आज रविवार,
सुट्टीचा दिवस आठवड्यातील हा एकच दिवस असा कि ज्याची मी खऱ्या अर्थाने आतुरतेने
वाट पाहत असते. आज मोबाईलचा गजर होणार नव्हता कारण आदल्या रात्रीच मी तो ऑफ केला
होता. तसं दर शनिवारी करतेच यांत्रिकपणे, मोबाईलचे बरे असते म्हणजे आपल्याला जसं
हवं तसं त्याला आपल्यासाठी वापरता येतो. पण माणसाचे तसे नसते त्यांना भावना असतात,
रविला मात्र हेच कळले नाही. रविचे नाव मनात आल्याबरोबर आळसासोबत झटकून अंथरुणावरून
उठले. त्याचे नाव देखील मनात येणे माझ्यासाठी सकाळी सकाळी मूड खराब करण्यासाठी
पुरेसे होते. देवेन अजून झोपला होता अगदी लहान बाळासारखा निरागसपणे. आज जरी तो अकरावीच्या
वर्गात शिकणारा, कॉलेजमध्ये जाणारा तरुण असला तरी आजही तो माझ्यासाठी १० वर्षाचा
देवू होता रवी जेव्हा सोडून गेला तेव्हा. परत तेच त्याची आज अशी आठवण का व्हावी
हेच कळत नव्हते. आठवड्याभराची कामं पडलेली होती ती करण्यासाठी माझ्याशिवाय देवेन
शिवाय घरात दुसरं कोण होतं. देवेन जरी समंजसपणे स्वतःची कामे स्वतः करी असला तरीही
एक आई म्हणून आणि घरातील स्त्री म्हणून बरीच कामे मलाच पार पडावी लागत होती. आठवड्याभरचा
कपड्यांचा ढीग, घरातील साफसफाई, त्यातून मिळालेला वेळ म्हणजे शरीराला आराम आणि
मनाला मिळणारा आराम म्हणजे देवूला जास्तीचा देऊ शकणारा वेळ.
आज खरंच
अंथरुणातून उठावसं वाटत नव्हतं, कारण एक तर बाहेर पडलेली डिसेंबरची छान थंडी आणि अंथरुणामध्ये पडल्या पडल्या हवासा वाटणारा आयता
वाफाळणारा चहा. नवीन लग्न झाल्यानंतर रवी बनवून दयायचा छान दुधाचा आले टाकलेला
चहा, इतकं नशीबवान समजायचे स्वतःला कि स्वतःचीच नजर लागेल कि काय म्हणून भीती
वाटायची. रवी खरंच खूप समंजस होता मग नेमकं कोणाचं चुकलं, स्वतःला कधीच स्वतःची
चूक असेल असं वाटत नाही हे मला समजून देखील मी चुकत नव्हते यावर आजही मी ठाम आहे.
मग नेमकं काय झालं? आता खरंच उठून कामाला लागायला हवं असं जाणवलं कारण विचार करण्याच्या
पलीकडल्या घटना या मधल्या काही वर्षात घडून गेल्या होत्या. विचारातच पाय फरशीवर
ठेवले आणि गारठलेल्या फरशीची थंड कळ मेंदूपर्यंत गेली. एका अर्थी बरंच झालं कारण
अश्या शॉकची गरजच होती भूतकाळाच्या आठवणींमधून बाहेर पडायला.
माझ्या आवाजाने
देवूने झोपेत चाळवत कूस बदलली आणि मी माझ्या विचारांची. ग्यास पेटवला एका बाजूला अंघोळीसाठी पाणी आणि दुसऱ्यावर चहा ठेवला
आलं टाकलेला. ब्रश करून येईपर्यंत चहा चांगलाच उकळला होता. यांत्रिकपणे चहा
बनवायला सोप्पा असतो पण तो बनवताना त्यामध्ये योग्य प्रमाण राखत मिसळलेले दुध,
साखर, चहा पावडर आणि चवीसाठी आलं आणि तो बनत असताना त्याचे होणारे एकत्रीकरण बघणे
हे समीकरण जर योग्य पद्धतीने जुळून आले तरच चहा छान होतो अश्या विचारांची मी मग
लग्न संस्थेमध्येच का मागे पडले? चूक फक्त माझ्या एकटीचीच होती का? उत्तर नाही
असंच होतं.
