोंधळ घालतोय रे तिकडे...?”

मी – “ गोंधळ मी नाही याने घातलाय....ती ट्यून तेवढी बंद कर म्हणाले तर, मला म्हणतोय, इथे अपशब्द वापरायचे नाहीत...”

खुर्चीवाला – “अगदी सत्य आहे...स्वर्गामध्ये अपशब्द वर्ज्य आहेत....”

मी – “आता बासचं हा...तो म्हणे स्वर्ग, तू म्हणतोय स्वर्ग.....मला झोपेत चालायची अजिबातच सवय नाहीये...आणि एखाद्याला जरी असली तरी, पाचव्या मजल्यावरून लिफ्टमधून खाली येवून, एखाद्या दुसऱ्या सोसायटीमध्ये जाणे शक्य आहे का...? आपलं उगीचच काहीही....”

खुर्चीवाला – “बहुतेक तुला अजून समजलं नाहीये....हे स्वर्ग आहे...देवलोक...”

मी – “काय्य्य....? देवलोक....म्हणजे तुम्ही मला पृथ्वीवरून.....इथे.....स्वर्गात...”

खुर्चीवाला – “ आता तुला समजलं....तुझा पृथ्वीवरचा कार्यकाळ संपलेला आहे आणि म्हणून तू स्वर्गामध्ये आलेली आहेस...?

मी – “काय.... वेडबीड लागलं नाहीये ना....हि कसली पद्धत, ना काही अलर्ट, ना मेसेज, ना कसली नोटीस, विदाऊट नोटीस इथे तुम्ही मला आणलेच कसे....? मी कोर्टात खेचेन तुम्हाला.....माझी एकदा देखील परवानगी घेतली नाही....आणि मी असं काय पाप केलंय.....दामले आजीना ओरडून बोलले म्हणून डायरेक्ट स्वर्ग.....असला नोन्सेंसपणा मी अजिबात खवपून घेणार नाहीये...समजलं.... ”

खुर्चीवाला – “ऑफिसमधला शिपाई नाही.....अरे देव आहे मी...देव”

मी – “देव असताल, पण ते तुमच्या घरी....आमच्या घरीपण आहेत ना देव....”

खुर्चीवाला – “अरे....माझाच अवतार आहेत ते...”

मी – “ मग तुमच्यापेक्षा ते बरे....गप गुमान देव्हाऱ्यात बसलेले असतात....रोज सकाळी आई त्यांना अंघोळ घालते....टिळा लावते.... मग छान वासाची उदबत्ती ओवाळून त्यांच्या बाजूलाच लावते....मग दोघांच्या मध्ये मिळून एक, असे फूल वाहते....आणि त्या उपर, सगळ्या देवांसाठी, चिमुटभर साखर नैवद्य म्हणून ठेवते....बिचारे घेतात, दोन-चार दाणे आपापसात वाटून....हू नाही कि चू नाही.....आणि तुम्ही म्हणे देव...देव असे असतात का, पोलीस देखील एखादया स्त्रीला असं अपरात्री तिच्याच घरातून, तिची परवानगी न घेता...पोलीस चौकीमध्ये नेत नाहीत....आणि तुम्ही तर डायरेक्ट स्वर्गात घेवून आलात.....तुमच्यापेक्षा आमच्या देव्हाऱ्यातले देवच बरे....”

खुर्चीवाला – “अरे चित्रगुप्त, कोणाला आणलंय तुम्ही....आणि कोठून....”

चित्रगुप्त कि काय ते – “देवा....हि पुणे शहरातील, बाजीराव रोड इथे, कल्पवृक्ष सोसायटीमध्ये, ब्लॉक नंबर २०३ राहणारी, ७२ वर्षीय इंदुमती आहे.”

मी – “ शी...७२ वर्षीय....आणि मी....वेडबिड लागलंय कि काय तुम्हाला....”

चित्रगुप्त कि काय ते – “देवा...हिला...बाकीचे मुद्दे महत्वाचे वाटत नाही...पण ७२ वय म्हंटला कि, लगेच...ई ई ई ई....सुरु झाले आहे...या स्त्रियांचे खरं तर जरा अवघडच आहे.....”

मी – “अवघड माझे नाही आता तुमचे होणार आहे....एकतर मी इंदुमती नाही तर इंदिरा आहे....दुसरे म्हणजे मी जरी कल्पवृक्ष सोसायटीमध्ये राहणारी असले तरी, माझा ब्लॉक नंबर २०३ नाही तर २०२ आहे.... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, माझे वय ७२ नव्हे तर २७ आहे....”