चहा कपामध्ये ओतून
मी बाहेर आले तर देवू अजून मस्तपैकी झोपलेला होता. पेपर घेण्यासाठी दरवाजा उघडला
तशी हवेची थंडगार झुळूक अंगावर आली. हातातल्या कपातील गरम चहाचा केवढा आधार वाटला
त्यावेळेस हे शब्दात देखील कोणाला सांगू शकणार नाही आणि सांगणार तर कोणाला कारण
देवू आता पहिल्या सारखा राहिलेला नव्हता आता त्याचे विश्वच बदलून गेले होते.
कॉलेजला जायला लागल्या पासून बऱ्याचश्या गोष्टी त्याला समजू लागल्या होत्या.
बापाविना सांभाळणारी आई, हि संकल्पनाच आपल्या व्यवस्थेने मान्य केली नव्हती आणि
त्यातल्या त्यात पटत नाही अश्या फालतू कारणाने स्वतःच्या जबाबदारी पासून पळून
गेलेल्या रवी सारख्या तकलादूनीच बनवलेली हि व्यवस्था असल्याने त्याकडून अपेक्षा ती
काय करणार. पेपर घेवून दरवाजा लावून घेतला पण डोक्यात चालणाऱ्या विचारांचा मात्र
उघडा ठेवून. बाहेर पडलेली मस्त थंडी त्यात पेपर वाचत असताना वाफाळणारा चहा असलं
भारी कॉम्बिनेशन बऱ्याच दिवसानंतर अनुभवत होते. गरम चहाचे घुटके घेत घेत सगळा पेपर
चाळून झाला विचार करून जड झालेलं डोकं आता खरंच खूप हलकं वाटत होतं.
सहवासाची हि संकल्पना माझ्यासाठी तरी खूपच महत्वाची होती. पुन्हा पुन्हा भूतकाळात
जावून मेलेली आठवणींची प्रेतं उकरून काय हाशील होणार हे माहित असून देखील मन
एकसारखं पुन्हा तिथेच रमत होतं.
विचारांची
तंद्री एकदम भंग झाली ती ग्यासवर अंघोळीसाठी पाणी ठेवल्याच्या आठवणीने. उठून
स्वयंपाकघरात गेले तर पाठोपाठ देवू आत आला आणि मला जरा काम आहे महत्वाचे त्यामुळे
लवकर अंघोळ करून जायचं म्हणाला आणि माझ्या प्रतिक्रियेची वाट न पाहता दात घासायला
सरळ बाथरूममध्ये शिरला. मी स्तब्ध, रविवारच्या दिवशी असं काय त्याचे महत्वाचे काम
कि ज्यासाठी घाईघाईने उत्तराची वाट न पाहता सरळ आत निघून देखील गेला. त्याच्या
कलाने घ्यायचे अश्या विचाराने मी शांत झाले. दात घासून बाहेर आला मी चहाचा कप
त्याच्या हातात दयायला लागले तर ठेव म्हणाला. एकवार मी त्याच्याकडे आणि मग चहाच्या
कपाकडे पहिले तर तो वाफाळणारा चहा थंड वाटला आणि देवू देखील. त्याला त्याच्या
वडिलांकडून रक्तातून मिळालेला हा गुण होता कि अवगुण देव जाणे. कोणतंही मनासारखं
घडलं नाही कि प्रतिक्रिया एकदम थंड असायची, ‘ठेव’, ‘बरं’ ऊहुं’ ‘नको’ अशी. तरीही
मी जास्त विचार न करता विचारलं “चल सांग, नाश्त्यासाठी काय बनवू. तुझ्या आवडीचे शेव टाकून पोहे कि
मस्त उपीट” चहाचे घुटके घेत खाली बघत फक्त ‘काही नको’ इतकंच बोलला. त्याच्या
बाजूला बसले आणि त्याच्याकडे बघत त्याला विचारलं ‘कोणी काही बोललं का? म्हणजे कॉलेजमध्ये
काही घडलं का?” चहाचा
शेवटचा घुटका घेत उठून उभा राहत बोलला “काहीच नाही घडलं आणि जरी काही घडलं तरी मी तुला सांगेलच
अशी अपेक्षा कशाला करतेस’ अश्या तुटक वागण्याने मी आधीच कोलमडून गेलेली कशीबशी उभी
राहू पाहत होते तर देवूच्या अश्या वागण्याने पुन्हा कोसळून जाईल पुन्हा न
उठण्यासाठी असं वाटायला लागलं. तरीही संयमाने घेत ‘ठीक आहे’ इतकंच म्हटलं आणि उठून
आत जायला लागले तर ‘कॉलेज मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि मी त्यामध्ये मी
स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे आणि त्या संदर्भात कॉलेजच्या आवारात आमची मिटिंग आहे
म्हणून घाई करत होतो.’ देवूने एका दमात सगळं सांगून टाकलं. आता मळभ दूर झाला होता
बरं वाटलं त्याने मनमोकळेपणाने सांगितल्यावर आणि आनंद जास्त झाला कि कारण तो आता
चांगल्या संगतीमध्ये घडत होता. मी पुन्हा त्याच्या शेजारी बसले त्याच्याकडे पाहत
विचारलं ‘मग आज संध्याकाळी तुझ्या आवडीच्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं’ स्वारी एकदम
खुष कारण त्याला त्याच्या आवडीच्या हॉटेलपेक्षा आईची सोबत मिळणार होती याची
पुरेपूर जाणीव मला होती. देवू हसत म्हणाला ‘ठीक आहे, आता मला आवरून घेवू दे उशीर
होतोय’ आणि घाईघाईत उठून अंघोळीला गेला. त्याला पाठमोरा पाहत स्वतःशीच हसायला
लागले. लगोलाग स्वारी आवरून तयार देखील झाली नाश्तासाठी थांब म्हंटल तर
मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये प्लान बनवलाय असं सांगून छान हसत बाय करून गेला देखील.
देऊच हसणं अगदी माझ्या सारखं गोड. म्हणजे तसं कोणी सांगितलं नव्हतं पण मी आरश्यात
स्वतःला न्ह्याळत स्वतःशीच हसताना पहिल्याचं आठवलं पण हे नक्की आठवत नव्हतं कि मी
स्वतःला शेवटचं कधी आरश्यात न्ह्याळून पाहिलं ते.
माझी नोकरी मल्टीनेशनल कंपनीमध्ये
हुद्दा मोठा नव्हता पण खर्च वजा देवूच्या भविष्यातील शिक्षणासाठी बचत बऱ्यापैक्की
होत होती. घरापासून ऑफिसचे अंतर दीड तासाचे, सकाळी ९ वाजता निघाल्यावर कॅब
बाकीच्यांना पिकअप करून १०.३० पर्यंत ऑफिसला पोहचायची आणि मग उशिरा निघून
ट्राफिकमधून वाट काढत रात्रीचे ११.३० वाजायचे पोहचायला. आधार एका गोष्टीचा खूप
जास्त होता आणि तो म्हणजे माझे माहेर.
मी सध्या राहत असलेल्या
घरापासून जवळ होते म्हणून देवूच्या जेवणाची काळजी करायची मला अजिबात गरज नव्हती.