खुर्चीवाला – “चित्रगुप्त...हि काय म्हणतीये.....तुम्ही तुमची नोंदवही व्यवस्थित पाहून घ्या....”

चित्रगुप्त कि काय ते – “देवा....नक्कीच काहीतरी मोठा घोळ झालेला दिसतोय...म्हणजे पृथ्वीसारखाच कारकुनी प्रकार इथे घडलेला दिसतोय.....माझ्या हाताखालील एखाद्या कनिष्ठ कारकुनाने आकडेवारीमध्ये चुकीची नोंद केली....पुढचे मागे आणि मागचे पुढे असं काहीसं झालंय बहुतेक.....आणि मी देखील विश्वास ठेवून, न वाचताच, सरळ सही ठोकून दिली....”

खुर्चीवाला – “मोठ्ठा... खूपच मोठ्ठा गोंधळ करून ठेवलाय तुम्ही....ताबडतोब तुमची नोंदवही बारकाईने पाहून घ्या बरं....”       

मी – “ पाहून वगैरे ते काय आहे ते तुमचं तुम्ही नंतर घ्या....आधी मला माझ्या घरी पाठवा....एकतर माझी आई काळजीत असेल....दिवसा न सांगता जाणारी कार्टी, अशी अचानक पहाटे कुठे गेली....आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे....माझा स्कूल टायमिंग....सकाळचा शार्प... शार्प ७ वाजताचा आहे...मला अर्धा सेकंद जरी इकडचा तिकडे झाला तरी अजिबात चालत नाही...तेव्हा तुम्ही मला आत्ताच्या आत्त्ता लगेचच घरी पाठवा...समजलं”

खुर्चीवाला – “चित्रगुप्त, तुम्हाला हजारदा बजावून झालंय...पुण्यामधून आणि त्यातल्या त्यात पेठांमधून कोणाला जर उचलायचे असेल तर ते फक्त आणि फक्त सत्तरी ओलांडलेल्यानाच....कारण एकतर त्यांची भांडण्याची ताकद कमी झालेली असते....त्यामुळे ते अजिबात वादविवादात पडत नाहीत....आणि त्यामुळे आपल्या प्रोसिजरला अजिबातच वेळ लागत नाही....”

चित्रगुप्त कि काय ते – “ देवा, माफी असावी....”

मी – “ ओ....चित्रगुप्त कि काय ते....माफी त्यांची काय मागता...माफी माझी मागायची...समजलं...एकतर माझ्या परवानगीशिवाय तुम्ही मला इथे आणलंय...आणि त्यातल्या त्यात, त्या दामले आजींना आणायचं सोडून भलत्यालाच आणलंय...तेव्हा माफी माझी मागायची....इतकं पण समजत नाहीये तुम्हाला.....कसे काय स्वतःला देव म्हणवता तुम्ही....अवघड आहे बाबा तुमचं...”

खुर्चीवाला – “ अरे किती बोलते हि बाई....”

मी (किंचाळून) – “बाईई...ईईईई.....बाई म्हणता मला....इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिकवते मी....मिस, मैडम वगैरे असं काही म्हणायचे सोडून....बाईई....शी...”
एवढं ऐकल्यावर खुर्चीवाल्याने, साष्टांग दंडवतच घातला, म्हणाला, “चूक झाली हो....पुन्हा अशी चूक  कध्धीच नाही होणार....माफ करा....आणि तुमच्या इतकं वादविवादाचं प्रचंड बळ....आम्हाला देखील मिळू दया....”

मी – “खरंतर...अजिबातच वेळ नाहीये.....मला स्कूलला जायला उशीर होतोय....तरीपण...तथास्तु..”


- सुरेश तु. सायकर
985060-1353 / 955257-1353

Tuesday 2 August 2016

पाऊस आणि रोमांटिक...