स्वतःचे आटपून तो कॉलेजला सकाळी ७ वाजता जायचा तेवढा माझ्या हातचा नाश्ता करून आणि
त्यानंतर दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण आजीच्या घरी. आईचा केवढा मोठा आधार
वाटायचा म्हणून सांगू. माझ्या प्रत्येक अडचणींच्या वेळेस ती माझ्या मागे उभी
राहायची तशी आजही आहे. माझ्या प्रेमविवाहाला वडिलांसोबत दादाचा देखील विरोध होता
तरीही माझ्या सुखात आनंद मानून आई माझ्या मागे उभी राहिली होती त्यावेळेस. रवी
सोडून गेल्यावर मी स्वतंत्र राहायचे ठरवले तर बाबांनी घर डोक्यावर घेतले होते त्यांची
इच्छा होती कि मी त्यांच्या सोबतच राहावे पण प्रत्यक्षात ते शक्य नव्हते कारण घरात
आई, बाबा, मोठा दादा, वाहिनी, त्यांची दोन मुलं आणि त्यात आमची भर म्हणजे अधिकचा
भार. त्यात दादा वाहिनीच्या स्वातंत्र्यावर एकप्रकारे माझा घालाच की, म्हणजे मी तिथे
राहिले असते तर त्यांना मनमोकळेपणाने वागता आलं नसतं एवढं समजण्या इतपत ज्ञान
माझ्याकडे होते. त्यामुळे आई वडिलांच्या जवळच भाड्याने घर घेवून राहायचे ठरवले. देवू
रात्रीचे जेवण करून आला कि माझ्यासाठी डब्बा घेवून येत असे. मग उशिरा घरी आल्यावर
फक्त अन्न गरम करून घ्यायचे. बाबांची खूप तळमळ व्हायची, रोज चक्कर मारून देवू घरी
व्यवस्थित आहे ना याची काळजी घेत. लग्नाला आलेली मुलगी जशी वडिलांच्या काळजीचा
विषय असतो तशीच काळजी लग्न होवून आपल्या मुलासोबत एकटी राहणाऱ्या मुलीची देखील
असते. बाबा मला अजूनही दुसऱ्या लग्नाचा आग्रह करीत होते पण एकदा हात भाजल्यावर
पुन्हा तो मूर्खपणा न करण्याच्या विचारांची मी होते. त्यामुळे मी दुसऱ्या लग्नाचा
विचार अजिबात करणार नाही यामुळे त्यांचा त्रागा जास्तच व्हायचा. मी समजू शकत होते
वडिलांचे दुःख, आता ठीक आहे पण उतार वयात सोबत हवी असते अश्या विचाराचे ते
असल्यामुळे त्यांची समजूत मी काढण्याचे सध्या बंदच करून टाकले होते. मला होती सोबत
माज्या देवूची तो माझ्या कष्टांना वाया जावू देणार नाही याची पुरेपूर खात्री होती
मला. आज रविवार, म्हणजे बाबांची इकडे कोणत्याही क्षणी धडक होणार आणि चहाचे घुटके
घेत गाडी पुन्हा पूर्वपदावर घसरणार याची मला खात्री होती. मग त्यांची समजूत काढत
काढत त्यांच्या आवडीचा गोड शिरा करून दिला कि मग तो संपेपर्यंत तेवढी शांतता आणि
मग थोड्यावेळाने समजावण्याच्या सुरात पुन्हा आग्रह पण तो आधीच्या सुरासारखा नसून
गोड झालेल्या असे शिरयासारखा. मग माझी बाजू लढवण्याचे नेहमीचे कार्य त्याच जोमाने
मी करे. कारण कॉलेजवयीन मुलाच्या आईसोबत लग्न करायला कोण तयार होणार आणि झालाच तर
तो देवूची काळजी कितपत घेणार आणि तोही रवी सारखा फसवा निघाला तर. अश्या प्रश्नांची
माझी सरबत्ती झाल्यावर बाबा लगेच डिफेन्स मोड मध्ये जायचे, लग्न झाल्यावर
एड्जस्टमेंट करावी लागते असा त्यांचा नेहमीचा सूर. केली ना मी एड्जस्टमेंट रविसोबत
चांगली ६ वर्ष आणि मग नंतर सुरु झाले वादविवाद आणि नवरेपणाची हुकुमशाही. तरीही
त्यातून मार्ग काढायचा अश्याच विचारांची मी होते. पण तो पसार झाला न सांगता. सध्याचा
ठावठिकाणा माहित नाही आणि मी शोधण्याचा प्रयत्न देखील केला नाही कारण अश्या
पळपुट्याचे पाय धरण्यासाठी मी तयार नव्हते. कारण ज्याला जबाबदारीची जाणीवच नाही
त्याच्या सोबत संसार करण्यात काय अर्थ आहे? माझ्या मनात स्वतःशी प्रश्नांची चालेली
सरबत्ती काही केल्या संपणारी नव्हती. आता बाबा कधीही येतील आणि अंघोळ झालेली नाही
हे पाहिल्यावर प्रचंड चिडचिड करतील या विचाराने भानावर येवून मी आवरायला घेतले.
आंघोळ झाल्यावर पुन्हा एकदा
चहा पिण्याची तलफ झाली आणि सोबत जगजितसिंहची गझल ऐकण्याची. माझ्या एकटेपणाला हीच तर
साथ होती. कॅब मध्ये जाता, येताना हेडफोन कानात घातला घातला आणि गझल ऐकायला लागले
कि दीड तासाचे अंतर कधी संपून जायचे समजायचे देखील नाही. चहा संपल्यावर आता
आवरायच्या मोहिमेवर निघायचे होते. धुण्यासाठी कपडे भिजत घातले आणि संपूर्ण घर
झाडून घेतले कोपऱ्यात कोळ्यांच्या जाळ्या होत्या
त्या झटकून टाकल्या. किती कष्टाने त्याने ते विणलेले असते याची कल्पना असून देखील
कारण कोळी टपलेलेच असतात भक्ष्य आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी. कोळी, पुरुषांच्या
रुपात देखील असतात सगळीकडेच, तेही एकटी बाई बघून जाळे टाकून टपलेले असतात,
अडकवण्यासाठी. सुरुवातीला भीती वाटायची पण जेव्हा नवऱ्यासोबत असलेली बाई देखील
सुरक्षित नसते हे पहिले तेव्हा माझ्या एकटेपणाची भीत वाटेनाशी झाली. आता पुन्हा
विचारांशी लढाई चालू झाली मनात. त्यांना झटकून देत सगळा कचरा डस्टबीन मध्ये टाकला
आणि झाडूला लागलेला कचरा ग्यालरीमधील भिंतीवर आपटून साफ करायला लागले. त्यासरशी
खालच्या ग्यालारीमध्ये उभा असलेला एकजण पेपर वाचत उभा होता, कोठून कचरा येतोय म्हणून
वर पाहू लागला. मला पाहिल्यावर काहीही न बोलता पुन्हा आपल्या जाग्यावर जावून पेपर
वाचू लागला. मी राहत असलेल्या इमारतीमध्ये नुकतेच रहायला आलेले ते नवीन बिऱ्हाड
होते. नवरा, बायको आणि दोन मुली असा चौकोनी आणि सुखी संसार.
खूप असूया वाटायची जेव्हा दोन
मुलींसोबत तो नेहमी खुश दिसायचा आणि ती देखील. तसं आमच्यात बोलणं व्हावं असं काही
घडलंच नाही. माझी सकाळी लवकर कामाला जायची घाई आणि तिची मुलींना शाळेत आवरायची घाई
आणि त्यातही खालच्या मजल्यावर राहत असल्याने फक्त जिन्याने जाता येता त्यांचा
येणारा आवाज. हा अपवाद फक्त रविवारचा, म्हणजे समजा दारात येणाऱ्या पिण्याच्या
पाण्याचा नळाला कधी प्रेशरमुळे पाणी नाही आलं तर खालच्या मजल्यावर जावं लागायचं
तेव्हा हमखास बोलणं व्हायचं पण तेही अगदी
जुजबी ‘आवरली का कामं..वगैरे वगैरे’ कारण त्यापेक्षा जास्त काही बोलावं असं घडलंच
नव्हतं. पण एकूणच तिच्या वर्तनावरून ते अगदी सुखी कुटुंब असावं असं ताडलं होतं.