पाऊस आणि रोमांटिक अनुभव याचा दूरान्वये सबंध नाही असं म्हणणारा सजीव या पृथ्वीतलावर क्वचितच आढळेल. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती ना कोणती घटना पावसासंबंधीत घडलेली असतेच. काही जणांसाठी आनंददायी, सुखदायक असते तर काही जणांसाठी त्रासदायक.
आनंददायी, सुखदायक यासाठी कि , ज्याच्यासोबत, ज्याच्यासाठी हा पाऊस अनुभवलेला असतो तो तुमच्या सोबत अजूनही कायम असतो. तुम्हाला जेव्हा एखादी व्यक्ती आवडायला लागते. तेव्हा त्याच्या चांगल्या वाईट वर्तवणुकीचा विचार अजिबात न करता आपण त्याच्या प्रेमात पडतो. मग हळूहळू त्याच्या मध्ये इतके गुंतत जातो कि, त्याच्या वाईट गोष्टी आपोआप नजरेआड होतात. कधीतरी जेव्हा आपण नकळत दुखावले जातो तेव्हा ती ठसठसणारी जखम वेळेच धुवून टाकणे महत्वाचे. कारण एकमेकांमध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी योग्यवेळी वाहून जाणे म्हणजे एकमेकांसोबत जास्त काळ व्यतीत करणे. त्या धुवून जातात, जेव्हा तुम्हाला आवडणारा पाऊस त्याला किंवा तिला देखील आवडत असतो. मग अशातच पावसाची पहिली सर येते, अन दोघांच्या डोळ्यात पालवी फुटते. दुरावलेल्या, दुखावलेल्या मनांना हलकीच फुंकर घालते. दोघांच्या मनात त्याला अनुभवण्याची ओढ निर्माण होते. पण तो अनुभवण्यासाठी गरज असते सोबतीची. तो अनुभव आणखीन द्विगुणीत होतो जेव्हा आपल्या सोबत असते आपल्याच पहिल्या प्रेमाची. बाल्कनीतून बाहेर कोसळणारा पाऊस पाहून आठवतो, तो तिला फक्त पाहण्यासाठीचा अट्टाहास. कारण प्रेम व्यक्त करण्याआधी बऱ्याचदा आपण तिच्या कळत किंवा नकळत फक्त तिला पाहण्यासाठी धडपड करत असतो. कधी तिच्या क्लास बाहेर, कधी तिच्या नेहमीच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर, कधी तीच्या घराबाहेर तर कधी अगदी भाजीमंडई पर्यन्त. अश्यावेळी तिथपर्यंत पोहचण्याची धडपड जरी आठवली तरी आत्ता ती किंवा तो सोबत असल्याची किंमत आपल्याला सहज कळेल. त्या धो-धो कोसळणाऱ्या पावसात अनेकदा चालत, कधीकधी धावपळत कधीतरी मित्राच्या सायकलवर फक्त तिला पाहण्यासाठी केलेली मरमर जर आठवली तर आपल्याला स्वतःचेच हसू येईल. तिने जेव्हा पहिल्यांदा प्रेमाला होकार दिला तेव्हा साक्षीला फक्त हाच पाऊस होता, धो-धो कोसळणारा. पण तो तेव्हा किती रोमांटिक वाटला, इतके दिवस त्याच्या वेडसर कोसळण्याने तिची एक छबी पाहू शकत नव्हतो म्हणून किती कोसले होते. आणि जेव्हा तिने पहिल्यांदा आपल्याला होकार दिला. तेव्हा साक्षीला फक्त हाच होता. म्हणजे नक्कीच कोणते तरी अतूट नाते याच्यासोबत असणार. मग जेव्हा जेव्हा हा कोसळायला लागतो तेव्हा तेव्हा आठवण येते त्या सुगंधित क्षणांची. पहिला पाऊस पडल्यावर मातीचा जो सुगंध येतो तो त्या मातीचा नसून त्या प्रेमाच्या पहिल्या अंकुरापासून फुललेल्या फुलांचा असतो. तो फक्त जरी आठवला....तर आयुष्य सुसह्य.
त्रासदायक यासाठी कि, ज्याच्यासोबत, ज्याच्यासाठी हा पाऊस अनुभवलेला असतो तो किंवा ती आज आपल्या सोबत नसते. जेव्हा हाच पाऊस नकोसा वाटायला लागतो तेव्हा समजायचे कि, आपल्या नात्याची सुरुवात होताना असलेला साक्षीदार आता तिच्या किंवा त्याच्या दृष्टीने फितूर झालाय. अशातच काहींनी मध्येच साथ सोडलेली असते तर काहींची सुटलेली असते....आयुष्याच्या शेवटाला.....वयोपरत्वे.
-सुरेश तु. सायकर

Friday 15 July 2016

सणसणीत....शिवराळ शिवी....