आणि नेमकं हेच माझ्या असूयेचे कारण असावे असं वाटतं. कारण माझ्या वाटेला नाही पण
दुसऱ्याला कसं काय? हे जेव्हा एखाद्याच्या मनात येतं ना नेमकी त्याच अवस्थेला
असूया असं म्हणतात किवां म्हणत असावेत. हा एकमेव अपवाद सोडला तर एखाद्याविषयी
असूया वाटावी असा माझ्या आयुष्यात कधी घडलंच नव्हतं. किवां घडलेच तरीही ते फक्त
ऑफिसमध्येच पण तेव्हा देखील समोरच्याची इतकी काळजी घेणारे स्वतःच्या घरी आपल्या
बायको मुलांची देखील तितक्याच आस्थेने विचारपूस करीत असतील का? असा प्रश्न निर्माण
व्हयाचा आणि उत्तर जणू माहित असल्याच्या अविर्भावात माझ्या मनात असूयाच निर्माण
नाही झाली. पण या कुटंबाबद्दल असूया निर्माण व्हायला अनेक कारणं होती आणि पण समक्ष
डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टी मी नाकारूच शकत नव्हते. कारण अनेकदा मी पाणी भरायला
खाली आल्यावर त्याला घरातील केर काढताना, अंथरुणच्या घड्या घालताना पाहिलं होतं. मुलींसोबत
मस्तपैकी मित्रासारख्या गप्पा मारताना ऐकलं, त्या म्हणतील त्या खेळामध्ये सहभागी
होवून त्यांच्या सारखं लहान होवून खेळताना ऐकलं आणि पाहिलं देखील आहे. याचबरोबरीने
त्या दोघांमध्ये वादविवादाचा एखादा प्रसंग देखील ऐकला नव्हता. मग एवढं सगळं असताना
असूया निर्माण होणे साहजिकच आहे आणि तेही माझ्यासारख्या संसार नामे विवाह
संस्थेमध्ये पोळून निघालेल्या अनुभवी व्यक्तीकडून. कारण फक्त एका हाताने टाळी वाजत
जर नसेल तर फक्त चूक माझीच नव्हती हे समजून घेण्याइतपत शहाणपण रवीच्या डोक्यात का
नाही आलं? पुन्हा तेच, टाळू पाहणारा विषय म्हणजे रवी. आज एकसारखा का बरं डोक्यात
येतोय काहीच कळेना. असूयेतून आणि विचारातून पुन्हा बाहेर पडून कामे लवकर आटपून
घ्यावी लागणार कारण आज बाहेर जेवणाचा प्लान बनवलेला होता देवूसोबत या आठवणी बरोबर
हात यांत्रिकपणे चालू झाले.
देवूने छान पैकी आवरून घेतले
होते. लहान मूल ते एका तरुण मुलामध्ये त्याचा होणारा बदल मी स्वतःच्या डोळ्याने
पाहत होते म्हणण्यापेक्षा अनुभव होते कारण कोणत्याही छोट्या गोष्टींसाठी त्याने
कधीही हट्ट असा केला नाही. तसा रुसायचा पण तेही काही क्षणा पुरताच पुन्हा गाडी
रुळावर यायची आणि मग सुसाट सुटायचा शाळेत घडलेल्या गोष्टी सांगण्यात, मी पाहतच
बसायची त्याच्याकडे. मला म्हणाला ‘आई आज जीन्स
आणि टॉप घाल. ऑफिसमध्ये जाते ना नेहमी शुक्रवारी घालून तसा.’ मला एकदम अजबच वाटलं त्याचं बोलणं ऐकून कारण
त्याला मी असे जीन्स टॉप घालून
गेलेलं कधीच आवडलं नव्हतं. त्याच्या वडिलांना तरी कधी आवडलं म्हणा म्हणजे
लग्नाच्या आधीपासून मी घालायची तेव्हा वारेमाप कौतुक पण लग्न झाल्यावर हक्क
निर्माण झाले आणि त्या मग हक्कातून हुकुमशाही. काय घालायचं आणि कसं राहायचं याचा
तक्ताच तेवढा राहिला होता घराच्या भिंतीवर टांगायचा.