जेव्हा आयुष्यात सगळं गुडी गुडी चाललंय असं वाटायला लागतं....तेव्हा आरश्यासमोर उभं राहायचं....स्वतःला निरखून पहायचं....हसून...वेडावून स्वतःलाच दाखवायचं...यशाच्या पायऱ्या कश्या चढत गेलो याचे गुणगान गायचे....स्वतःवर माज करायचा...अभिमान वाटेल अश्या भौतिक सुखांचे जमवलेले कोंडाळे भोवती असल्याचा माज करायचा....आरश्यातल्या प्रतिमेच्या डोळ्यात डोळे घालून बघायचे.....खोलवर.....खूप खोलवर....आणखीन खोलवर.....आणि मग......आरश्यातल्या आपल्याच प्रतिमेला एक जोरदार...सणसणीत शिवराळ शिवी हसाडायची....

अशी शिवी कि, जी ऐकल्यावर आपल्याच काय तर आरश्यातल्या प्रतिमेच्या देखील डोक्याची नस तडकायला पाहिजे.

पण का....? हा प्रश पडला तर तुम्ही आरश्यातल्या प्रतिमेच्या बाहेर असलेली स्वतंत्र व्यक्ती.....आणि नाही पडला तर...तुम्हीच आरश्यातली वास्तवात जगत असलेली प्रतिमा....

लोकांसमोर जेव्हा आपण वागतो...बोलतो...तेव्हा आपण स्वतःला नाही पाहू शकत. समोरचे लोक आपल्याला पाहतात...म्हणजे त्यांना दिसते ते बाह्यांग....रंगवलेलं......खोट्या आव ने चढवलेलं......माज नावाचा दागिन्याने मढवलेलं......कळकट विचारांचे पण रंगबिरंगी कापडांच्या आवरणामध्ये सजवलेलं.....मग काही जण आपल्या प्रेमात पडतात.....काहीना आपले बोलणे आवडते...काहीना आपले दिसणे...काहीना आपले कर्तुत्व....काहीना आपण मिळवलेले धन...काहीना आपण मिळवलेली प्रसिद्धी....

पण कधी....आपण आपल्या स्वतःच्या प्रेमात पडलोय का...?

नाही...कारण आपण स्वतःला आतून व्यवस्थित पाहिलेलंच नसतं कधी....म्हणजे स्वतःचे अंतरंग....फक्त आरश्यासमोर जेव्हा येतो तेव्हा फक्त आपण किती चांगले दिसू...आपल्या व्यक्तिमत्वाची इतरांवर कशी छाप पडेल अश्या पद्धतीने स्वतःला नटवतो...इतकाच काय तो आपला आपल्या प्रतिमेशी संबंध.....पण कधी आपण आपल्या प्रतिमेशी बोलतो...? कधी विचारतो त्याला... मी इतरांशी वागताना माणुसकी नावाच्या शब्दाला जागतो का...? माझ्याकडून नकळत कोणाला दुखावले तर जात नाहीये ना...? स्वतःचे हित साधण्यासाठी मी दुसऱ्याचे अहित तर चिंतीत नाहीये ना...? हपापलेपणा साधताना गरजवंतांचे ओरबाडून तर घेत नाहीये ना...? माझे पोट भरलेले असताना देखील ओरबाडून घेवून एखाद्याला उपाशी ठेवत तर नाहीये ना....? चुकांसाठी क्षमाशील राहण्याची सद्प्रवृत्ती माझ्यात आहे ना.....? तू कसा आहेस...? तुला कसं असावसं वाटतं...? तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत...? माझी वर्तणूक तुझ्या स्वत्वाला जपते का...? थोडक्यात बाह्यांग आणि अंतरंग यांचा योग्य मिलाफ होतोय का...?

जर यांचे उत्तर नाही असे असेल तर...मग तुम्ही तुमच्याशी, तुमच्या प्रतिमेशी, आणि तुमच्या स्वत्वाशी प्रतारणा करताय.

जेव्हा लोकांसमोर आपण जातो....तेव्हा कितीवेळा आपण खरे कसे आहोत याचे दर्शन देतो. याउलट आपण लोकांपासून खूप साऱ्या गोष्टी लपवतो...आपण आपल्यातले वैगुण्य लपवतो...आपल्या वाईट सवयी लपवतो....आपल्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दलचे असणारे खरे विचार लपवतो...आपण तोंडवर जरी सदवर्तन दाखवत असलो तरी त्या व्यक्तीबद्दल असणारे सुप्त आकर्षण लपवतो.....कधीकाळी आपण समोरच्याला फसवलंय परंतु स्वतःचे हित साधण्यासाठी खोटंखोटं  बोलून चुकीचे परमार्जन म्हणून त्याची माफी मागत पुन्हा त्यांना एकवार कुरवाळतो.....थोडक्यात मनात एक आणि तोंडावर एक. अश्या दोन जगांमध्ये एकाच वेळी आपण वावरतोय....

बरोबर ना....मग जर असे असेल तर...आपल्याच जगातल्या....आरश्यातल्या आपल्याच प्रतिमेला.....इरसाल शिवी हासडण्यात गैर ते काय....?



-सुरेश तुळशीराम सायकर       

Thursday 30 June 2016

असंच....सहज....फिरताना.....

बऱ्याचदा माणसं कोणतं तरी ध्येय ठेवून नेहमी बाहेर पडतात. पुरुषाबद्दल विचार केल्यास, क्लायंटसोबत ठरवलेली ऑफिशियल मिटिंग वेळेत गाठून काम मिळवणं, गृहिणीबद्दल विचार केल्यास, बाजारात जावून भाजी घेवून लवकर स्वयंपाक बनवणं, तरुण मुला-मुलींबद्दल विचार केल्यास, आपल्या प्रेमी किंवा प्रेमिकेला भेटून प्रेमाच्या गुजगोष्टी करणं.
अश्यावेळी बाहेर पडल्यावर ठरलेल्या जागी पोहचताना इतर कशाचाही विचार करत नाहीत. ऑफिसवाल्याच्या डोक्यात, प्रोजेक्टचे दमदार प्रेझेंटेशन करून प्रोजेक्ट कसे मिळवायचे? गृहिणीच्या डोक्यात, काल कोणती भाजी केली होती आज कोणती भाजी करायची? प्रेमी किंवा प्रेमिकीच्या डोक्यात, ओझरता का होईना स्पर्श कसा अनुभवता येईल? फक्त याचाच विचार.
हे करत असताना, आपली धावत्या यांत्रिक जगाची छोटी छोटी चाकं कधी झालीत हेच समजत नाही.
पण एकदा जरा वेगळं जगून बघा....म्हणजे कोणताच विचार डोक्यात ठेवायचा नाही....आणि सहज बाहेर पडायचं. अगदी डोकं मोकळं ठेवून, रस्त्यावरून भन्नाट चालत फिरायचं. मग बघा...काय सुख सापडेल.....आजूबाजूला कोणत्या ना कोणत्या ध्येयाने धावणारे जीव आणि आपण अगदी मोकळे....तुलना केल्यावर...इथेच पहिले सुख लाभेल. स्वतः बद्दल असूया वाटायला लागेल.
मग एक थोडा वेगळा खेळ खेळून बघायचा.....समोरच्यांच्या मनात काय चाललं असेल याचे आडाखे बांधायचे, त्याच्या चेहऱ्यावरच्या भावना टिपायच्या, स्वतःला त्या व्यक्तीसोबत कनेक्ट करायचं, त्यांच्या लकबी निरखायच्या, त्यांचा आजूबाजूच्या इतर लोकांबद्दल काय विचार चालला असेल याचे विश्लेषण करायचे.
सहज चहा पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एखादया हॉटेलपाशी उभे राहायचे. चहा पिणारी गर्दी न्याहाळायची, एकसो एक रंगीले रतन दिसतील. घोळका करून असतील परंतु लक्ष दुसरीकडे....म्हणजे सुंदर मुलींकडे. चहा पिताना एकमेकांत गप्पा मारणारी मुलं आणि मुलीदेखील ( याला मुली अपवाद असतात असं मुळीच मानू नये. ) आपण गप्पांमध्ये रंगलेलो आहोत हे दाखवत असतात. पण त्याचवेळी बाजूला उभ्या राहिलेल्या सुंदर मुलींवर किंवा मुलावर त्यांची नजर असते. तोंडाने गप्पा, पण डोक्यात विचार वेगळेच आणि तेही आपल्यापासून काही अंतरावर असणाऱ्या बद्दल. कनेक्ट करून बघा....
त्याचवेळी घाईघाईत फुटपाथवरून चालणारया गृहिणीच्या मनातले विचार, रस्त्यावरून भन्नाट वेगात मिटिंगसाठी जाणारया बिझनेसमनचे विचार, कॉफीशॉपच्या बाहेर टेबलावर हातात हात गुंफून बसलेले प्रेमीक जीवांचे विचार, आतुरतेने वाट बघणारे बसस्टॉपवरचे प्रवाश्यांचे, बर्गर किंग शॉपीच्या बाहेर उभा असणारा हडकुळ्या दरबानचे, किंमती इलेक्ट्रोनिक्सच्या वस्तू विकणारे पण स्वतः विकत न घेवू शकणारया शोरूमच्या कर्मचाऱ्यांचे, ज्वेलर्सच्या दुकानामध्ये मौल्यवान दागिने दाखवणारे परंतु स्वतः विकत घेवू शकत नसल्याने स्वतःला त्या दागिन्यांमध्ये पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे... अश्या अनेकाविध लोकांचे थक्क करून टाकणारे अनेकाविध विचार.
सायकलवाल्याला कट मारून पुढे जावून अचानक सिग्नल लाल झाल्यावर उभा राहणारा बाईकवाला. त्याचवेळी पेंडल मारून वैतागलेल्या सायकलवाल्याच्या मनात बाईकवाल्याबद्दल वाटणारी असूया, बाईकवाल्याच्या शेजारी येवून उभ्या राहणाऱ्या कारला बघून थंड ए.सी.ची हवा खाणाऱ्या कारवाल्याबद्दल वाटणारी बाईकवाल्याला असूया, त्याच बाईकवाल्याच्या मागे बसलेल्या सुंदर मुलीला बघून कारवाल्याला वाटणारी बाईकवाल्याची असूया. माणसांची हि अनेकाविध, वेगवेगळी, काहीशी विचित्र, गूढ, बहुरंगी, कधी विक्षिप्त वाटून देखील भन्नाट वाटणारी अनेक रूपे.....
बघायचीयेत......मग एकदा पडाच बाहेर....अगदी सहजच...डोकं मोकळं ठेवून.......
-सुरेश तुळशीराम सायकर