पण आज देवूच्या अश्या
बोलण्याचं आश्चर्य वाटलं क्षणभर पण लवकर आटप उशीर होतोय असा तगादा लावला त्याने.
आवरून बाहेर आले तर अजून एक आश्चर्याचा धक्का. ‘आजची पार्टी माझ्याकडून’ असं
त्याने जाहीर केलं. पार्टी देण्याइतपत अजून तो सक्षम झाला नव्हता हे मलाच माहित
आणि तरीही याच्याकडे या वयात एवढे पैसे आले कुठून असा प्रश्न येणे साहजिकच होतं. मी
विचारलं तर म्हणाला ‘तुला सांगितलं होतं ना कि आमच्या कॉलेजमध्ये सांस्कृतिक
कार्यक्रम आहे म्हणून तर त्याला कधी नव्हे तर यंदा प्रायोजक मिळाला आणि त्याने
अडव्हांस मध्येच पैसे देवूनही टाकले. मग काय ज्याने हा कार्यक्रम करण्याचा घाट
घातला होता तो माझा जवळचा मित्र त्याने विचारले, ‘देवू’ तुला आता पैसे ‘देवू’ का
कार्यक्रम पार पडल्यावर ‘देवू’. मला तर कार्यक्रम पार पडण्याची वाट पहायचा धीर होत
नव्हता तुला कधी एकदा सरप्राईज देतोय असं झालं होतं. म्हणून आजची ट्रीट माझ्याकडून.’
त्याच्या या बोलण्याने माझा सुटलेला संयम कसाबसा सावरला, आवंढा गिळत डोळ्यातील
आनंद्श्रू कसेबसे थोपवले. कसं व्यक्त व्हावं हेच सुचत नव्हते क्षणभर जाग्यावरच
थबकले तर देवूने मला हाताने सावरले. खूप आधार वाटलं त्या हातांचा आणि भीती देखील
कारण तीच अधीरता आणि तीच घाई मला दिसत होती कि जी रविमध्ये होती. रवी सारखा देवू
पण जाईल का मला सोडून? या भीतीने क्षणभर काटाच आला. देवूने मला हलवून वास्तवात
आणले मी स्वतःशीच हसले. कारण मला देवू आता मोठा आणि जबाबदारीने वागणारा घडू
लागल्याचे दिसत होते. आणि हा क्षण साक्षात परमेश्वर देखील माझ्याकडून हिरावून घेवू
शकणार नव्हता. त्याने जवळ जवळ ओढतच मला बाहेर घेतले घराला कुलूप लावले आणि नेहमी
चावी माझ्या पर्स मध्ये ठेवणारा आज स्वतःच्या खिशात चावी ठेवून चल म्हणाला आणि
एखादया लहान मुलासारखा हसत जिन्याच्या पायऱ्या उतरू लागला. माझ्यासाठी जणू आकाशच
ठेंगणे झाले होते. त्याच्या पाठमोऱ्या जाण्याकडे पाहत मी हात जोडून परमेश्वराकडे
पहिल्यांदाच काहीतरी मागितले आणि ते म्हणजे देवूची निरागसता अशीच टिकून राहावी....कायमची.
क्रमशः
- सुरेश सायकर .