Wednesday 18 May 2016

हेल्मेट...

आजही तो प्रसंग आठवला कि, अंगावर काटाच उभा राहतो. माणूस जो पर्यंत हातीपायी धडधाकट आहे तोपर्यंत त्याला कशाचीही किंमत कळत नाही, अगदी आपल्या स्वतःच्या शरीराची देखील. पण जेव्हा तोच एखादया अपघातामुळे किंवा जीवघेण्या आजारामुळे अंथरुणावर आडवा पडून राहतो. तेव्हा आपल्याकडून नकळत किंवा जाणूनबुजून झालेल्या चुकांची उजळणी करायला लागतो. यापुढे आयुष्य जर जगायला मिळाले तर ‘माणूस’ म्हणून जगू अशी स्वतःशीच भलावण करतो. 
  
खरं तर त्या दिवशी घडलेल्या प्रसंगात चूक माझीच होती. चतुश्रुंगी पोलीस चौकीच्या इथून पुणे विद्यापीठाच्या दिशेने भरधाव वेगाने गाडी चालवताना, गावी जाण्यासाठीची एस.टी. वेळेत पकडायची हे माझे जणू आयुष्याचे ध्येय झाले होते. स्वारगेटला पोहचल्यावर दुचाकी स्वारगेटच्या पेड पार्किंगमध्ये लावायची, रस्ता ओलांडायचा आणि लगेच एस.टी.त बसायचे अशी मनात उजळणी करत होतो. या विचारात दुचाकी चालवत असतानाच..... नको ते अघटीत घडले. बोलत असताना काहीतरी प्रोब्लेम झाल्याने अलगद पुढे मांडयांवर विसावलेला. कधी निसटून सिमेंटच्या रस्त्यावर तो पडला हे देखील कळले नाही. काळजाचा ठोकाच चुकला, पाठीमागून भरधाव वेगाने चार चाकी वाहने जात होती. मनात आलं, एखादया वाहनाने त्याला चुकवले नाही तर ??? त्याच्या डोक्याचा अगदी भुगाच होवून जाईल. थरथरत्या हाताने दुचाकी कशीबशी रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न करत होतो. एवढ्यात पाठीमागून भरधाव वेगाने जाणारे एक-दोघे जण ओरडलेच, ‘अरे येड्या, जा उचल त्याला लवकर. नाहीतर भुर्जी होवून जाईल’. खरं तर अश्यावेळी कोण काय बोलतं याकडे आपलं लक्षच नसतं. दरदरून घाम फुटलेला होता. त्यामुळे जाणारे काय बोलत होते याकडे माझे अजिबात लक्ष नव्हते. मी कशीबशी दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली, दुचाकीवरून उतरलो आणि रस्त्याच्या मधोमध पडलेल्या त्याला उचलण्यासाठी पळालो. समोरून भरधाव वेगाने चारचाकी गाड्या येत होत्या, पण माझे त्यांच्याकडे अजिबातच लक्ष नव्हते. मी फक्त आणि फक्त त्याच्याकडेच बघत होतो. अश्यावेळी काही चारचाकी वाहन चालकांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याला वाचवण्यासाठी गाड्या बाजूने घेतल्या. मी मनोमन त्यांचे आभार मानत, त्याला उचलले. अशी वेळ खरं तर वैरयावर देखील न येवो. पण त्या दिवशी माझ्या नशिबात खरंच काहीतरी अघटीत घडणार असंच होतं. हाताच्या ओंजळीत धरून त्याला मी एकटक बघतच  होतो. डोळ्यात पाणी जमा झाले होते. काही बोलावं हेच समजत नव्हतं. अगदी काही क्षणाआधी मी त्याच्या करवी बोललो होतो आणि आता.....आता तो अगदी निस्तेज माझ्या हातात होता. आजूबाजूचे गर्दीतले हळहळत होते, कोणीच काही करू शकत नव्हते. त्यापैकी एकाने खांदयावर हात ठेवून माझ्याकडे बघत ‘तो’ आता गेला अश्या आशयाने आपली मान हलवत माझे सांत्वन केले. मी सांत्वन करणाऱ्याला म्हणालो छे ...रे वेड्या...असा कसा जाईल हा ? आत्ताच आम्ही दोघं गावाला जायचं, काय काय कामं करायची याची उजळणी करत होतो. अरे याच्याच मार्फत मी बोललो होतो ट्राक्टरवाल्याशी, खालची पट्टी नांगरून घ्यायची, पोखरलेली माती वरल्या पट्टीत टाकायची. बाभळीची झाडं तोडण्यासाठी वखारीवाल्यासोबत देखील बोललो होतो पण तो परवडत नाही म्हणाला. तर मग यानेच... यानेच मला बाभळीच्या झाडांपासून कोळसे बनवणाऱ्या व्यापाऱ्याचा फोन नंबर दिला होता. त्या कोळसेवाल्याशी बोललो तर तो मी म्हणत असलेल्या किंमतीवर झाडं घेण्यास तयार झाला आणि हे फक्त याच्याच मुळे शक्य झाल. अरे, हातात घड्याळ घालून देखील एक्झाट किती वाजलेत हे कन्फर्म करायचे असेल तर याला पाहिल्यावरच समजते, इतका पाबंद आहे हा वेळेचा. मग अश्या अवेळी एक्झिट कशी काय घेवू शकतो हा???? आणि मला बाहेरगावी जायचे असताना, जेव्हा सगळ्यात जास्त याचीच गरज असताना, असा कसा काय हा मला सोडून जावू शकतो??? नाही.... मला....हा मला असा सोडून जाणं अशक्यच आहे.समोरच्याने पुन्हा एकवार माझा खांदा दाबला आणि ‘तो’ आता नाहीये हे पुन्हा एकवार डोळ्यानेच खुणावून सांगितले. तरीही माझा विश्वास बसतच नव्हता, अरे...कसा बसेल यार.....कसा बसेल. आत्ता सोबत असलेला अचानक नाहीये....यावर कसा काय विश्वास बसेल....तुम्हीच सांगा ना.

मी आजूबाजूच्या लोकांचा ‘तो’ आता नाहीये या सांगण्यावर अजिबात विश्वास न ठेवता, गावाला जायचे कॅन्सल करून, त्याला तश्याच अवस्थेत त्याच्या हॉस्पिटलमध्ये घेवून गेलो. खरं तर अशी वेळ अगदी वैरयावर देखील न येवो. मी फक्त वाचले होते, ऐकले होते, की, इमर्जन्सीच्या वेळेत मोठ्मोठी हॉस्पिटलदेखील अश्या अवस्थेतील रुग्णास एड्मीट करून घेत नाहीत. आणि दुर्दैवयाने ती वेळ माझ्यावरच  आली होती, मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी त्याला घेवून फिरत होतो, याचना करत होतो, हात जोडत होतो. कारण त्याच्याशिवाय मी अगदी काहीच नव्हतो, खरंच काहीच नव्हतो, प्रचंड अवलंबित्व होतं त्याच्यावर माझं. म्हणतात कि देव खरंच आहे...हो तो आहेच, कारण इतक्या विनवण्या केल्यावर सरतेशेवटी एके ठिकाणी त्याला एड्मीट करून घेतले. पण एड्मीट करून घेताना वरच्याचा म्हणजे परमेश्वराचा हवाला दिला. आशेचा एक किरण...फक्त एक किरण, तुमच्या आयुष्याची दिशा बदलवून टाकू शकतो यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्याच विश्वासावर मी त्याला तिथे एड्मीट केले. तो कोमात गेल्याने त्याला आधीचे काहीच आठवत नव्हते. तो पूर्णपणे ब्लांक झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर, जाणीव होत असल्याची कोणतीच लक्षणं दिसत नव्ह्ती. त्यांनी मला आधी चार तासांची मुदत दिली मी तिथेच सैरावैरा होवून चकरा मारत होतो. खूप प्रयत्न करून थकल्यावर त्यांनी पुन्हा १२ तासांची मुदत दिली. १२ तास म्हणजे दुसराच दिवस, त्यांनी मला घरी जाण्यासाठी सांगितले. त्याच्या शरीरात टेस्टिंगसाठी नळ्या खोचलेल्या होत्या, अश्या अवस्थेत त्याला पाहणे खूपच त्रासदायक होते. तिथे थांबून देखील काही उपयोग नव्हता. त्याला वेन्टीलेटरवरच ठेवले होते. त्याची यारदाश परत आणणारी आणि त्याला मैच होणारी उदयाच उपलब्ध होणार होती. त्याच्या स्पेशालीस्ट डॉक्टरांकडे पाहून हात जोडले. त्यांनी डोळ्यानेच आश्वासन दिले. जड अंत:करणाने तिथून निघालो. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. जर तो कधीच पहिल्यासारखा नाही झाला तर???? छे.... छे....विचार देखील करवत नव्हता. मला तोंडपाठ देखील नाहीत त्यापेक्षा जास्त माझ्या लोकांबद्दल त्याला माहिती आहे. कसाबसा घरी आलो, दोन घास देखील घशाखाली उतरवू शकलो नाही. रात्री एक दोन वेळा तर त्याने आवाज दिला कि काय असा भास होवून मी झोपेतून गडबडून उठलो देखील. आजूबाजूला पहिले तर ‘तो’ नव्हता. पण काही केल्या त्याची आठवण माझी पाठ सोडत नव्हती. ती संपूर्ण रात्र मी तळमळत काढली.

दुसरा दिवस उजाडला खरा पण तो देखील खूप उशिरा....कारण जो पर्यंत तो आवाज देवून उठवत नाही तो पर्यंत मी झोपेतून जागा झालोय असं कधीच घडलं नव्हतं. धडधडत्या अवस्थेत कसबसं आवरून मी त्याच्या हॉस्पिटलची पायरी चढलो. त्याचा डॉक्टर बहुतेक माझीच वाट बघत होता, मला पाहिलं तसा तो उठून समोर आला. मी माझ्या मनाची तयारी खरं तर आधीच करून ठेवली होती, कि तो आता नाहीये आणि कधीच नसणार. एवढ्यात त्याच्या स्पेशालीस्ट डॉक्टरने माझ्या समोर येवून मला धक्का दिलाच अभिनंदन.....खूपच नशिबवान आहात तुम्ही.....त्याला मैच होणारं जे काल पर्यंत मिळत नव्हतं ते आजच सकाळी मिळालं. खरं तर तुम्हाला एवढी धावपळ करायलाच लागली नसती. फक्त काही रुपयांचं त्याच्यासाठी हेल्मेट घेतलं असतं तर हि वेळच असली नसती

मला काही क्षणांसाठी खरंच काहीच समजायला तयार नव्हतं, मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मी जे ऐकलं ते खरं आहे का....म्हणजे तो परत आला. ज्याला दुसऱ्यांनी ब्रेन डेड सांगितलं होतं आणि तो परत कधीच आधी सारखा होणार नाही असं सांगितलं होतं......तो परत आलाय. मी त्याला हातात घेतला, डोळ्यात पाणी जमा झालं होतं....त्याला प्रेमाने गोंजारलं.....त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने बोटं फिरवली आणि त्याला कानाला लावला आणि म्हणालो हेल्लो नाना....हा... मी बोलतोय....मी उद्या येईल गावाला...नाही कालच निघालो होतो पण जरा प्रॉब्लेम झाला होता. हो...हो...उदयाच येतो सकाळच्या एस.टी.नेएवढं बोलून झाल्यावर पुन्हा एकवार त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. डोळ्यात अजून पाणी जमा होतं, डोळ्यातलं पाणी पुसलं, खिशातून पाकीट काढलं. झालेलं टोटल बील देवून टाकलं... चक्क डिस्काऊंट न मागता.

आणि ८० रुपयाचं एक चांगलं हेल्मेट....म्हणजे कव्हर घेतलं....मैनचस्टर यूनायटेडचं बैकग्राउंड असलेलं.....माझ्या प्रिय.... मोबाईलसाठी.


-सुरेश सायकर